Akshay Tritiya 2023 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा मानला जाणारा मुहूर्त म्हणजेच, अक्षय्य तृतीया (Akshay Tritiya 2023). हिंदू धर्मात या सणाला विशेष महत्त्व आहे. विवाह, गृहप्रवेश यांसारख्या शुभ कार्यासाठी हा दिवस महत्त्वाचा मानला जातो. वैशाख शुक्ल पक्षाच्या तृतीयेला म्हणजेच, तिसऱ्या दिवसी अक्षय्य तृतीयेचा सण साजरा केला जातो. या वर्षी 22 एप्रिल 2023 रोजी अक्षय्य तृतीया हा सण आहे. अक्षय्य तृतीयेला (Akshay Tritiya) आखा तीज किंवा अक्षय तीज असंही म्हणतात. याच संदर्भात यावर्षीचा शुभ मुहूर्त नेमका काय आहे ते जाणून घेऊयात. 


अक्षय्य तृतीया 2023 पूजा मुहूर्त 


हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार, अक्षय्य तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णूंनी परशुराम आणि हयग्रीवाचा अवतार घेतला होता, असं म्हटलं आहे. या दिवशी अक्षय्य तृतीयेला लक्ष्मी नारायण आणि कलशाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. यंदाचा पूजेचा शुभ मुहूर्त 22 एप्रिल रोजी सकाळी 07.49 पासून दुपारी 12.20 पर्यंत असणार आहे.


पूजेचा एकूण कालावधी 4 तास 31 मिनिटे 


तृतीया तिथी प्रारंभ - 22 एप्रिल 2023 सकाळी 07:49 पासून


तृतीया समाप्ती - 23 एप्रिल 2023 सकाळी 07:47 पर्यंत


अक्षय्य तृतीयेचं महत्त्व काय?


हिंदू आणि जैन धर्मात अक्षय्य तृतीयेला विशेष महत्त्व आहे. या दिवशी कोणताही विचार न करता कोणतंही नवीन काम सुरू केलं जातं. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी, घर किंवा फ्लॅट खरेदी करण्यासाठी, घरात प्रवेश करण्यासाठी, दागिने, कपडे, वाहने इत्यादी खरेदी करण्यासाठी, लग्न समारंभ, मुंज समारंभ इत्यादीसाठी हा शुभ दिवस मानला जातो. तसेच तुम्हाला आवडणारं कोणतंही काम तुम्ही मोकळेपणानेया दिवशी करू शकता, कोणत्याही प्रकारची खरेदी करू शकता. 


अक्षय्य तृतीयेचं पौराणिक महत्त्व


अक्षय्य तृतीयेला पौराणिक महत्त्वही आहे. या दिवशी सत्ययुग आणि त्रेतायुग सुरू झाल्याचं मानलं जातं. द्वापर युगाचा शेवट आणि महाभारत युद्धाचा शेवटही याच तारखेला झाला. भगवान विष्णूचा नर नारायण अवतार, हयग्रीव, परशुराम यांचा अवतारही याच तिथीला झाला.


व्रत आणि उपासनेलाही विशेष महत्त्व


जैन धर्माचे पहिले प्रवर्तक ऋषभदेव जी महाराज यांनी अनेक वर्षांच्या तपश्चर्येनंतर या दिवशी उसाच्या रसाने उपवास सोडला. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी व्रत आणि उपासनेलाही विशेष महत्त्व आहे. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा पांढरे कमळ किंवा पांढरं गुलाबाचं फूल देऊन केली जाते. या दिवशी पूजा केल्यानंतर जव किंवा गव्हाचा सत्तू, काकडी, हरभरा डाळ यांचा प्रसाद वाटला जातो. पूजेनंतर ब्राह्मणाला फळे, फुले, भांडी, कपडे इत्यादी दान केलं जातं.


विविध वस्तूंचे दान करण्याची प्रथा 


अक्षय्य तृतीया हा वसंत ऋतूचा शेवट आणि उन्हाळ्याच्या प्रारंभाचा दिवस असल्याने या दिवशी उन्हाळ्यात पाण्याने भरलेली भांडी, पंखे, स्टँड, छत्री, कानटोप, साखर, तांदूळ, मीठ इत्यादींचं दान केलं जातं.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)