Monsoon Raises Infection Risk: पुणे : पावसाळा सुरू होताच ताप, सर्दी-खोकला (Health), डेंग्यू, मलेरिया, लेप्टोस्पायरोसिस तसेच जलजन्य संसर्गाचे प्रमाण वाढते. सामान्य व्यक्तींच्या तुलनेत रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असलेल्या, कर्करोगावर उपचार घेत असलेल्या रुग्णांसाठी (Monsoon) हे संसर्ग अधिक गंभीर ठरू शकतात. विशेषतः लहान मुलं, गर्भवती महिला, वयोवृद्ध केमोथेरपी, रेडिओथेरपी किंवा बोन मॅरो ट्रान्सप्लांटनंतर रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्याने संसर्गाचा धोका अनेक पटींनी वाढतो.

Continues below advertisement

मान्सूनमध्ये आरोग्याची कशी काळजी घ्यायची? (Monsoon Raises Infection Risk Experts Advise Extra Care)

केमोथेरपीमुळे शरीरातील पांढऱ्या रक्तपेशी (व्हाईट ब्लड सेल्स) कमी होऊ शकतात. या पेशी शरीराला संसर्गापासून संरक्षण देतात. त्यामुळे किरकोळ वाटणारा ताप, घसा दुखणे, खोकला, जुलाब किंवा लघवी करताना होणारी जळजळ यांसारखी लक्षणेही गंभीर संसर्गाचे संकेत असू शकतात. अशा वेळी स्वमर्जीने औषधं घेण्याऐवजी तातडीने तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

पावसाळ्यात दूषित पाणी आणि अन्नामुळे होणारे संसर्ग टाळण्यासाठी उकळून किंवा शुद्ध केलेले पाणी पिणे, ताजे व स्वच्छ शिजवलेले अन्न खाणे, रस्त्यावरील खाद्यपदार्थ टाळणे आणि फळे-भाज्या नीट धुऊन वापरणे गरजेचे आहे. त्याचबरोबर वारंवार हात धुणे, गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणे आणि वैयक्तिक स्वच्छता राखणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

Continues below advertisement

पावसामुळे अनेक रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात जाणे टाळतात. मात्र, केमोथेरपी किंवा फॉलो-अप तपासण्यांमध्ये खंड पडल्यास आजाराची तीव्रता वाढू शकते. त्यामुळे डॉक्टरांनी दिलेल्या वेळापत्रकानुसार उपचार सुरू ठेवणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले.डेंग्यू, मलेरिया किंवा इतर संसर्गजन्य आजारांची लक्षणे दिसल्यास कॅन्सर रुग्णांनी विलंब न करता तपासणी करून घ्यावी. वेळेवर निदान आणि उपचार केल्यास गंभीर गुंतागुंत टाळता येते.

डॉ. अभिषेक पुरकायस्थ (रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट टीजीएच ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटर, तळेगाव, पुणे) सांगतात की, कॅन्सर रुग्णांसाठी पावसाळ्यात सर्वात मोठा धोका म्हणजे संसर्ग. १००.४°F (३८°C) किंवा त्यापेक्षा जास्त ताप, सतत खोकला, श्वास घेण्यास त्रास, जुलाब किंवा कोणतीही असामान्य लक्षणे दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. त्वरित उपचार घेतल्यास गंभीर गुंतागुंत टाळता येऊ शकते.केमोथेरपी, टार्गेटेड थेरपी, इम्युनोथेरपी किंवा बोन मॅरो ट्रान्सप्लांटनंतर अनेक रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती तात्पुरती कमकुवत झालेली असते. त्यामुळे पावसाळ्यात होणारा अगदी साधा संसर्गही काही रुग्णांमध्ये गंभीर स्वरूप धारण करू शकतो. वेळेवर निदान, उपचारांचे नियमित पालन आणि डॉक्टरांनी दिलेल्या वेळापत्रकानुसार केमोथेरपी किंवा इतर उपचार सुरू ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. योग्य काळजी घेतल्यास पावसाळ्यातही कर्करोगावरील उपचार सुरक्षितपणे आणि परिणामकारकपणे सुरू ठेवता येतात.

पुण्यातील अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालयातील इंटरनल मेडिसिन एक्सपर्ट डॉ. संजय नगरकर म्हणाले की, पावसाळ्यात व्हायरल संसर्ग, डेंग्यू, मलेरिया, लेप्टोस्पायरोसिस तसेच दूषित पाणी व अन्नातून होणाऱ्या संसर्गाचे प्रमाण वाढते. लहान मुलं, गर्भवती महिलांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते त्यामुळे त्यांना ताप, खोकला, जुलाब, उलट्या किंवा श्वास घेण्यास त्रास यांसारखी लक्षणे दिसल्यास घरगुती उपचारांवर अवलंबून न राहता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तसेच गाळुन,उकळून थंड केलेले पाणी पिणे, ताजे व स्वच्छ अन्न पदार्थांचे सेवन करणे, वारंवार हात धुणे, गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करणे आणि डासांपासून संरक्षण करणे या साध्या उपायांनी संसर्गाचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करता येतो.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'मी पंख्याला लटकून...'; बिग बॉसमध्ये सलमान खाननं झाप झाप झापलं, 'या' कंटेस्टेंटनं केलेला स्वतःला संपवण्याचा प्रयत्न