मुंबई : बहुचर्चित आणि वादग्रस्त बिग बॉस ओटीटी (Bigg Boss OTT 3) कार्यक्रमाचा सध्या तिसरा सीझन सुरु आहे. 21 जूनपासून सुरु झालेल्या या कार्यक्रमात युट्युबर अरमान मलिक (Armaan Malik Youtuber) त्याच्या दोन बायकांसोबत स्पर्धक (Bigg Boss OTT 3 Contestant) म्हणून सामील झाला आहे. बिग बॉसमधील माजी स्पर्धक अभिनेत्री देबोलिना भट्टाचार्य (Devoleena Bhattacharjee) हिने युट्युबर अरमान मलिकवर जोरदार निशाणा साधला आहे. दोन पत्नींसोबत बिग बॉसमध्ये सामील झाल्याचं वर्तन अत्यंत गलिच्छ असल्याचं देबोलिनान म्हटलं आहे. याशिवाय, तिने बिग बॉसवरही ताशेरे ओढले आहेत.


दोन बायकांसोबत बिग बॉसमध्ये येणाऱ्या यु्ट्यूबरवर देबोलिना भडकली


बिग बॉस ओटीटी 3 हा वादग्रस्त शो सुरू झाला असून यामध्ये साई केतन राव, रणवीर शौरे, लव कटारिया, दीपक चौरसिया, सना सुलतान, सना मकबूल, रॅपर नाझी, नीरज गोयत आणि प्रसिद्ध यूट्यूबर अरमान मलिक त्याच्या दोन्ही पत्नी पायल आणि कृतिका हे स्पर्धक म्हणून सामील झाले आहेत. अरमान मलिक त्याच्या दोन्ही बायकांसह शोमध्ये प्रवेश करताच सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पहिल्या दिवशी अरमानने त्यांची प्रेमकहाणी सांगितली. पायल आणि नंतर कृतिकासोबत प्रेम आणि लग्न कसं झालं, याचा त्याने उलगडा केला. यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली असताना, आता अभिनेत्री देबोलिनानेही बिग बॉस आणि अरमान मलिकवर निशाणा साधला आहे.


देबोलिना भट्टाचार्यची व्हायरल पोस्ट


अभिनेत्री देबोलिना भट्टाचार्यने सोशल मीडिया पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलं ते वाचा.


हे मनोरंजन आहे, असं तुम्हाला वाटतंय का? ही करमणूक नाही, हे अत्यंत गलिच्छ आहे. या गोष्टीला हलक्यामध्ये घेण्याची चूक करू नका कारण, हे फक्त एक पडद्यावरचं रिल आयुष्य नाही, ते वास्तव आहे. म्हणजे या निर्लज्जपणाला करमणूक कशी म्हणता येईल हेच मला समजत नाहीय? मला फक्त ऐकूनच या गोष्टीचा तिरस्कार वाटत आहे. म्हणजे अवघ्या 6-7 दिवसात प्रेम झालं, लग्न झालं आणि मग बायकोच्या जिवलग मैत्रिणीसोबत सुद्धा तेच झालं. हे माझ्या कल्पने पलीकडचं आहे.


आणि बिग बॉस, तुम्हाला काय झालंय? तुमचे इतके वाईट दिवस सुरु आहेत का की, तु्म्हा पॉलिगामी विवाह पद्धती ही करमणूक वाटत आहे? जेव्हा तुम्ही अशा लोकांना स्पर्धक म्हणून घेतलं, तेव्हा तुम्ही नेमका काय विचार केला होता? हा शो लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण पाहतात. नवीन पिढीला काय शिकवायचं आहे? की त्यांची 2-3-4 लग्न होऊ शकतात? प्रत्येकजण आनंदाने एकत्र राहू शकतो? ज्यांना रोज अशा घटनांचा सामना करावा लागतो, दुःखात आयुष्य जगतात, त्यांना जा आणि विचारा.


म्हणूनच विशेष विवाह कायदा आणि UCC (युनिफॉर्म सिव्हिल कोड) अनिवार्य असावा. जेणेकरून कायदा सर्वांसाठी समान असेल आणि समाज अशा गलिच्छ गोष्टीपासून मुक्त होऊ शकेल. पहिली पत्नी असताना दुसरी पत्नी. विचार करा, समानतेच्या नावाखाली बायका 2-2 नवरे ठेवायला लागल्या तर तुमची करमणूक होईल का?


आणि त्यांचे फॉलोअर्स कोण आहेत, हेच मला समजत नाही  आणि ते कोणत्या कारणासाठी त्यांना फॉलो करतात? तुमचं डोकं ठिकाणावर आहे की नाही, आधी त्यावर उपचार करुन घ्या. जर तुम्हाला हा निर्लज्जपणा योग्य वाटत असेल, तर तुमचं जीवन व्यर्थ आहे. आपण त्यापलीकडे विचार करू शकत नाही किंवा आपण त्याबद्दल काहीही करू शकत नाही. तुम्हाला नवीन पिढीला काय शिकवायचं आहे, की त्यांनी एकापेक्षा जास्त विवाह करावेत? असभ्य. हा विचार स्वतःच इतका घाणेरडा आहे आणि जर 2-3 लग्नं करणं गरजेचं असेल तर करा आणि घरीच राहा. ही घाणेरडी मानसिकता जगात पसरवू नका. एक समाज म्हणून आपण केवळ विनाशाकडे जात आहोत. खरंच लोक वेडे झाले आहेत. आणि बिग बॉस, मला माहित नाही तुम्हाला काय झालं आहे.






महत्त्वाच्या इतर बातम्या :


Akshaya Hindalkar : 'पुन्हा कर्तव्य आहे' मालिकेतील अभिनेत्रीची रिल्ससाठी स्टंटबाजी, चालत्या गाडीतून डोकं बाहेर काढताना शेअर केला व्हिडीओ; चाहते भडकले