Latur News:  लातूर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे (Babasaheb Manohare) यांनी शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यामधून ते बचावले असले तरी या वृत्ताने लातूरमधील सामाजिक आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. लातूर महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांना पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलविण्यात येणार असल्याची माहिती पुढे आली आहे. आज (7 एप्रिल) साडेदहा ते अकराच्या दरम्यान एअर ॲम्बुलन्सद्वारे मनोहरे यांना लातूर (Latur News) विमानतळावरून मुंबईकडे प्रयाण करण्यात येणार असल्याचे सांगितलं जातंय. मनोहरे यांनी शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यामधून ते बचावले असले तरी या वृत्ताने लातूरमधील सामाजिक आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. 

हॉस्पिटल ते लातूर विमानतळ दरम्यान ग्रीन कॉरिडोर

अशातच गोळी झाडल्यानंतर कवटीचे हाड ही मेंदूत अडकली होती. त्यावर लातूर येथे यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. मात्र मेंदूच्या काही भागात संवेदना कमी आहेत. त्यासाठी पुढील उपचार करण्याकरिता बाबासाहेब मनोहरे यांना मुंबई येथील कोकिळा बेन हॉस्पिटल येथे हलविण्यात येणार आहे. अशी माहिती सह्याद्री हॉस्पिटलचे डॉक्टर हनुमंत किनीकर यांनी दिली आहे. तर हॉस्पिटल ते लातूर विमानतळ दरम्यान ग्रीन कॉरिडोर देखील तयार करण्यात येणार असल्याची माहिती पुढे आली आहे. परिणामी वाहतूक पोलिसांनी त्या अनुषंगाने नियंत्रणा सज्ज केली आहे.

40 तासाहून अधिकाचा काळ उलटून गेला, तपास पुढे सारकेना

लातूर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या घटनेला 40 तास हून अधिकाचा काळ उलटून गेला आहे. मात्र अद्यापही त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न का केला होता याची कारणे स्पष्ट झाली नाहीत. आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी स्वतःच्या शासकीय निवासस्थानी गोळी झाडून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. सुदैवाने त्यात ते बचावले. मात्र काही शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून एक पिस्टल, रिकामी बुलेट, दोन मोबाईल काही कागदपत्र ताब्यात घेतली.

मात्र या पलीकडे तपास पुढे गेलाच नाही. त्यामुळे आत्महत्या मागे काही कौटुंबिक कारण होती का? की, कामकाजातील ताण-तणाव होता? हे अद्याप कळू शकलेले नाही. यापूर्वी ते ज्या ठिकाणी काम करत होते तिथे काही चौकशीचा ताण त्यांच्यावर होता का? अशा अनेक चर्चा आता सुरू आहेत. मात्र पोलिसांकडून किंवा त्यांच्या कुटुंबांकडून कोणतीही माहिती समोर येताना दिसत नाही.

हे ही वाचा