आयपीएल अखेर महाराष्ट्रातून आऊट
एबीपी माझा वेब टीम | 27 Apr 2016 07:39 AM (IST)
मुंबई : दुष्काळामुळे 1 मे नंतरचे आयपीएलचे सामने महाराष्ट्रातून आऊट झाले आहेत. आयपीएल सामने मुंबई-पुण्यातच खेळवले जावेत, अशी मागणी करणारी मुंबई आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. महाराष्ट्रात पाण्याची टंचाई असताना खेळपट्टी तयार करण्यासाठी लाखो लीटर पाण्याची नासाडी होते, त्यामुळे आयपीएलचे सामने महाराष्ट्राबाहेर व्हावेत, अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयापुढे आली होती. उच्च न्यायालयानेही याचिकेत तथ्य असल्याचं नमूद केलं आणि 30 एप्रिलनंतरचे महाराष्ट्रातील नियोजित सामने इतर राज्यात खेळवण्याचे आदेश दिले. याच निर्णयाविरोधात एमसीएने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मुंबई इंडियन्स आणि रायझिंग पुणे संघांमध्ये 1 मे रोजी होणारा आयपीएलचा सामना हा पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार पुण्यातच होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयानं तो सामना पुण्यात खेळवण्यासाठी बीसीसीआयला परवानगी दिली आहे. मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने एमसीए याचिका फेटाळल्याने 1 मे नंतरचे सामने महाराष्ट्राबाहेरच खेळवले जाणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे.