चौंडी येथे होणारी मंत्रिमंडळाची बैठक रद्द, मुंबईतच बैठक होणार; चंद्रकांत पाटलांची माहिती
Maharashtra Cabinet Meeting : अहिल्यानगरमध्ये होणाऱ्या बैठकीसाठी 42 मंत्री आणि त्यांचा स्टाफ जाणार होता. पण ती बैठक आता रद्द करण्यात आल्याची माहिती आहे.

पुणे : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मत्रिशताब्दी वर्षानिमित्त (Ahilyadevi Holkar Jayanti) चौंडीत होणारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक रद्द करण्यात आल्याची माहिती मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. ती बैठक मुंबईतच होणार असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले. 31 मे रोजी ही बैठक होणार होती.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या 300 व्या जयंतीचे निमित्त साधत त्यांचे जन्मस्थान असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील चोंडी येथे 31 मे रोजी कॅबिनेटची बैठक होणार होती. त्यासाठी राज्य मंत्रिमंडळातील 42 मंत्री आणि त्यांचा स्टाफ उपस्थित राहणार होता. या बैठकीच्या तयारीसाठी निविदाही काढण्यात आली होती. पण आता ही बैठक रद्द झाल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.
अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मत्रिशताब्दी वर्षानिमित्त अहिल्यादेवी होळकर यांचे राष्ट्रीय स्मारक उभारण्याबाबतही चर्चा सुरू आहे. राष्ट्रीय स्मारकाचा बृहत आराखडा तयार करण्याच्या सूचनादेखील मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागाला दिलेल्या आहेत.
पुण्यात 50 हजार धनगरी ढोलवादनाचा कार्यक्रम
अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त पुण्यामध्ये धनगरी नाद (Dhangari Naad Pragramme) कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी याबाबत माहिती दिली.
गोपीचंद पडळकर म्हणाले की, "अहिल्यादेवी होळकरांची 300 वी जयंती 31 मे रोजी साजरी करण्यात येणार आहे. त्या निमित्ताने पुण्यात 50 हजार धनगरी ढोल वादनाचा कार्यक्रम आयोजितल करण्यात आला आहे. पुण्यातील या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री अमित शाह यांना आमंत्रण दिलं आहे. त्यांनी या कार्यक्रमाला येण्याचं मान्य केलं आहे. तसेच या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निमंत्रण देणार आहोत. तसेच चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण आणि चंद्रकांतदादा पाटील हेदेखील येणार आहेत."
अहिल्याबाई होळकरांनी हिंदू धर्माचं आणि हिंदू मंदिरांचं संरक्षण केलं. त्यांच्या जयंतीचे 31 मे रोजी त्रिशताब्दी वर्ष आहे. अहिल्यादेवींचे काम हे जगभर प्रसिद्ध आहे. जगामध्ये महिला राज्यकर्त्या म्हणून त्यांच्या तोडीचं व्यक्तिमत्व इतिहासात सापडत नाही. सरकारच्या माध्यमातून त्यांच्या जयंतीचे अनेक कार्यक्रम साजरे केले जाणार आहेत.
मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये त्यांना अभिवादन करण्यासाठी 50 हजार धनगरी ढोल वाजवण्याचं आणि विश्वविक्रम करण्याचं अहिल्याभक्तांनी ठरवलं आहे. धनगर समाजातून ज्या काही परंपरा आहेत त्या स्वतंत्र आहेत. त्याच पद्धतीने धनगरी ढोल हा धनगरांच्या भावनेचा विषय आहे. त्याचमुळे अहिल्यादेवींच्या जयंतीच्या निमित्ताने धनगरी ढोल वादनाचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. हा कार्यक्रम विश्वविक्रमी होणार आहे.























