Maharashtra Politics: विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर शिवसेना ठाकरे गटात (Shivsena Thackeray Group) मोठी अस्वस्थता आहे. अनेकांना त्यांच्या राजकीय भवितव्याची चिंता आहे. दरम्यान ठाकरे गटात मोठी खळबळ उडवून देणारी माहिती समोर आली आहे. उद्धव ठाकरेंकडील (Uddhav Thackeray) 6 खासदार शिंदे गटाच्या (Shivsena Shinde Group) संपर्कात असल्याची माहिती विश्वासनीय सूत्रांनी एबीपी माझाला दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून शिवसेना शिंदे गटाच्या ऑपरेशन टायगरची (Shivena Opration Tiger) चर्चा रंगली आहे. ऑपरेशन टारगरमध्ये ठाकरे गटाचे आणि काँग्रेसचे अनेक नेत्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश होणार असल्याचं सांगितलं जात आहे. याचदरम्यान शिवसेनेकडून ऑपरेशन टायगरची तयारी आता पूर्ण झाल्याचं समोर आलं आहे. यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे 6 खासदार येत्या संसदेच्या अधिवेशनाच्या आधी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून ठाकरे गटाचे नऊ पैकी सहा खासदार शिंदे गटात दाखल होऊ शकतात. आगामी संसदेच्या अधिवेशनाआधी ही मोहीम फत्ते करण्याच्या हालचाली सुरु असल्याची सूत्रांची माहिती आहे. ऑपरेशन टायगरची चर्चा ही अनेक दिवसांपासून होती. पण खासदाराचं तळ्यात मळ्यात सुरू होतं त्याला कारण पक्षांतर बंदी कायदा…या कायद्यातून वाचायचं असेल तर ठाकरेंचे नऊ पैकी सहा खासदार फुटणं आवश्यक होतं. अन्यथा फुटीर गटावर पक्षांतर बंदी कायद्यानुसार कारवाई केली जाऊ शकत होती. त्यामुळे पक्षांतरबंदी कायद्यातून वाचण्यासाठी 6 खासदारांचा आकडा महत्वाचा होता. त्यामुळे एकूणच खासदारांचे मन वळवण्यासाठी देखील वेळ घेतला गेला. अशात, अखेर 6 खासदारांचे मन वळवण्यात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला यश आले असून पडद्यामागं पूर्णपणे जुळणी झाल्याची माहिती आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे काही आमदारही संपर्कात-
सहा खासदार शिंदे गटात जाण्यास तयार असून लवकरच पक्ष प्रवेश होणार असल्याचं कळतंय. याला भाजपची देखील शिंदेंना साथ असल्याची माहिती आहे. सोबतच, काही आमदार देखील संपर्कात असल्याची माहिती आहे. मात्र, अद्याप यासंदर्भात निर्णय झाला नसल्याची माहिती आहे…
ठाकरे गटाची साथ खासदार का सोडू शकतात?
- पुढील 5 वर्ष महायुतीचं मजबूत सरकार असल्याने अनेक खासदारांना आपल्या भविष्याची चिंता…प्रामुख्याने निधी मिळवण्यासाठी अडचण…केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे सरकार महायुतीचं असल्याने त्याचा फायदा
- पक्ष आणि चिन्हासंदर्भातला मुद्दा गौण…प्रमुख कारण म्हणजे एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेनं निवडणूक लढली आणि लोकांनी त्यांना स्विकारलं. सोबतच, विधानसभा निवडणुकीत त्याची प्रचिती आली. शिवसेनेला मोठा विजय...अशात, पक्ष आणि चिन्हाचा मुद्दाच उरलेला नाही.
- केंद्रात भाजपची साथ असल्याने विकास कामांना गती मिळण्यास मदत…सोबतच, निधी मिळण्यास अडचणी नाहीत.