India win ICC T20 World Cup:भारताने आयसीसी टी20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडवर दणदणीत विजय मिळवत इतिहास रचला. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या अंतिम सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडचा 96 धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने सलग दुसऱ्यांदा टी20 वर्ल्ड कप जिंकत विक्रमी तिसऱ्यांदा ट्रॉफी आपल्या नावावर केली. या ऐतिहासिक विजयामुळे संपूर्ण देशात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. या ऐतिहासिक यशानंतर विविध चित्रपटसृष्टीतील अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावरून टीम इंडियाचे अभिनंदन केले. (Team India Wins T20 World Cup)

'मेन इन ब्ल्यू' ला सलाम..शाहरुख म्हणाला...

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान हा प्रतिक्रिया देणाऱ्यांपैकी पहिल्यांदाच होता. त्याने X पोस्ट करत लिहिले, “काय जबरदस्त विजय! आपल्या ‘मेन इन ब्ल्यू’ला सलाम. तुम्ही खरे चॅम्पियन्स आहात. मैदानावर तुमचा खेळ पाहताना आम्हा सर्वांना अभिमान वाटला. जय हिंद.”

करण जोहरसह, करीना, अनुष्का म्हणाल्या....

प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर याने इंस्टाग्रामवर आपल्या कभी खुशी कभी गम या चित्रपटातील लोकप्रिय क्लिप शेअर करत आनंद व्यक्त केला. अभिनेत्री करीना कपूर हिनेही इंस्टाग्राम स्टोरीद्वारे टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या.

अभिनेत्री अनुष्का शर्मा हिने इंस्टाग्रामवर लिहिले, “या शानदार संघाचे मनःपूर्वक अभिनंदन! सलग दोन वर्ल्ड कप जिंकणे ही मोठी कामगिरी आहे.”

टीम इंडियाचे गबरु!! सनी देओलची कमेंट 

अभिनेता अभिषेक बच्चन यानेही उत्साहात पोस्ट करत “INDIAAAAA!!! CHAMPIONS” असे लिहिले.

सनी देओल याने टीमच्या कामगिरीचे कौतुक करत लिहिले, “टीम इंडियाचे गबरू! तुम्ही हे जिंकून दाखवले. #Champions तुम्ही हिंदुस्तानचा अभिमान वाढवला.”

दक्षिणेतील सुपरस्टार महेश बाबू यानेही टीम इंडियाच्या शानदार खेळाचे कौतुक केले. “टीम इंडियाने पूर्ण स्पर्धेत जबरदस्त वर्चस्व गाजवले. देशातील 1.4 अब्ज लोकांसाठी हा अभिमानाचा क्षण आहे,” असे त्याने म्हटले.

हर घर का माहोल... अक्षय कुमारची पोस्ट 

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने सर्वात आधी प्रतिक्रिया देत आपल्या आगामी ‘भूत बंगला’ चित्रपटातील डान्सचा GIF शेअर केला. त्याने लिहिले, “हर घर का माहौल… टीम इंडियाला वर्ल्ड कप घरी आणल्याबद्दल अभिनंदन.”

इतका ओरडलो की घसा बसलाय.... अजय देवगण म्हणाला...

अभिनेता अजय देवगणने लिहिले, “इतका ओरडलो की घसा बसला आहे, पण चेहऱ्यावरचा आनंद संपत नाही. टीम इंडियाने अब्जावधी भारतीयांची छाती अभिमानाने भरून टाकली.”

याशिवाय अभिनेता अनिल कपूर यानेही सोशल मीडियावर पोस्ट करत टीम इंडियाच्या विजयावर आनंद व्यक्त केला. टीम इंडियाच्या या ऐतिहासिक विजयामुळे देशभरात उत्सवाचे वातावरण असून सोशल मीडियावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.