Raj Thackeray : ...तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' या चित्रपटाला पर्याय नाही; राज ठाकरेंची प्रतिक्रिया, मराठी प्रेक्षकांना साद; सत्ताधाऱ्यांनाही सुनावलं
आत्ताच्या परिस्थितीवरचा चित्रपट बघायचा असेल तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' या चित्रपटाला पर्याय नाही, अशा शब्दात राज ठाकरेंनी 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' या चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया देत आवाहन केलं आहे.

Raj Thackeray on Punha Shivajiraje Bhosale Movie : महेश वामन मांजरेकर (Mahesh Manjrekar) दिग्दर्शित 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' (Punha Shivajiraje Bhosale) या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता बघायला मिळत आहे. नुकतेच या चित्रपटाचा ट्रेलर मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थित पार पडला. यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले होते कि, हा सिनेमा महाराष्ट्र उचलून धरेल, चित्रपट धरून ठेवेल, पण हा चित्रपट वर्तमान आणि भूतकाळ यांच्या संगमावर असलेला चित्रपट आहे, असं राज ठाकरेंनी म्हटलं होतं. अशातच आता राज ठाकरेंनी पुन्हा एकादा सोशल मीडियावर पोस्ट करत या चित्रपटाबद्दल आपली भावना व्यक्त केली आहे.
Raj Thackeray : राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
मी 2 दिवसांपूर्वी, माझे मित्र आणि एक उत्तम दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा, 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' हा चित्रपट पाहिला. समकालीन सिनेमा हा शब्द सहज वापरला जातो पण तो अनेकदा असतोच असं नाही... पण खरा समकालीन, किंवा आत्ताच्या परिस्थितीवरचा चित्रपट बघायचा असेल तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' या चित्रपटाला पर्याय नाही...
आज फक्त मोठे मोठे महामार्ग, पूल (ज्यावर काही महिन्यात खड्डे पडतात ) आणि चमकदार घोषणा म्हणजे 'विकास' अशी कल्पना सत्ताधाऱ्यांनी रुजवली आहे. यांत बाकी कोणाचा विकास होतो की नाही माहित नाही पण सत्ताधाऱ्यांचा विकास नक्की होतो. हे केलं आणि धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की मग शेतकरी असो की इथला मराठी माणूस यांना हवं तसं वापरून फेकून द्यायला हे मोकळे.
या राज्यातील शेतकरी तर पार हतबल आहे. एका बाजूला पाऊस झोडपतो आणि दुसऱ्या बाजूला सरकारी यंत्रणा अनास्थेने झोडपते.. याच महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या मुलांना एकत्र करून छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य उभं केलं, त्याच महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या करतो हे भीषण दुर्दैव आहे. एका बाजूला ग्रामीण भागात शेतकऱ्याला इतकं जेरीस आणायचं की त्याला जमीन विकावीच लागेल आणि दुसरीकडे शहरात मराठी माणसांनाच घरं नाकारायची, त्यांच्या भाषेचा अपमान करणाऱ्यांना अभय द्यायचं, त्यांनी काय खायचं ? काय नाही खायचं यावर बंधन आणणऱ्यांचे लाड करायचे हे सुरु आहे.
हे सगळं मराठी माणसाला दिसत नाहीये का? दिसत असेल ही... पण जोपर्यंत तुमच्या मनात याविरोधात चीड निर्माण होणार नाही, आग निर्माण होणार नाही, तोपर्यंत परिस्थिती बदलणं सोडा अजून भीषण होईल. या सिनेमातून ही चीड महेश मांजरेकर, त्यांचे कलाकार आणि त्यांचे लेखक यांनी उत्तम मांडली आहे. हा फक्त चित्रपट नाही तर या टीमच्या मनातील अस्वस्थता आहे. ही अस्वस्थता महाराष्ट्रातील जनतेने अनुभवयाला हवी. त्यासाठी माझं तुम्हाला आवाहन आहे की 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' हा चित्रपट जरूर पहा. अशा शब्दात राज ठाकरेंनी प्रतिक्रिया देत हा चित्रपट पाहण्याचे आवाहन केलं आहे.
मी २ दिवसांपूर्वी, माझे मित्र आणि एक उत्तम दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा, 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' हा चित्रपट पाहिला... समकालीन सिनेमा हा शब्द सहज वापरला जातो पण तो अनेकदा असतोच असं नाही... पण खरा समकालीन, किंवा आत्ताच्या परिस्थितीवरचा चित्रपट बघायचा असेल तर 'पुन्हा शिवाजीराजे… pic.twitter.com/Xum0x5Gfxz
— Raj Thackeray (@RajThackeray) November 2, 2025






















