मुंबई : आक्रमक नेते म्हणून ओळख असलेले राज्यमंत्री बच्चू कडू हे नाराज असल्याचे समोर आले आहे. त्यांच्या नाराजीचे कारण आहे त्यांना मिळालेला बंगला. हा बंगला स्मशानभूमीच्या शेजारी असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. बच्चू कडू यांनी त्यांच्याकडे येणाऱ्या अपंग आणि रुग्णांना सोईचे होईल अशा प्रकारचे मंत्रालयातील पहिल्या मजल्यावर कार्यालय तसेच मंत्रालया शेजारील बंगल्याची मागणी केली होती. परंतु काही अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक विधानभवनात कार्यालय आणि मलबार हिल येथील स्मशानाजवळील रॉकी हिल 1202 हा फ्लॅट दिला असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.


याविषयी बोलताना बच्चू कडू म्हणाले की, शुभ अशुभ यापेक्षा अपंगांना सोयीचा असणारा बंगला व कार्यालय हवे होते. तरीही सध्या मिळालेले कार्यालय स्वीकारून जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी अधिक वेळ देणार असल्याचे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी म्हटले आहे.

याआधीही बंगलेवाटपावर  मंत्र्यांमध्ये प्रचंड नाराजी पाहायला मिळाली होती. प्रत्येकालाच मनपसंतीच्या खात्याप्रमाणे पसंतीचा बंगला हवा आहे. पण सध्या तसं होताना दिसत नाही. प्रत्येकजण आपल्या पसंतीच्या बंगल्यासाठी लाॅबिग करताना दिसत आहेत. आधी मंत्रिमंडळ विस्तारासाठी उशीर झालाय त्यात बंगलेवाटपानंतर अनेकांची धुसपूस समोर येत आहे.

आदित्य ठाकरेंना ए 6 बंगला देण्यात आला आहे. पण त्या बंगल्यावर काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांचं नाव लावण्यात आलं आहे. उपसभापती निलम गोऱ्हे यांचा बंगला के सी पाडवींना देण्यात आला आहे. कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे यांना शिवसेनेचं कार्यालय असलेला शिवालय बंगला देण्यात आला आहे. तर कॅबिनेट मंत्री दादा भुसे यांचा बंगला काँग्रेसच्या अमित देशमुख यांना देण्यात आला आहे.

जितेंद्र आव्हाडांना बी 1  हा बंगला देण्यात आला आहे. पण हा बंगला विजय वड्डेटीवार यांच्याकडे असल्यामुळे तेही सोडण्यास तयार नसल्याची माहिती आहे.

मंत्रिपदावरून नाराजी, खातेवाटपावरून नाराजी आणि आता बंगल्यावरून महाविकास आघाडीत नाराजी असल्याचं दिसतं आहे. प्रत्येकालाच आपल्या पसंतीचा बंगला हवंय पण सध्या ते शक्य नसल्यानं अतंर्गत धुसुपुस वाढत चालली आहे.