औरंगाबाद : औरंगाबाद-जालना महामार्गावर ऑटो-रिक्षा आणि कारमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. यातील पाच जण एकाच कुटुंबातील आहेत. या अपघातात चार जण जखमी झाले आहेत. औरंगाबादहून जालन्याकडे भरधाव वेगात येणाऱ्या टोयोटा कार चालकाचा ताबा सुटला आणि कार विरुद्ध दिशेला जाऊन समोरून येणाऱ्या ऑटो रिक्षाला धडकली. यामध्ये रिक्षात बसलेले एकाच कुटुंबातील पाच जण जागीच ठार झाले. मृतक सगळेच जालन्यातील रहिवासी आहेत. हा अपघात बदनापूरपासून 8 किमी अंतरावर घडला. मृतांमध्ये सहा महिन्यांच्या बालकाचा समावेश आहे. तसेच अपघातातील चार जखमींना औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.


औरंगाबाद-जालना महामार्गावर औरंगाबादहून जालन्याकडे चाललेल्या कार चालकाचा गाडीवरचा ताबा सुटला. हा अपघात एवढा भीषण होता की कारने रिक्षाला धडक दिल्यानंतर रिक्षा हवेत उडाली. सोबतच रिक्षातील लोक देखील काही फुट वर हवेत उडाले.

औरंगाबाद-जालना मार्गावर हा अपघात आज सकाळी 9.45 च्या सुमारास झाला. औरंगाबाद-जालना रोडवरील शेकटा गावाजवळ हा अपघात झाला. माहितीनुसार आज (बुधवार) सकाळी पावणे दहा वाजण्याच्या सुमारास जालना येथून निघालेला अपेरिक्षा औरंगाबाद दिशेकडे शेकटा शिवारातील अमृतसर पेट्रोलपंप समोरून जात होता. त्याच वेळी औरंगाबाद दिशेने भरधाव वेगाने येणारी कारदुभाजकावरून विरुद्ध दिशेला येऊन रिक्षावर वेगाने धडकली. या अपघातात रिक्षातील सर्व प्रवाशी चिरडले, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.