Akola News : अकोला जिल्ह्यातील 248 शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळालाय. 2017 मधील छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून वंचित राहिलेल्या या शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या, असा ठोस आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला दिला आहेय. विशेष म्हणजे या सर्व शेतकऱ्यांना 2017 मध्ये अकोल्यात झालेल्या एका शासकीय कार्यक्रमात सरकारने कर्जमाफीची प्रमाणपत्र दिली होती. तत्कालीन पालकमंत्री डॉ. रणजीत पाटलांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला होता. अकोला जिल्ह्यातल्या तेल्हारा तालुक्यातल्या अडगाव बूजरूक येथील हे शेतकरी आहेत.

Continues below advertisement

मात्र, यानंतरही प्रत्यक्षात 2017 पासून या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालेली नव्हती. शासनाकडून सातत्याने पोर्टल समस्या, तांत्रिक अडचणी अशी कारणं दिली जात होती. मात्र, न्यायालयाने ही कारणं फेटाळून लावत सरकारची चांगलीच कानउघाडणी केलीय.

दरम्यान, 22 डिसेंबरपर्यंत आदेशाची अंमलबजावणी झाली नाही तर जबाबदार अधिकाऱ्यांवर अवमान कारवाईचा इशारा देखील कोर्टाने दिलाय. त्यामूळे तीन महिन्यात या 248 शेतकऱ्यांना सरकारला कर्जमाफी द्यावीच लागेल. अकोल्यातील शेतकऱ्यांसंदर्भात उच्च न्यायालयाने राज्य सरकारला लावलेली ही चपराक समजली जात आहे. मात्र उच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर मात्र शेतकरी बांधवामध्ये समाधान व्यक्त केलं जात आहे.

Continues below advertisement

खरीप पिकांच्या नुकसानीची दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत दिली जाणार- दत्तात्रय भरणे

राज्यात 60 लाख एकरपेक्षा अधिक क्षेत्राचं खरिपात अतिवृष्टीमुळे नुकसान झाल आहे. त्यामुळे राज्यात लवकरच राज्य सरकार ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबत प्रयत्नात असून केंद्र सरकारचे आणि राज्य सरकारचे निकष पूर्ण करावे लागणार आहे. झालेल्या खरीप  पिकांच्या नुकसानीची मदत दिवाळी पूर्वी शेतकऱ्यांना मदत दिली जाणार असल्याची ग्वाही राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. ते वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना पत्रकारांशी बोलत होते. राज्याचे कृषिमंत्री तथा वाशिमचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी वाशिम जिल्हा झालेल्या खरीप पिकाच्या नुकसानी पाहणी दरम्यान पत्रकारांशी संवाद साधत होते.

गेले आठवडाभर महाराष्ट्रात पावसाने हजेरी लावली आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात यामुळे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. साताऱ्यातील माण-खटाव तालुक्यांमध्ये यंदा पाऊस मोठ्या प्रमाणात झाला, ज्यामुळे नदी-नाले भरले. मात्र पिकांचे मोठे नुकसान झाले. शेतकरी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करत आहेत. सोलापूरमध्येही लाखो हेक्टरवरील खरीप पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले. बार्शी तालुक्यातील आगळगाव, उंबरगे या गावांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. सोलापूर जिल्ह्यात सोयाबीन, कांदा, उडीद, मका यांसारखी पिके उद्ध्वस्त झाली. सोलापूरच्या सांगोल्यातील कासारगंगा ओढ्यात दोन मुले वाहून गेली, ज्यात पंधरा आणि तेरा वर्षांच्या मुलांचा मृत्यू झाला. मराठवाड्यातही पावसाचा कहर सुरूच आहे. हिंगोली जिल्ह्यात पावणे तीन लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. लातूरमध्ये शेत शिवारात पाणी शिरले असून, अनेक पुलांचे नुकसान झाले आहे.