ZP च्या शाळेप्रती आपुलकी, मुलाच्या लग्नाचा मुहूर्त साधत सुरू केलं ‘कुसुमाग्रज ग्रंथालय’; माजी विद्यार्थ्याचा 'आदर्श'वत उपक्रम
शाळेचे मुख्याध्यापक गुंजाळ यांच्यासह शिक्षक अशोक मडके, ढोले गुरुजी आणि बापू आरले यांच्याकडे औपचारिकरित्या हा धनादेश सुपूर्द करण्यात आला.

अहिल्यानगर: जिल्ह्यातील शेवगाव तालुका येथील गदेवाडी गावचे भूमिपुत्र तसेच गदेवाडी विविध कार्यकारी सेवा संस्थाचे माजी चेअरमन रामनाथ लेंडाळ यांनी आपल्या मुलाच्या विवाहप्रसंगी (Marriage) समाजाला दिशा देणारा आदर्श उपक्रम राबविला आहे. सध्या विवाह समारंभांमध्ये अनावश्यक खर्च, दिखावा आणि स्पर्धात्मक खर्च वाढत असताना लेंडाळ यांनी हा खर्च टाळून तो शिक्षणासाठी वळविण्याचा निर्णय घेतला आहे. रामनाथ लेंडाळ यांनी आपल्या बालपणी ज्या शाळेत शिक्षण घेतले, त्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (School), गदेवाडी शाळेच्या गुणवत्तापूर्ण कार्याची दखल घेत शाळेच्या शैक्षणिक विकासासाठी पुढाकार घेतला. विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती वाढावी, ज्ञानाची गोडी लागावी आणि स्पर्धात्मक युगात ग्रामीण विद्यार्थ्यांनाही दर्जेदार सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने शाळेत सुसज्ज ‘कुसुमाग्रज ग्रंथालय’ उभारण्यासाठी त्यांनी 21 हजार रुपयांची रोख रक्कम धनादेशाद्वारे देणगी स्वरूपात दिली.
शाळेचे मुख्याध्यापक गुंजाळ यांच्यासह शिक्षक अशोक मडके, ढोले गुरुजी आणि बापू आरले यांच्याकडे औपचारिकरित्या हा धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी शाळेतील शिक्षकवर्ग, ग्रामस्थ तसेच मान्यवर उपस्थित होते. लेंडाळ यांच्या या उपक्रमामुळे शिक्षणासाठी समाजातील घटकांनी पुढे यावे, असा सकारात्मक संदेश गावातच नव्हे तर संपूर्ण तालुक्यात गेला आहे. रामनाथ लेंडाळ यांच्या या आगळ्यावेगळ्या आणि प्रेरणादायी उपक्रमाचे अहिल्यानगर जिल्ह्यात तसेच परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे. या देणगीबद्दल गावचे सरपंच, उपसरपंच, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांनी आभार मानले आहेत. तसेच बोधेगाव बीटचे विस्तार अधिकारी डॉ. शंकर गाडेकर आणि गटशिक्षणाधिकारी शैलजा राऊळ यांनीही या सामाजिक उपक्रमाचे विशेष कौतुक करत इतर नागरिकांनीही अशा प्रकारचे उपक्रम राबवावेत, असे आवाहन केले आहे.
शिक्षण हाच समाजपरिवर्तनाचा पाया
दरम्यान, यावेळी मनोगत व्यक्त करताना रामनाथ लेंडाळ म्हणाले, “शिक्षण हाच खरा समाजपरिवर्तनाचा पाया आहे. आपल्या मुला-मुलींच्या विवाहात होणारा अनावश्यक खर्च टाळून ती रक्कम जर जिल्हा परिषद शाळांच्या विकासासाठी देणगी स्वरूपात दिली, तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी ती मोठी गुंतवणूक ठरेल. या निधीतून डिजिटल वर्ग, ग्रंथालय तसेच इतर भौतिक सुविधा उपलब्ध होऊन शाळेचा सर्वांगीण विकास साधता येईल.” रामनाथ लेंडाळ यांचा हा उपक्रम केवळ देणगीपुरता मर्यादित न राहता सामाजिक जाणीव जागवणारा आणि इतरांसाठी प्रेरणादायी ठरत असून, “दिखाव्यापेक्षा शिक्षणाला प्राधान्य” देण्याचा आदर्श समाजासमोर ठेवणारा आहे.
























