9 Hours Web Series Review : भारतीय सिने-प्रेक्षकांमध्ये दाक्षिणात्य सिनेमांची चांगलीच क्रेझ आहे. हीच बाब लक्षात घेऊन डिस्ने प्लस हॉटस्टारने दाक्षिणात्य वेबसीरिजची निर्मिती करण्याची मालिकाच सुरु केली आहे. हॉटस्टारची '9 Hours' ही वेबसीरिज त्यापैकीच एक असून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या सीरिजमध्ये प्रेक्षकांना अॅक्शन, थरार-नाट्य पाहायला मिळत आहे. निरंजन कौशिक आणि जैकब वर्घेसने या सीरिजच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.


'9 Hours' या वेबसीरिजमध्ये (9 Hours Web Series Cast) लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेता तारका रत्न, अजय विनोद कुमार आणि रवी वर्मा मुख्य भूमिकेत आहेत. तसेच मधू शालिनी, प्रीती असरानी, ​​मोनिका रेड्डी हे कलाकारदेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. ही सीरिज हिंदी, तामिळ, कन्नड, मराठी आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित झालेली आहे. 


'9 अवर्स' या वेबसीरिजचं कथानक काय? (9 Hours Web Series Story)


शहरातील विविध भागात असलेल्या तीन बॅंकांमध्ये एकाच दिवशी काही दरोडेखोरांनी दरोडा टाकला आहे. त्यामुळे शहरात भीतीदायक वातावरण निर्माण झालं आहे. दरम्यान या तिन्ही बॅंकांमधून दरोडेखोर  बाहेर येण्याची वाट पोलीस पाहत आहेत. मात्र या तीन बँकांपैकी दोन बँकांतून दरोडेखोर पळून गेले असले तरी एका बॅंकेत मात्र ते अडकले आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत दरोडेखोर पळून जाऊ नयेत, असा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. आता पोलिसांच्या या खेळात कोण अडकणार आणि या तीन चोरींमागचा खरा सूत्रधार कोण हे प्रेक्षकांना सीरिज पाहिल्यावर कळेल. 


'9 अवर्स' या वेबसीरिजबद्दल जाणून घ्या... (9 Hours Web Series Review)


दरोडा, चोरी असे शब्द ऐकल्यानंतर खरंतर मनी हाईस्ट, धूम, प्लेयर्स हे सिनेमे (Movies) आणि वेबसीरिज (Web Series) डोळ्यासमोर येतात. आता याच जॉनरची '9 अवर्स' ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ही वेबसीरिज पाहताना चोरी का केली गेली, त्यामागचा खरा सूत्रधार कोण, एकाचवेळी तीन ठिकाणी चोरी करण्यामागचा हेतू काय असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडतात. 


'9 अवर्स' (9 Hours Web Series)या वेबसीरिजचं कथानक सुरुवातीला संथगतीने पुढे सरकतं. पण दुसऱ्या ते तिसऱ्या भागापर्यंत ही वेबसीरिज चांगलाच वेग घेते. सीरिज पाहताना प्रेक्षक विचारदेखील करू शकणार नाहीत असे ट्विस्ट या सीरिजमध्ये आहेत. सीरिजमध्ये असणाऱ्या सर्वचं कलकारांनी कौतुक करण्यासारखं काम केलं आहे. जुनी संकल्पना नव्याने मांडण्यात दिग्दर्शनाकाने कोणतीही कसर सोडलेली नाही.