Sholay Completed 50 Years Re-Release Uncut Version: भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय, ब्लॉकबस्टर आणि कल्ट चित्रपट 'शोले'ला 50 वर्ष पूर्ण होत आहेत. हा चित्रपट 15 ऑगस्ट 1975 रोजी प्रदर्शित झाला. धर्मेंद्र (Dharmendra), अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), जया बच्चन (Jaya Bachchan), हेमा मालिनी (Hema Malini), संजीव कुमार आणि अमजद खान अभिनित 'शोले' हा कल्ट सिनेमा (Sholey Movie) आता रि-रिलीज केला जाणार आहे. विशेष म्हणजे, हा चित्रपट अनकट व्हर्जनसह प्रदर्शित होणार आहे. शोले सिनेमाचं दिग्दर्शन रमेश सिप्पी यांनी केलं होतं. अशातच या सिनेमाचा प्रीमियर 27 जून रोजी इटलीच्या बोलग्नाना इथे होणार आहे.

भारतातील ही कल्ट फिल्म इटलीमध्ये 'इल सिनेमा रिट्रोवाटो फेस्टिव्हल'मध्ये दाखवली जाणार आहे. तसेच, या फिल्मची खास स्क्रीनिंग पियाजा मैगिओरे मध्ये होणार आहे. हे ठिकाण क्लासिक चित्रपटांच्या प्रदर्शनासाठी प्रसिद्ध आहे. या अनकट व्हर्जनमध्ये ठाकूर गब्बर सिंहला मारतो, हे दाखवलं आहे. सीबीएफसीच्या सूचनेनंतर हा सीन मूळ थिएटर रिलीजमधून काढून टाकण्यात आलेला. त्यामुळे आता रिरिलीज होणाऱ्या वर्जनमध्ये कधीही न पाहिलेले सीन देखील समाविष्ट आहेत, जे सीबीएफसीच्या सूचनेनुसार किंवा निर्मात्यांनी स्वतःहून चित्रपटाचं संपादन करताना काढून टाकले होते.

फिल्म हेरिटेज फाउंडेशन आणि सिप्पी फिल्म्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त प्रकल्पाच्या रूपात या अनकट आवृत्तीचं प्रदर्शन करण्याचं उद्दिष्ट म्हणजे 'शोले' पहिल्यांदाच बनवण्यात आला होता. त्याचप्रमाणे हा चित्रपट मूळ चित्रपट म्हणून सादर करणं. अमिताभ यांनी चित्रपटाच्या पुनर्प्रदर्शनाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. दुसरीकडे, धर्मेंद्र यांनी या चित्रपटाला जगातील आठवं आश्चर्य म्हटलं आहे.

'शोले' चित्रपटाच्या अनकट रिलीजबद्दल अमिताभ बच्चन यांनी व्यक्त केला आनंद

अमिताभ बच्चन म्हणाले की, "त्यावेळी मला कल्पनाही नव्हती की, हा चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीसाठी एक मैलाचा दगड ठरेल. अपयशी ठरल्यापासून ते बॉक्स ऑफिसवरच्या विक्रमी कामगिरीपर्यंतचं नाट्यमय परिवर्तन आपल्या सर्वांसाठी एक भावनिक रोलरकोस्टर होतं... मला आशा आहे की, 50 वर्षांनंतरही हा चित्रपट जगभरातील नव्या प्रेक्षकांच्या कल्पनांना आकर्षित करेल."

धर्मेंद्र यांनी 'शोले' चित्रपटाला आठवं आश्चर्य म्हटलं

धर्मेंद्र यांनी 'शोले' चित्रपटाला जगातील आठवं आश्चर्य म्हटलं. ते म्हणाले की, "हा चित्रपट अनकट आवृत्तीत प्रदर्शित होत आहे, हे ऐकून मला खूप आनंद झाला आणि मला खात्री आहे की, तो 50 वर्षांपूर्वी जेवढा यशस्वी झाला, तितकाच आताही यशस्वी होईल. सलीम-जावेदचे संवाद आणि रमेश सिप्पी यांचं दिग्दर्शन कोण विसरू शकेल? भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात 'शोले'मधली अनेक दृश्य नोंदवली गेली आहेत आणि प्रत्येक पात्र स्टार बनला आहे. पण चित्रपटाचा खरा नायक कोणी असेल तर ते, नाणं होतं... माझा आवडता सीन होता, टँक सीन, मंदिरातला हेमासोबतचा सीन आणि बरंच काही होतं, पण मला वाटतं की, सर्वात पॉवरफुल सीन म्हणजे, जयचा मृत्यू, जो अजूनही माझ्या मनात कोरलेला आहे."