Muslim Reservation: राज्यात पुन्हा एकदा मुस्लिम आरक्षणावरून (Muslim Reservation News) राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. कारण 19 डिसेंबर पासून सुरू होत असलेल्या हिवाळी अधिवेशनावर (Maharashtra Nagpur Winter Session) एमआयएम (AIMIM) कडून भव्य मोर्चा काढला जाणार आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel)यांनी याबाबत ट्विटवरून माहिती दिली आहे. 21 डिसेंबर रोजी नागपूरच्या इंदोर मैदानापासून निघालेला मोर्चा विधानभवनावर (Nagpur Vidhan Bhavan) जाऊन धडकणार आहे.


राज्यात ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असतानाच आता मुस्लिम आरक्षणावरूनही वातावरण तापण्याची शक्यता आहे. कारण मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा तापताना दिसून येत आहे. मुस्लिम आरक्षणासाठी एमआयएम 21 डिसेंबरला नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात (Nagpur Hiwali Adhiveshan) विराट मोर्चा काढणार आहे. या मोर्चाला नागपुरातील इंदोर मैदानापासून सुरू होणार असून, विधानभवनावर जाऊन हा मोर्चा धडकणार आहे. दुपारी 12 वाजता या मोर्च्याची सुरुवात होणार आहे. तर या मोर्चासाठी राज्यभरातून एमआयएमचे कार्यकर्ते नागपुरात येण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे गेल्यावर्षी देखील औरंगाबाद ते मुंबई असा एमआयएमकडून मोर्चा काढण्यात आला होता.






'या' आहेत प्रमुख मागण्या!


मुस्लिमांना पाच टक्के आरक्षण देण्यात यावे.


वक्फ बोर्डाच्या जागा सुरक्षित करणे आणि  त्यावरील अनाधिकृत अतिक्रमण काढणे बाबत.


मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाला एक हजार कोटींचा अनुदान देण्याची मागणी.


झोपडपट्ट्यांना मालकी हक्काचे पट्टे देणे.


हातमाग आणि यंत्रमाग विणकरांना रोजगार देण्यासाठी आर्थिक मदत करावी.


जलील यांची लोकसभेत मागणी...


मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा खासदार इम्तियाज जलील यांनी आज लोकसभेत मांडला. धनगर आणि मराठा आरक्षण मिळाला पाहिजे. पण त्याबरोबरच मुस्लिमांना देखील 5 टक्के आरक्षण देण्याची मागणी जलील यांनी केली. तर जेव्हा आरक्षण मिळत नाही तेव्हा आपण न्यायालयात जातो. पण मुस्लिमांना पाच टक्के आरक्षण देण्याचा निर्णय खुद्द मुंबई उच्च न्यायालयाचाच आहे. आत्तापर्यंत अनेक समित्यांच्या घोषणा झाल्या. त्यांनी दिलेल्या अहवालावरून मुस्लिमांना शिक्षणात पाच टक्के आरक्षण देण्याचा निर्णय न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील मुस्लिमांना पाच टक्के आरक्षण देण्याची मागणी जलील यांनी केली.


राष्ट्रवादी-काँग्रेसवर टीका....


लोकसभेत मुस्लिम आरक्षणावर बोलताना इम्तियाज जलील यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षावर जोरदार टीकाही केली. राष्ट्रवादीचे खासदार आता लोकसभेत धनगर आरक्षणाची मागणी करत आहे. मात्र सत्तेत असताना वेगळी भूमिका आणि विरोधात आल्यानंतर वेगळी भूमिका या दोन्ही पक्षांकडून घेतली जात असल्याचा आरोपी जलील यांनी केला आहे.