Sharayu Sonawane On Zee Marathi Paaru Serial: झी मराठीवरची (Zee Marathi) लोकप्रिय मालिका 'पारू'नं (Paaru Marathi Serial) अचानक प्रेक्षकांचा निरोप घेतला, त्यामुळे मोठा संभ्रम निर्माण झाला होता. टीआरपीच्या शर्यतीत अव्वल असूनही मालिका (Marathi Serial) का संपवली? बरं, कथानक अर्ध्यातच सोडून मालिका कशी संपवली? असे अनेक प्रश्न सर्वांना पडलेले. एवढंच काय तर, मालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शिक करण्यात येणार होता, पण काही कारणास्तव तोसुद्धा प्रसारित करण्यात आला नाही, त्यामुळे चर्चांना आणखीनंच उधाण आलं. अनेकांनी तर 'पारू' मालिका अशी अर्ध्यातच बंद केल्यामुळे नाराजी व्यक्त केलेली. मालिकेवर भरभरून प्रेम केलेल्या प्रेक्षकांच्या मनात मोठा संभ्रम निर्माण झालेला. पण, नेमकं काय झालं? यामागचं कोणतंही कारण समोर आलं नव्हतं. तसेच, कुणीच नेमकं काय घडलं? यावर भाष्य केलं नव्हतं. अशातच आता 'पारू' मालिकेत मुख्य भूमिकेत झळकलेली अभिनेत्री शरयू सोनावणेनं (Actress Sharayu Sonavane) समोर येत, काही गोष्टी सांगितल्या आहेत. तसेच, प्रेक्षकांची माफीसुद्धा मागितली आहे.
झी मराठीवरील 'पारू' ही मालिका 12 फेब्रुवारी 2024 पासून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली. या मालिकेनं जवळपास दोन वर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. पण, 10 फेब्रुवारीनंतर अचानक ही मालिका बंद झाली. कथानक अर्ध्यातच सोडून मालिका बंद झाली. या मालिकेचा शेवटचा एपिसोडही प्रसारित करण्यात आला नाही. त्यामुळे प्रेक्षकही बुचकळ्यात पडले. अशातच आता यावर अभिनेत्री शरयू सोनावणेनं एक व्हिडीओ शेअर करुन प्रतिक्रिया दिली आहे.
अचानक मालिका बंद झाल्याबाबत अभिनेत्री शरयू सोनावणे काय म्हणाली?
"नमस्कार! मी शरयू सोनावणे म्हणजेच तुम्हा सगळ्यांची लाडकी पारू! खूप प्रतीक्षेनंतर मी हा व्हिडिओ माझ्या चाहत्यांसाठी, प्रेक्षकांसाठी शेअर करतेय. कारणंही तसंच आहे. मला गेल्या काही दिवसांपासून अनेक मेसेज, फोन कॉल्स येत आहेत. सगळे मला विचारत आहेत की, 'पारू' मालिका अचानक का बंद झाली? तर, मला तुम्हाला सर्वांना हेच सांगायचं आहे की, 10 फेब्रुवारी 2026 रोजी 'पारू' मालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शित करण्यात आला. सातशे भागांच्या प्रवासात तुम्ही आम्हाला भरपूर साथ दिली, आमच्यावर भरभरून प्रेम केलंत…तुमच्या प्रेमामुळेच आम्ही इतक्या लांबचा पल्ला गाठू शकलो. सतत दोन वर्षे टीआरपी चांगला असूनही ही मालिका अचानक बंद होणं ही सर्वांसाठीच अनपेक्षित गोष्ट आहे आणि अर्थातच धक्कादायक गोष्ट आहे..."
शरयू सोनावणेनं प्रेक्षकांची माफीसुद्धा मागितली आणि पुढे म्हणाली की, "पारू मालिका बंद होतेय, याची पूर्व कल्पना आम्हाला निर्मात्यांकडून दिली गेली नव्हती. आजपर्यंत मराठी इंडस्ट्रीमध्ये असा कुठल्याच मालिकेचा शेवट झाला नाही. जसा पारू मालिकेचा झाला. त्यामुळे मी तुम्हा सगळ्यांची मनापासून माफी मागते. कारण पारू मालिकेचा शेवटचा भागही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू शकलो नाही. प्रदर्शित करू शकलो नाही. काही तांत्रिक अडचणी आणि प्रोडक्शनमुळे या मालिकेचा शेवटचा भागही प्रदर्शित नाही झाला... पारू ही मालिका बंद झाली असली तरी आपलं नातं, तुमचं माझ्यावर असलेलं प्रेम हे कायम माझ्यासोबतच राहील. यासाठी मी कायमच तुमची ऋणी राहीन. लवकरच एका नव्या भूमिकेत, नव्या रुपात भेटू... खूप खूप आभार..."
महत्त्वाच्या इतर बातम्या :
