मुंबई : रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यातील द्वंद्वात अखेर रोहितची सरशी झाली. रोहितच्या मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेन्जर्स बंगलोरला सहा विकेट्सनी हरवून यंदाच्या मोसमातला दुसरा विजय साजरा केला. तर बंगलोरचा यंदाच्या मोसमातला हा दुसरा पराभव ठरला.


 

वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात बंगलोरने मुंबईला 171 धावांचं आव्हान दिलं होतं. त्याचा पाठलाग करताना रोहितने सलामीला 44 चेंडूमध्ये 4 चौकार आणि तीन षटकारांसह 62 धावांची खेळी करून मुंबईच्या विजयाचा पाया घातला. मुंबईसाठी अंबाती रायुडूने 31 धावांची तर जोस बटलरनं 28 धावांची खेळी केली. मग कायरन पोलार्डच्या फटकेबाजीनं मुंबईचा विजय निश्चित केला. पोलार्डनं 19 चेंडूंमध्ये 4 चौकार आणि तीन षटकारांसह नाबाद 40 धावा कुटल्या.

 

त्याआधी बंगलोरने 20 षटकांत सात बाद 170 धावा केल्या होत्या. मुंबईकडून जसप्रीत बुमराने तीन तर हार्दिक पंड्याने दोन विकेट्स काढल्या. मिचेल मॅकलेहाननेही एक विकेट काढून मुंबईच्या विजयाला हातभार लावला.