मुंबई : आपल्याच ड्रेस डिझायनरला कथित मारहाण केल्याप्रकरणी मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीला कोर्टात हजर न राहिल्याबद्दल जामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे. तसंच प्राजक्ता माळी यांना यापूर्वीच्या सुनावणीत एक हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. या निर्देशानंतरही त्या कोर्टातही हजर राहिल्या नाही तर त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरन्ट काढण्याच्या सूचनाही न्यायालयाने दिल्या आहेत. मात्र अभिनेत्री प्राजक्ता माळी यांचे वकील अॅड. प्रताप परदेशी यांनी कनिष्ठ न्यायालयातील या सुनावणीला जुलै महिन्यातच ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाने स्थगिती दिल्याचा दावा केला आहे. ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतरही कनिष्ठ न्यायालयात या प्रकरणाची पुन्हा सुनावणी कशी होऊ शकते असा प्रश्नही अॅड परदेशी यांनी आमच्या प्रतिनिधींकडे केला.


ठाणे कोर्टात अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या विरोधातील तक्रारदाराने आणि त्यांच्या वकिलाने 'एबीपी माझा'ला खोटी माहिती देऊन प्राजक्ता माळी यांची बदनामी केल्याचा आरोपही अॅड परदेशी यांनी केला आहे. त्यावर तक्रारदार जान्हवी मनचंदा यांचे वकील अॅड सचिन पवार यांनी, ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाने दिलेल्या स्थगितीचा आदेश प्राजक्ता माळी यांच्याकडून किंवा त्यांच्या वकिलाकडून ठाणे दंडाधिकारी न्यायालयाला काहीही कळवण्यात आलेलं नसल्याचा दावा केला. त्यामुळेच ठाणे दंडाधिकारी न्यायालयाने फक्त दंड न आकारता जामीनपात्र अटक वॉरंट बजावल्याचा दावा केला. एवढंच नाही तर पुढील सुनावणीत अजामीनपात्र अटक वॉरंट काढण्याची ताकीदही दिली.

5 एप्रिल 2019 रोजी मिरारोड इथल्या मोनार्क स्टुडिओमध्ये एका मराठी हास्य रिअॅलिटी शोच्या दरम्यान हा सारा प्रसंग घडला. प्राजक्ताचा एक ड्रेस दिग्दर्शकाने रिजेक्ट केल्याने वाद सुरु झाला. दुसरा ड्रेस घालण्यास राजी नसलेल्या प्राजक्ताने स्वत: कात्री घेऊन डिझायनर ड्रेसमध्ये छेडछाड केल्याने दोघींमध्ये वाद झाला आणि अखेरीस प्राजक्ताने सारा राग आपल्यावर काढला असा डिझायनर जान्हवीचा आरोप आहे. या वादानंतर व्हॅनिटी व्हॅनमध्ये बोलावून प्राजक्ताने आपल्याला मारहाण केली असा आरोप करत जान्हवीने प्राजक्ता माळीविरोधात काशिमिरा पोलीस स्थानकात रितसर तक्रार नोंदवली आहे. प्राजक्ता माळीने मात्र या सर्व आरोपांचं खंडन करत जान्हवीने स्वत:चं स्वत:ला इजा करुन आपल्याविरोधात खोटे आरोप लावल्याचा दावा केला आहे.

तक्रारदार ड्रेस डिझायनरने फक्त पोलिसात तक्रार न देता स्वतः न्यायालयात फौजदारी दाखल केली आहे. त्या प्रकरणाच्या सुनावणीसाठी प्राजक्ता माळी यांनी कोर्टात हजर राहावं यासाठी वारंवार प्राजक्ताला समन्स जारी करण्यात आलं होतं. मात्र प्राजक्ता माळी किंवा त्यांचे वकील एकदाही कोर्टात हजर झाले नाहीत. मात्र ठाणे दंडाधिकारी कोर्टात सुरु असलेल्या या खटल्याविरोधात प्राजक्ताच्या वतीने जुलै महिन्यातच ठाणे जिल्हा आणि सत्र न्यायालयात याचिका दाखल करुन कनिष्ठ न्यायालयातील सुनावणीसाठी स्थगिती घेण्यात आली आहे. मात्र या स्थगिती आदेशाची प्रत कनिष्ठ न्यायालयात अजूनही न पोहोचल्यामुळे कनिष्ठ न्यायालयातील सुनावणी सुरुच आहे.

VIDEO | अॅड. सचिन पवार, तक्रारदार जान्हवी मनचंदाचे वकील