Sonalee Kulkarni : नंटरंग (Natarang) या चित्रपटातून महाराष्ट्राची अप्सरा म्हणून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) हीने आतापर्यंत अनेक दर्जेदार चित्रपटांमध्ये काम केलं आहे. सध्या सोनालीने तमिळ सिनेसृष्टीतही पदार्पण केलं आहे. नटरंग, हिरकणी, मितवा या चित्रपटांमध्ये सोनाली झळकली होती. तिचा हिरकणी हा चित्रपट प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडला आहे. नुकतच सोनालीने सिद्धार्थ कननला दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान तिच्या आयुष्यातील वाईट काळाविषयी भाष्य केलं आहे. 


तसेच सिनेसृष्टीत सुरुवातीला काम करताना सोनालीला कोणत्या अडचणींचा सामना करावा लागला याविषयी देखील तिने भाष्य केलं आहे. तिच्या आयुष्यातल्या या वाईट काळाविषयी बोलताना सोनालीने तिच्यावर सिनेसृष्टी सोडण्याची वेळ आली होती, असा देखील उल्लेख केला. सोनाली ही तिच्या अभिनयामुळे कायमच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. 


मला सिनेसृष्टी सोडावी लागली असती - सोनाली कुलकर्णी


माझ्या या परिस्थितीमध्ये मला कोणताच पर्याय सापडत नव्हता. पण मी एका गोष्टीचा काळजी घेतली की, मी माझी तत्त्व आणि विचार कुठेही मागे सोडणार नाही. मी माझा वेगळा प्रवास सुरु केला. वेगळ्या मार्गाने स्ट्रगल सुरु केला. मी तेव्हा काही गोष्टींना नकार दिला होता, त्यामुळे मला ज्या चित्रपटांमध्ये काम करायचं होतं, त्या चित्रपटांमध्ये काम करता आलं नाही.  पण त्यावेळी मी स्वत:चा मार्ग शोधला. दिग्दर्शकांना भेटले, निर्मात्यांना भेटले. हिरकणी चित्रपटात मी आधी स्वत:चे पैसे गुंतवले. पण मी जर असं नसतं केलं तर मला सिनेसृष्टी सोडावी लागली असती, असं सोनालीने म्हटलं. 


सोनालीच्या आयुष्यातली वाईट काळ - सोनाली कुलकर्णी


जेव्हा मी लोकांना नाही म्हणायला सुरुवात केली तेव्हा माझ्या आयुष्यातला एक वाईट काळ सुरु झाला होता. पण आज जेव्हा मी मागे वळून बघते की मी त्या गोष्टींसाठी हो म्हटलं असतं तर माझं इतकं नुकसान नसतं झालं. पण त्यावेळी मला तो चित्रपट करणं योग्य वाटलं नाही. पण समोरचा व्यक्ती एका पोजिशनवर होता. त्यावेळी त्यांनी या गोष्टीची नक्की काळजी घेतली मी पुढचे काही वर्ष त्या व्यक्तीबरोबर, त्या प्रोडक्शन हाऊस सोबत काम नाही करणार ते, हा तिच्या आयुष्यातला अनुभव सोनालीने यावेळी शेअर केला. 


मला माझ्याच गाण्यावर नाचण्यासाठी रॉयल्टी मागितली जायची - सोनाली कुलकर्णी  


सोनाली ही तिच्या अप्सरा आली या गाण्यामुळे प्रेक्षकांच्या अधिक पसंतीत उतरली. बेला शेंडेच्या आवाजात संगीतबद्ध झालेलं हे गाणं सोनीलीच्या नृत्यामुळेही प्रेक्षकांनी उचलून धरलं. पण जेव्हा सोनालीच्या आयुष्यातला वाईट काळ सुरु होता, तेव्हा तिला अप्सरा आली या गाण्यावर नृत्य करण्यासाठी रॉयल्टी मागितली जायची, असा धक्कादायक खुलासा सोनालीने मुलाखतीदरम्यान केला आहे. मी गोष्टीसाठी मेहनत घेतली, मी ज्या गोष्टीचा भाग होते, त्या गोष्टींसाठी मी जेव्हा लोकांना नकार द्यायला लागले तेव्हा मला त्यासाठी पैसे मागितले जायचे, याचं कारण एकच होतं की समोरची व्यक्ती एका पोजिशनवर होती, हा अनुभवही सोनालीने शेअर केला आहे. 


ही बातमी वाचा : 


Sukh Mhanje Nakki Kay Asta : 'महिनाभर बेडरेस्ट होती पण जिद्द नाही सोडली', 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेच्या दिग्दर्शकाचं टीमनं केलं कौतुक!