Red Soil Stories Shirish Gawas Wife Pooja's Post: मृत्यूच्या 15 दिवसांपूर्वी उलट्या, पित्तं अन् चक्कर, 'रेड सॉईल स्टोरीज'च्या शिरीष गवससोबत नेमकं काय घडलं, बायकोनं सर्व सांगितलं
Red Soil Stories Shirish Gawas Wife Pooja's Post: शिरीष गवसच्या निधनानंतर पत्नी पूजा गवसनं त्यांचं 'रेड सॉईल स्टोरीज' यूट्यूब चॅनल जसच्या तसं सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, व्हिडीओ शेअर करत शिरीषसोबत नक्की काय घडलेलं? हेदेखील सांगितलंय.

Red Soil Stories Shirish Gawas Wife Pooja's Post: 'रेड सॉईल स्टोरीज' (Red Soil Stories) या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून शिरीष (Shirish Gawas) आणि पूजा गवस (Pooja Gavas) या जोडप्यानं कोकणातील पारंपरिक पदार्थ, ग्रामीण संस्कृतीचं दर्शन संपूर्ण जगाला घडवलं. पण, ऑगस्ट महिन्यात शिरीषचं आकस्मिक निधन झालं आणि अख्खा महाराष्ट्र हादरला. धडधाकट असणारा शिरीष अचानक गंभीर आजारानं ग्रस्त झाला आणि अखेर फक्त आणि फक्त 15 दिवसांतच त्यानं या जगाचा कायमचा निरोप घेतला. शिरीषच्या निधनानंतर या चॅनेलचं पुढे काय होणार? असा प्रश्न सर्वांनाच पडलेला. अनेकांनी तर शिरीषच्या पत्नीला तू चॅनल पुन्हा एकदा नव्या जोमानं सुरू कर, असाही सल्ला दिलेला. अशातच आता शिरीषची पत्नी पूजानं आता अवघ्या महाराष्ट्राच्या मनात घर केलेलं 'रेड सॉईल स्टोरीज' पुन्हा एकदा नव्या जोमानं सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यानिमित्तानं पूजानं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून पूजानं शिरीषसोबत नक्की काय घडलं हेदेखील सांगितलं आहे.
शिरीषसोबत नक्की काय घडलं? पत्नी पूजा गवसनं सगळंच सांगितलं...
"शिरीषच्या मृत्यूचा बाजार मांडला..."
पूजा गवसनं या व्हिडीओमध्ये शिरीषच्या मृत्यूनंतर खोटी माहिती पसरवणाऱ्या युट्यूबर्सवर नाराजीही व्यक्त केली आहे. ती म्हणाली की, "शिरीषच्या मृत्यूचा काही लोकांनी बाजार मांडला. फक्त व्ह्यूज मिळावे यासाठी त्यांनी शिरीषच्या मृत्यूचं भांडवल केलं. शिरीषच्या मृत्यूची बातमी इतक्या चुकीच्या मथळ्यानं आणि भडकपणे लोकांपर्यंत पोहोचवली. या संधीसाधू लोकांनी कधीही आमच्याशी किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्यांशी संपर्क न साधता मनाला वाटेल ते वक्तव्य फक्त व्ह्यूजसाठी केली. ज्यात आमच्या सुखी संसाराला कशी नजर लागली, डॉक्टरांच्या चुकीमुळे मृत्यू झाला, कुटुंबाचं शिरीषकडे दुर्लक्ष झालं किंवा शिरीषनं स्वत:च्या तब्येतीकडे कसं दुर्लक्ष केलं, एवढंच नाही तर सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे ब्रेन ट्युमर झाला. चॅनेल आता बंद होईल, पूजाताई काय निर्णय घेतली? निर्सगाच्या सान्निध्यात राहून हेल्दी जेवण घेऊनही एवढा गंभीर आजार कसा झाला? असे चुकीचे आणि गंभीर आरोप आमच्यावर केले गेले. या व्हिडीओमुळे आमच्या दु:खात अजून भर पडली. सत्य तुम्हाला कळावं म्हणून हा व्हिडीओ मी करतेय..."
