Business Idea: आपल्या विशेष जेवणामुळे अनेक हॉटेल ओळखल्या जातात. तर काही हॉटेल भन्नाट अशा आगळ्यावेगळे उपक्रम राबवून ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. औरंगाबादमध्ये अशीच एक हॉटेल असून, या हॉटेल मालकाने ग्राहकांसाठी जबरदस्त ऑफर ठेवली आहे. हॉटेलमध्ये जेवणासाठी आलेल्या आई-वडिलांसोबत असलेल्या मुलांना पोटभर फुकट जेवण दिले जाते. 


औरंगाबाद-कन्नड रस्त्यावरील टोलनाक्या पुढील शिवराई फाट्याजवळ सद्गुरू कृपा हॉटेल लागते. अनिल बाबुराव वायडे असे या हॉटेलच्या मालकाचे नाव आहे. सुरवातीला छोटीशी नाश्त्याची हॉटेल सुरु करणाऱ्या वायडे यांनी दहा वर्षांपूर्वी डाळबट्टी बनवायला सुरवात केली. पाहता-पाहता त्यांचा व्यवसाय एवढा वाढला की, आज दिवसभरात 1 क्विंटल बट्टी आणि 50 किलो डाळीचे 200 लिटर वरण दिवसभरात लागते. पण यापेक्षा त्यांच्या जबरदस्त ऑफरमुळे येथे ग्राहकांची नेहमीच गर्दी पाहायला मिळते. कारण जेवणासाठी आलेल्या कुटुंबातील आई-वडिलांसोबत आलेल्या मुलांच्या जेवणाचे ते पैसे घेत नाही. त्यामुळे लोकं कुटुंबासोबत जेवण्यासाठी येथे नेहेमीच पसंती देताना पाहायला मिळतात. 


यामुळे देतात मुलांना मोफत जेवण... 


आपल्या हॉटेलमध्ये आलेल्या मुलांना जेवण मोफत देण्यामागचं कारण सांगताना अनिल वायडे म्हणतात की, बऱ्याच दा जेवणासाठी आलेल्या महिला थाळीचे जास्त पैसे लागतील म्हणून मुलांसमोर थाळी लावू देत नाही. त्यामुळे त्यांचही जेवण व्यवस्थित होत नाही. तर बऱ्याचवेळा सगळ्याच्या थाळीचे पैसे लागतील म्हणून निघून जातात. त्यामुळे आई-वडिलांसोबत असलेल्या लहान मुलांचे आपण पैसे न घेण्याचा आपण निर्णय घेतल्याच वायडे सांगतात. तसेच यामुळे आई-वडील सुद्धा निवांत जेवण करतात असेही वायडे म्हणाले. 


असा असतो मेनू... 


वायडे यांच्या हॉटेलमध्ये शाकाहारी जेवण मिळते. ज्यात गरमा-गरम डाळबट्टीचा समावेश आहे. चार प्रकारच्या डाळी, जिरा, मोहरी,अद्रक-लसूण अस सर्व मिळून वरण बनवले जाते. सोबतच शिरा, तरी,हिरवी मिरची आणि लिंबू कांदा सोबतीला असतो. 80 रुपयात पोटभर डाळबट्टी तुम्ही इथं खाऊ शकतात. त्यामुळे या हॉटेलमध्ये नेहेमीच गर्दी पाहायला मिळते.