अहमदनगर: शिर्डीमधून तुळजापूरकडे (Shirdi To Tuljapur) दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या कारला भीषण अपघात झाला असून या अपघातामध्ये दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर इतर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातात ठार झालेल्यांमध्ये एका महिलेचा समावेश आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. 


शिर्डी येथील भाविक हे तुळजापूर (Tuljapur ) या ठिकाणी दर्शनासाठी निघाले होते. यावेळी त्यांची कार बीडच्या आष्टी येथील पोखरी (Beed Accident) गावाजवळ आले असता चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट झाडावर जाऊन आदळली. या अपघातामध्ये चालक रुपेश बबन भेंडे आणि अनिता राहुल इंगोले या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अभय इंगोले आणि अनुप इंगोले ही दोन मुलं गंभीर जखमी झाले आहेत.


अपघाताची ही घटना घडल्यानंतर स्थानिकांनी अपघातग्रस्तांना तात्काळ मदत केली. या अपघातात जखमी झालेल्या दोन मुलांना जामखेड या ठिकाणी उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल आहे. या अपघातानंतर शिर्डी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 


आईचा वाढदिवस साजरा करण्यासाठी निघालेल्या चिमुकल्याचा अपघाती मृत्यू


मुंबईतील भाईंदर परिसरामध्ये मन हेलावून टाकणारी घटना घडली. पत्नीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी दुचाकीवरुन निघालेल्या कुटुंबाच्या दुचाकीचा अपघात  झाला. या अपघातात आईच्या मांडीवर असलेल्या 11 महिन्यांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. शनिवार 25 नोव्हेंबर रोजी ही घटना घडली. दरम्यान दक्ष शहा असं या चिमुकल्याचं नाव आहे. 


कुणाल शाह हे पत्नी जिग्ना शाह आणि पाच वर्षाची मुलगी कियरा तसेच 11 महिन्याचा दक्ष असं कुटुंब त्यादिवशी बाहेर आनंद साजरा करण्यासाठी गेलं होतं. परंतु त्यांच्या या आनंदावर वाटेतच विरजण पडलं. जिग्ना यांचा त्या दिवशी वाढदिवस होता. त्याच दिवशी त्यांनी आपल्या 11 महिन्यांच्या चिमुकल्याला गमावलं. दरम्यान या घटनेमुळे भाईंदर परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जातेय. 


याप्रकरणात भाईंदर पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली. रस्त्यावर साचलेल्या पाण्यात दुचाकी घसरल्याने हा अपघात झाला होता. यामध्ये शहा दाम्पत्य आणि त्यांची मुलगी जखमी झाले आहेत, अशी माहिती भाईंदर पोलीस ठाण्यात वरीष्ठ निरीक्षक सुर्यकांत नाईकवाडे यांनी दिली. 


ही बातमी वाचा: