Ambarnath: मराठी कलाकार नाट्यगृहांच्या स्वच्छतेवरून, व्यवस्थेवरून कायम सजग असल्याचं दिसतं. मात्र, अनेकदा भर प्रयोगात काहीतरी अडचणी, अनुभव येतात ज्यामुळे प्रेक्षकांचा हिरमोड होतो. असंचं काहीसं अंबरनाथमधील धर्मवीर आनंद दिघे नाट्यगृहात शनिवारी घडलं. अंबरनाथमध्ये  नाट्यप्रयोगादरम्यान मोठा गोंधळ उडाल्याची घटना समोर आली आहे. लोकप्रिय अभिनेत्री विशाखा सुभेदार यांच्या ‘दमयंती दामले’ या नाटकाचा प्रयोग सुरू असताना मध्यंतरानंतर नाट्यगृहाचा पडदाच उघडेनासा झाला. त्यामुळे सुमारे अर्धा तास नाट्यप्रयोग ठप्प राहिला आणि प्रेक्षकांमध्ये नाराजीचा सूर उमटला.

Continues below advertisement

एकही टेक्निशियन नव्हता, आयोजनावर प्रश्नचिन्ह

मिळालेल्या माहितीनुसार, मध्यंतरानंतर प्रयोग पुन्हा सुरू करण्यासाठी कलाकार तयार होते, मात्र पडदा उघडण्यासाठी आवश्यक यंत्रणा काम करत नव्हती. विशेष म्हणजे, त्या वेळी नाट्यगृहात एकही टेक्निशियन उपस्थित नव्हता. परिणामी कलाकारांनाच पुढाकार घेत हाताने पडदा उघडावा लागला आणि त्यानंतर नाट्यप्रयोग पुन्हा सुरू करण्यात आला. या घटनेपूर्वीच नाटकाच्या साउंड सिस्टीममध्येही बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र नाटकाच्या साउंड टीमने तत्परता दाखवत तो प्रश्न सोडवला आणि प्रयोग सुरू ठेवला. तरीही, पडद्याच्या बिघाडामुळे संपूर्ण आयोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.

प्रेक्षकांची नाराजी 

नाटकाचा प्रयोग संपल्यानंतरही परिस्थिती बदलली नाही. अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी स्वतः पुढाकार घेत हातानेच पडदा बंद केला. या घटनेमुळे उपस्थित नाट्यरसिक आणि आयोजकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. आयोजक आप्पा कुलकर्णी यांनीही याबाबत संताप व्यक्त करत, इतक्या मोठ्या नाट्यगृहात मूलभूत सोयीसुविधा आणि तांत्रिक कर्मचारी उपलब्ध नसणे ही गंभीर बाब असल्याचे सांगितले. “नाटक सुरू असताना अशी अडचण येणं अत्यंत लाजिरवाणं आहे,” असे ते म्हणाले. या प्रकारामुळे अंबरनाथ पालिकेच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, कलाकार आणि शेकडो प्रेक्षकांसमोर पालिकेची नाचक्की झाली. दरम्यान, नाटक संपल्यानंतर आलेल्या टेक्निशियनने पडद्याचा बिघाड दुरुस्त करण्याचे काम सुरू केले.

Continues below advertisement