पतीला न्याय मिळेपर्यंत निवडणुकीपासून दूर राहावं, अश्विनी देशमुखांविरुद्ध उमेदवारी अर्ज भरताच सल्ला
अण्णांचे भरपूर स्वप्न आहेत, आता ते मी पूर्ण करेल. गावकऱ्यांच्या लढ्यामुळेच आम्ही निवडणुकीत उतरलो आहोत, आमची इच्छा नव्हती.

बीड : जिल्ह्यातील (Beed) मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्याच पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून येथील पोटनिवडणुकीसाठी दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांनी आपला उमदेवारी अर्ज दाखल केला. जोपर्यंत अण्णा होते तोपर्यंत त्यांनी गावकऱ्यांसाठी जीवन गमवलं. त्याचप्रमाणे आता शेवटच्या क्षणापर्यंत गावकऱ्यांनी इच्छा दाखवली म्हणून मी देखील उमेदवारी (Election) अर्ज दाखल करत आहे. मी गावाची सेवा करेन असे, अश्विनी देशमुख यांनी म्हटलं. तर, अश्विनी देशमुख यांच्याविरुद्ध स्वरूपानंद देशमुख यांनी सर्वसाधारण गटातून सरपंच पदासाठी आपला अर्ज दाखल केला आहे.
अण्णांचे भरपूर स्वप्न आहेत, आता ते मी पूर्ण करेल. गावकऱ्यांच्या लढ्यामुळेच आम्ही निवडणुकीत उतरलो आहोत, आमची इच्छा नव्हती. मात्र, सर्वसामान्य जनतेने, गावकऱ्यांच्या इच्छामुळेच आम्ही या निवडणुकीत उतरलो, असे अश्विनी देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर म्हटले. तर, मस्साजोग ग्रामपंचायत सरपंच पोटनिवडणुकीसाठी स्वरूपानंद देशमुख यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे, येथील निवडणूक बिनविरोध होणार नाही, हे चित्र स्पष्ट झालं आहे.
न्याय मिळेपर्यंत निवडणुकीपासून दूर राहावं
सरपंच पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर स्वरूपानंद देशमुख यांनी माध्यमांशी संवाद साधला. सरपंच पदावरुन संतोष देशमुख यांची हत्या झाली, त्यामुळे देशमुख हत्या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत निवडणुकीपासून दूर राहून पतीला न्याय कसे भेटेल हेच त्यांनी पाहिलं पाहिजे, असा सल्लाच स्वरुपानंद देशमुख यांनी अश्विनी देशमुख यांना दिलाय. दिवंगत संतोष देशमुख यांच्या न्यायिक लढाईसाठी आजही गाव पाठीशी आहे आणि उद्याही राहील. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना जोपर्यंत शिक्षा होत नाही, तोपर्यंत आमचं गाव एकत्र आहे. त्यांना न्याय मिळवून देण्याचा सर्व ग्रामस्थांचा उद्देश असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. त्यामुळे, मी ही निवडणूक लढवणार असल्याचे स्वरुपानंद देशमुख यांनी स्पष्टपणे सांगितलं.
असा आहे सरपंच निवडणूक कार्यक्रम
7 ते 13 एप्रिल
अर्जाची छाननी - 15 एप्रिल
अर्ज मागे घेण्याची तारीख - 17 एप्रिल
मतदान - 28 एप्रिल
निकाल - 29 एप्रिल
हेही वाचा
बीडमध्ये व्यासपीठावर एकत्र बसले, गप्पाही मारले; कार्यक्रमानंतर म्हणाले, धस-मुंडे संघर्ष संपलेला नाही






