पूजा गवस म्हणाली की, "जुलै महिन्यात अचानक शिरीषला फिट आली आणि अवघ्या पंधरा दिवसात शिरीष आम्हाला कायमचं सोडून निघून गेला. हे सगळं इतकं अचानक घडलं की पुढचे कित्येक दिवस ही गोष्ट पचवणं खूप जड गेलं. डॉक्टरांनी ब्रेन ट्यूमर अस निदान केलं. एक अत्यंत तल्लख बुद्धीच्या, प्रज्ञावान माणसाला नेमका मेंदूचा आजार व्हावा हेच मुळात न पटण्यासारखा होतं. शिरीषच्या मृत्यूने आम्ही परिवारच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र आणि जगभरातली कितीतरी कुटुंब हळहळली..."
"मधेमधे सर्दी, डोकेदुखी..."
पूजानं पुढे सांगितलं की, "साधारण मार्च एप्रिलपासून शिरीषला मधेमधे सर्दीचा त्रास सुरु झाला. कधीकधी शिरीषला डोकेदुखी पण होती. त्यासाठी पहिलं फिजिशियन आणि नंतर इनटी म्हणजे नाक, कान, घासा तज्ज्ञाला शिरीषला दाखवण्यात आलं. तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की, त्याला साइनसाइटिस (Sinusitis) चा त्रास आहे. त्याचे औषध उपचार सुरु असतानाच मे महिन्याच्या सुरुवातीला त्याला किडनी स्टोनचा त्रास सुरु झाला. ज्यामध्ये 11 एमएमचा स्टोन असल्यान छोटी सर्जरी करावी लागली. सर्जरीनंतर शिरीष पहिलेसारखा ठणठणीत झाला. मग डॉक्टरांच्या परवानगीने श्रीजाच्या पहिल्या वाढदिवसाच्या तयारीला लागलो."
पूजा पुढे म्हणाली की, "लेकीच्या वाढदिवशी मी शिरीष सर्वात आंनदी पाहिलं होतं. त्यानंतर सर्जरीच्या वेळी असलेला स्टेंन होतं ते काढण्यासाटी मुंबईला गेलो तिथे तो काढला आणि घरी परतलो. श्रीजाचा वाढदिवसाचा व्हिडीओ एडिट करुन तो अपलोड करेपर्यंत शिरीषला कुठलाही त्रास झाला नाही. त्याच्यामध्ये कुठलेही लक्षणं दिसली नाहीत. त्याच्या मृत्यूच्या 15 दिवस आधी त्याला उलट्या आणि पिताचा त्रास सुरु झाला, चक्कर यायला लागली. पोटात अन्नपाणी टिकत नव्हतं. अचानक बिघडलेली तब्येत आमच्यासाठीही चकरवणारी होती. त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात जाऊन त्यावर उपचार सुरु केलेत. याच दरम्यान त्याला पहिल्यांदाच फिट आली. क्षणाचाही विलंब न करता गोव्यातील नामांकित हॉस्पिटलमध्ये न्यूरो सर्जनकडे घेऊन गेलो. त्यावेळी शिरीषला काही तासांच्या फरकाने फिट येत होत्या."
"ब्रेन ट्यूमर हा शब्द ऐकताच आमच्या पायाखालची जमीनच सरकली..."
पुढे पूजा म्हणाली की, "आमच्या घरात मोठा दादा, मोठी वहिनी आणि शिरीषची बहीण प्राची सगळेच डॉक्टर असल्यामुळे कोणताही विलंब न करता आम्ही सीटी ब्रेन ही टेस्ट केली. त्यावेळी शिरीषच्या फिटचा त्रास वाढला आणि अनकॉन्शियस झाला. सीटीचा अहवाल आल्यावर त्यात कळलं की, त्याच्या मेंदूत गाठ आहे आणि पाणी भरलं आहे असं दिसून आलं. ब्रेन ट्यूमर हा शब्द ऐकताच आमच्या पायाखालची जमीनच सरकली आणि हे सगळं इतक्या अचानक होत होतं की, तरीही मी खंबीरपणे उभी होती. मुंबईतील न्यूरो सर्जनशी संपर्क करुन शिरीषचे रिपोर्ट आणि त्याच्या प्रकृतीबद्दल सांगितलं. पण गोवा ते मुंबई हा 8 तासांचा बायरोड प्रवास आणि त्यात अशक्य असा मुसळधार पाऊसामुळे बायरोडने शक्यच नव्हतं. दुसरा पर्याय होता तो एअर एंबुलेंसचा पण त्यात बेशुद्ध माणसाला शिफ्ट करता येत नाही. हे समजल्यावर आम्ही हतबल झालो."
"त्यानंतर आम्ही गोवातील गोवा मेडीकल कॉलेजमध्ये आम्ही शिरीषला घेऊन गेलो. या हॉस्पिटलमध्ये बेस्ट न्यूरो सर्जन आहे, अशी माहिती आम्हाला मिळाली होती. अवघ्या दोन ते तीन तासात शिरीष कोमात गेला होता. शिरीषची क्रिटिकल परिस्थिती पाहून तिथल्या डॉक्टरांनी दोन ते तीन तासात त्याला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन गेले. या ऑपरेशनदरम्यान शिरीषच्या डोक्यात साठलेले पाणी काढलं. त्यानंतर शिरीष प्रकृती थोडी स्टेबल झाली पण तो शुद्धीवर आला नव्हता. त्याच दिवशी 6 तासांच्या सर्जरीनंतर त्याच्या मेंदूमधील रक्ताच्या गाठीपण काढण्यात आल्या होत्या. दोन दिवसांनंतर शिरीष शुद्धीवर आला होता. त्यानंतर आमचा जीवात जीव आला. तो आम्हाला ओळखायला लागला. त्याला सगळं कळतं होतं. हे पाहून डॉक्टरांसह आम्हाला सकारात्मक वाटू लागलं. तीन चार दिवसांनी शिरीषची प्रकृती स्थिर झाल्यानंतर ट्यूमरचं ऑपरेशन करायचं ठरलं. अतिशय हायरिक्स ही सर्जरी होती, त्यामुळे यावेळी आम्ही मुंबईतील नामांकित न्यूरो सर्जनकडे सेकंड ओपिनियनसाठी संपर्क केला. त्यांनीदेखील आम्हाला या सर्जरीसाठी गो ऑन हा ग्रीन सिग्नल दिला.", असं पूजा गवस म्हणाली.
"7 - 8 तासांच्या ऑपरेशमध्ये शिरीषच्या मेंदूतील ट्यूमर काही अंशी काढण्यात यश आलं..."
"7 - 8 तासांच्या ऑपरेशमध्ये शिरीषच्या मेंदूतील ट्यूमर काही अंशी काढण्यात यश आलं. परंतु हा ट्युमर अत्यंत संवेदनशील आणि नाजूक अशा मेंदूच्या अत्यंत आतल्या भागात होता. यावर न्यूरो सर्जनने सांगितलं की, या जागेवरचा ट्यूमर पूर्णपणे काढणं अशक्य आहे. हा ट्यूमर काढताना जराजरी धक्का लागला असता तर शिरीषच्या जीवाला धोका होता. शिरीषला गंभीर असा सेरेब्रोस्पाइनल फ्लुइड एसओएल हायड्रोसेफलस हा आजार झाला होता. एसओएल म्हणजे, मेंदूमध्ये जागा व्यापणाऱ्या गाठी ज्यामुळे मेंदूत पाणी होतं. या सर्जरीमध्ये डॉक्टर 20 ते 30 टक्के ट्युमर काढण्यात यशस्वी झाले. कारण तो काढताना जराही काही झालं असंत, तर शिरीषच्या हालचालीवर, चालण्याबोलण्यावर त्याचा मेमरीवर परिणाम झाला असता. सर्जरी यशस्वी झाली पण ट्यूमर पूर्ण न काढता आल्यामुळे तो पुन्हा कधीही वाढू शकतो, ही भीती होतीच. दोन ते तीन दिवसांनी शिरीषची प्रकृती चांगली व्हायला लागली. औषध उपचारांसोबत व्यायामाला शिरीष प्रतिसाद देत होता...", असं पूजानं सांगितलं.
पुढे बोलताना पूजानं सांगितलं की, "हळूहळू त्याची प्रकृती सुधारत होती. पण अचानक चार पाच दिवसांनी शिरीषला ताप आला. त्यानंतर त्यांच्या सगळ्या टेस्ट करण्यात आल्यात. त्यावेळी त्याच्या यूरिन आणि मेंदूच्या पाण्यात संसर्ग असल्याच समोर आलं. साधारण अशा मोठ्या सर्जरीमध्ये या प्रकारचा संसर्ग होतो, असं डॉक्टारांनी सांगितलं होतं. शिरीषच्या मेंदूतील गाठ अत्यंत नाजूक जागी असल्यानं संसर्ग रोखणं अतिशय कठीण होतं. यानंतर त्याला आयसीयूमध्ये शिफ्ट करण्यात आलं. हळूहळू तो पुन्हा बेशुद्ध होऊ लागला आणि पाच दिवसांनी तिथे शिरीष आम्हाला कायमचा सोडून गेला..."

















