Marathi Serial Star Pravah: सध्या मराठी मनोरंजन विश्वात छोट्या पडद्यावर अनेक बदल होत असल्याचं दिसतंय. अनेक नवे कलाकार प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी नव्या मालिकांमधून येत आहेत. तर, अनेकजण निरोप देण्याच्या तयारीत आहेत. लवकरच स्टार प्रवाह वाहिनीवर (Star Pravah) एक नवी मालिका सुरू होणार आहे. 27 एप्रिलपासून स्टार प्रवाहवर 'बाई तुझा आशीर्वाद' (Bai Tuza Aashirvad) ही नवी कोरी मालिका दाखल होणार आहे. पण नवी मालिका येणार असल्याने कोणती मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार याचीही चर्चा रंगलीय. बाई तुझा आशीर्वाद या मालिकेतून अक्षता प्रमोद आणि अर्णव वॅरिअर हे मालिकेत मुख्य भूमिकेत असणार आहेत. या मालिकेसाठी एका मालिकेची वेळही बदलण्यात आलीय.  त्यामुळे कोणती मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Continues below advertisement

नवी मालिका येताच ही मालिका संपणार?

'बाई तुझा आशिर्वाद ' ही मालिका 27 एप्रिल पासून स्टार प्रवाह वर येणार आहे. या मालिकेसाठी पुन्हा एकदा 'वचन दिले तू मला ' या मालिकेची वेळ बदलण्यात आली आहे. यापूर्वीही या मालिकेची वेळ बदलली होती. आता 27 एप्रिल पासून ही मालिका दुपारी 2.30 वाजता दाखवण्यात येणार आहे . पण विशेष म्हणजे या वेळेत ' नशीबवान ' ही मालिका प्रक्षेपित केली जाते. त्यामुळे नशीबवान मालिकेचे काय होणार असा प्रश्न प्रेक्षकांना पडलाय. ही मालिका संपणार असल्याचे अंदाज प्रेक्षकांनी बांधायला सुरुवात केली आहे.  शिवाय स्टार प्रवाह मालिका वेगवेगळ्या मालिकांचे प्रोमो शेअर करताना दिसते. पण, 'नशीबवान' मालिकेचा प्रोमो न दिसल्याने मालिकेचा TRP घसरल्याची चर्चा आहे.

नशीबवान ही मालिका सप्टेंबर 2025 मध्ये सुरू झालेली. या मालिकेला सुरू होऊन केवळ 7 महिने झालेत. अवघ्या सात महिन्यात या मालिकेने गाशा गुंडाळल्याचं बोललं जात आहे. स्टार प्रवाहने याबाबत कुठलीही अधिकृत माहिती कळवलेली नाही.तसेच या मालिकेचा शेवट होणार असल्याचा प्रोमोही शेअर केलेला नाही. त्यामुळे कोठारी विजन ची ही मालिका संपणार की नव्या वेळेत दाखवणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे.