R. Madhavan Shared Delay Post On CJP Student Protests: देशभरात नीट पेपरफुटी प्रकरण (NEET Paper Leak Case) आणि शिक्षणव्यवस्थेची झालेली दुरावस्था यामुळे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Union Education Minister Dharmendra Pradhan) यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांची आंदोलनं सुरू आहेत. कॉकरोच जनता पार्टीच्या (Cockroach Janta Party) नेतृत्त्वात सुरू असलेल्या आंदोलनाची झळ अख्ख्या देशात पोहोचली आहे. दिल्लीत मोठ्या प्रमाणावर देशभरातून विद्यार्थी दाखल झाले आहेत. तर, देशाच्या विविध राज्यातही आंदोलनं सुरू आहेत. अशातच विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला असंख्य सेलिब्रिटींनीही पाठींबा दर्शवला आहे. अनेकजण तर अगदी विद्यार्थ्यांच्या खांद्याला खांदा लावून आंदोलनात सहभागी झाल्याचं पाहायला मिळालेलं. पण, असेही अनेक सेलिब्रिटी आहे, ज्यांनी एवढं सगळं सुरू असूनही या प्रकरणावर कटाक्षानं बोलणं टाळलं. या यादीतल्या अनेक नावांपैकी एक नाव म्हणजे, बॉलिवूड अभिनेता आर. माधवन (R. Madhavan). गेल्या अनेक दिवसांपासून विद्यार्थी आंदोलनावरच्या आर. माधवनच्या (Actor R. Madhavan) वक्तव्याची सारे चाहते आतुरतेनं वाट पाहत होते. अनेकांनी त्याला ट्रोलही केलेलं. पण, अखेर आता आर. माधवननं विद्यार्थी आंदोलनाला पाठींबा दर्शवणारी पोस्ट केली आहे. पण, तरीसुद्धा त्याला नेटकऱ्यांनी सुनावलं आहे. 

Continues below advertisement

देशभरात पेटलेल्या विद्यार्थी आंदोलनावर आर. माधवननं तीन दिवसांनी आपलं मत मांडणारी एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्यानं म्हटलंय की, प्रत्येक विद्यार्थ्याला अशी व्यवस्था मिळायला हवी, जी न्याय्य, पारदर्शक आणि गुणवत्तेवर आधारित असेल. परीक्षांच्या प्रश्नपत्रिका फुटण्याच्या घटनांमुळे सरकारी व्यवस्थेवरील लोकांचा विश्वास डळमळीत होतो, असंही त्यानं त्याच्या पोस्टमध्ये म्हटलंय. पण, ज्या लोकांनी एकेकाळी माधवनला आपला आदर्श मानलं होतं आणि वारंवार त्याचं कौतुक केलेलं, त्यांनीच आता त्याच्या या पोस्टवर जोरदार टीका केली आहे.

आर. माधवननं इन्स्टाग्रामवर जारी केलेल्या एका निवेदनात, NEET परीक्षेतील कथित अनियमिततेविरुद्ध आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना आपला पाठिंबा दर्शविला आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याचं आवाहन सरकारला केलं.

Continues below advertisement

विद्यार्थ्यांच्या आंदोलनांवर आर. माधवनचं भाष्य (R. Madhavan Post For Students)

अभिनेता आर. माधवन म्हणाला की, "आपल्या देशाचं भविष्य घडवण्याची ताकद शिक्षणामध्ये आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्याला अशी शिक्षण व्यवस्था मिळायला हवी जी न्याय्य, पारदर्शक आणि गुणवत्तेवर आधारित असेल. भारताच्या तरुणाईच्या अफाट क्षमतेवर नेहमीच विश्वास ठेवणारी व्यक्ती म्हणून, आज अनेक विद्यार्थी आणि पालकांना वाटणारी चिंता आणि निराशा मी समजू शकतो. शिक्षण व्यवस्था अशी असावी जी आत्मविश्वास, निष्पक्षता आणि समान संधीची भावना जोपासते..."

प्रश्नपत्रिका फुटीसारख्या घटनांसाठी कठोर शिक्षेची मागणी (R. Madhavan On Paper Leak Case)

'थ्री इडियट्स' फेम अभिनेता आर. माधवन म्हणाला की, प्रश्नपत्रिका फुटीसारख्या घटनांसाठी शिक्षा इतकी कठोर आणि स्पष्ट असायला हवी की, भविष्यात तरुणांच्या भवितव्याशी खेळण्याचं धाडस कोणीही करणार नाही. 

"सरकार आवश्यक सुधारणात्मक उपाययोजना करेल, मला पूर्ण विश्वास..."

आर. माधवन म्हणाला की, आता या प्रकरणातील पूर्वीच्या त्रुटी मान्य झाल्या असल्यानं, सरकार आवश्यक सुधारणात्मक पावलं उचलेल, यंत्रणा अधिक मजबूत करेल आणि भावी पिढ्यांसाठी शिक्षण व्यवस्थेची विश्वासार्हता टिकवून ठेवेल, असा त्यांना पूर्ण विश्वास आहे.

"स्वार्थी घटकांपासून सावध राहण्याचे मी सर्वांना आवाहन करतो..."

युवकांना दिलेल्या मेसेजमध्ये आर. माधवन म्हणाला की, "शांततापूर्ण मार्गानं अर्थपूर्ण सुधारणा घडवून आणू पाहणाऱ्यांच्या धैर्याचं आणि निर्धाराचं मी कौतुक करतो. तसेच, मी सर्वांना आवाहन करतो की, जे स्वार्थी घटक या चळवळीला हायजॅक करून तिच्या मूळ उद्दिष्टापासून भरकटवण्याचा प्रयत्न करू शकतात, त्यांच्यापासून सावध राहावं..."

"तू खूपच जास्त सावधगिरी बाळगतोयस...", युजर्सनी आर. माधवनला सुनावलं (R. Madhavan Trolled)

आर. माधवनच्या पोस्टमुळे लोकांमध्ये मोठा संताप निर्माण झालाय. ही चळवळ 6 जूनच्या सुमारास सुरू झाली होती आणि 20 जुलै रोजी 'चलो संसद' रॅली काढण्यात आली. आता, इतक्या काळानंतर, आर. माधवनच्या पोस्टनं लोकांचा उफाळून आला आहे. एका युजरनं कमेंट केलीय की, "खरंच? आता? इतक्या काळानंतर?" दुसऱ्या एका व्यक्तीनं म्हटलंय की, "तुम्ही खूपच जास्त सावधगिरी बाळगताय... माझा विश्वासच बसत नाहीये की, तरुण असताना मी तुम्हाला आदर्श मानत होतो..." आणखी एका युजरनं टिका केलीय की, "आता खूप उशीर झालाय, भावा... खूप उशीर झालाय..."

"डर सबको लगता है, गला सबको सूखता है..."

दुसऱ्या एका युजरनं म्हटलंय की, "मला तुमचा खूप अभिमान वाटतो, पाठीचा कणा नसतानाही तुम्ही इतकी मजल मारलीय..." सोशल मीडियावरील आणखी एका युजरनं विचारलं की, "पाठीचा कणा नसताना जगणं कसं वाटतं?" एका युजरनं कमेंट केलीय की, "डर सबको लगता है, गला सबको सूखता है..." खऱ्या आयुष्यातील शौर्य हे सिनेसृष्टीतील कलाकारांच्या शौर्यापेक्षा पूर्णपणे वेगळं असतं. सोनम सर गेल्या 30 दिवसांपासून आंदोलन करत आहेत, तरीही 'थ्री इडियट्स'च्या कलाकारांपैकी एकही जण पुढे आलेला नाही. आणि तरीही, तो चित्रपट सोनम सरांवर आधारित होता आणि सर्वांनी त्याच्या बॉक्स ऑफिस यशाचा आनंद साजरा केला. आमीरनं तर यावर एक चकार शब्द काढलेला नाही. उलट त्यानं असा दावा केला की, तो सिनेमा प्रत्यक्षात सोनम सरांवर आधारित नव्हता. खऱ्या आयुष्यात आवाज उठवण्यासाठी धैर्याची गरज असते. तुम्ही कदाचित डझनभर राष्ट्रीय पुरस्कार जिंकू शकाल, पण गप्प राहणं हीच गोष्ट तुम्हाला 'फिल्म स्टार' बनवते..."

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Manoj Muntashir On Student Protest: 'मी त्यांना देशद्रोही म्हणतो...', बॉलिवूडच्या लेखकाची विद्यार्थी आंदोलकांवर वादग्रस्त टीका, नेटकरी भडकले, म्हणाले, 'मग पंतप्रधानही...'