Chala Hawa Yeu Dya : झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवरील 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. सध्या या मालिकेला 10 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल विशेष भाग सुरु आहेत. त्यातच सागर कारंडे (Sgar Karande) याने मंचावर एका भावनिक पत्राचं वाचन केलं. काही दिवसांपासून चला हवा येऊ द्या प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं सांगण्यात येत होतं. तसेच डॉ.निलेश साबळे आणि कुशल बद्रिके यांनी देखील हा कार्यक्रम सोडल्याचं समोर आलं.
त्यानंतर आता पुन्हा एकदा हा कार्यक्रम बंद होणार असल्याच्या चर्चा सुरु आहे. अद्याप वाहिनीकडून यासंदर्भात कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आले नाही. 'चला हवा येऊ द्या'च्या ऐवजी नवीन मालिका सुरू होणार आहेत. 'चला हवा येऊ द्या'चा कॅप्टन ऑफ द शिप असलेला डॉ. निलेश साबळे याने काही दिवसांपूर्वीच शो सोडला. त्यानंतर या मालिकेचे सूत्रसंचालन श्रेया बुगडे, कुशल बद्रिके करताना पाहायला मिळालं होतं.
सागरने केलं भावनिक पत्राचं वाचन
सागर कारंडेने पोस्टमनच्या भूमिकेत अनेक भावनिक पत्रांचं वाचन चला हवा येऊ द्या मंचावर केलं आहे. यावेळी आता त्याने चला हवा येऊ द्या अन् झी मराठीसाठीच या पत्राचं वाचन केलं. या पत्राचं वाचन करताना सागरने म्हटलं की, “यशाचे हजारो बाप असतात, पण अपयश नेहमी अनाथ असतं. पण, झी मराठीच्या कुटुंबामुळे आम्ही यश पचवू शकलो आणि सगळ्यात मोठा आधार होता तो म्हणजे मराठी माणसाचा. मराठी माणूस कुणाला हवेत जाऊ देत नाही, ताबडतोब जमिनीवर आणतो. मराठी प्रेक्षक फक्त कौतुक करतात असं नाही हा; वेळ आली की कानउघाडणीही करतात. त्यामुळे आमचे पाय कायम जमिनीवर राहिले.”
व्हिडिओवर अनेकांनी केल्या कमेंट्स
या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत या कार्यक्रमाचे आभार मानले आहेत. एकाने म्हटलं की, चला हवा येऊ द्या ने मनोरंजनाची वेगळी व्याख्या लिहिली, खूप हसवलं, काहीवेळा प्रेक्षकांच्या डोळ्यात आनंद अश्रू आणले, हा कार्यक्रम मराठीत पुन्हा होणे नाही. गेली 10 वर्ष चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला निरोप देताना प्रेक्षक देखील भावूक झाल्याचं पाहायला मिळत आहे.
ही बातमी वाचा :
Chala Hawa Yeu Dya : अखेर 'चला हवा येऊ द्या'घेणार प्रेक्षकांचा निरोप! सेटवरून आली मोठी अपडेट