Prasad Vedpathak White Line Controversy: आम्हाला सोसायटीच्या कमिटीने परमिशन दिलेय, प्रत्येक कामाला सगळ्यांना विचारत बसायचं का? सोसायटीत पांढरी पट्टी काढणाऱ्यांचा प्रसाद वेदपाठकला उलटा प्रश्न
Prasad Vedpathak White Line Controversy: आपल्या राहत्या सोसायटीत घडलेल्या एका घटनेवर प्रसादनं संताप व्यक्त करत संबंधित प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केलीय. त्याच्या या भूमिकेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली.

Prasad Vedpathak White Line Controversy: सध्या घाटकोपरमधल्या (Ghatkopar News) सोसायटीमधील वाद चर्चेचा विषय ठरतोय. सोशल मीडियावर या वादावरुन वेगवेगळ्या चर्चा रंगल्याचं पाहायला मिळतंय. प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर (Social Media Influencer), कंटेंट क्रिएटर (Content Creator) आणि युट्यूबर प्रसाद वेदपाठक (YouTuber Prasad Vedpathak) पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. त्यानं काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केलेला. प्रसाद वेदपाठकचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. या व्हिडीओमुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. आपल्या राहत्या सोसायटीत घडलेल्या एका घटनेवर प्रसादनं संताप व्यक्त करत संबंधित प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केलीय. त्याच्या या भूमिकेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली.
प्रसाद वेदपाठकनं (Prasad Vedpathak) स्वतःच्या सोशल मीडिया हँडलवरुन आणि विविध माध्यमांच्या प्लॅटफॉर्मवरुन आपली बाजू सर्वांसमोर मांडलेली. त्यानं अनेक दावे केले. तसेच, इन्फ्लुएन्सर असलेल्या प्रसाद वेदपाठकनं सर्वांदेखत नाजारीसुद्धा व्यक्त केलेली. पण, आता पहिल्यांदाच या प्रकरणात जी पांढरी पट्टी केंद्रस्थानी आहे, ती पांढरी पट्टी मारणाऱ्या जैन कुटुंबीयांनी (Jain Family) यावर भाष्य केलं आहे. या प्रकरणाचा आढावा घेण्यासाठी 'मुंबई तक'ची टीम तिथे पोहोचली, त्यावेळी तिथे पांढरी पट्टी काढणारं जैन कुटुंबीयसुद्धा उपस्थित होतं. यावेळी दोन्ही कुटुंबीयांनी एकमेकांसमोर आपापली बाजू स्पष्टपणे मांडली.
पांढरी पट्टी मारणाऱ्या जैन कुटुंबाचं म्हणणं नेमकं काय?
"चातुर्मासनंतर चार महिन्यांत हा पांढऱ्या पट्टीचा रंग निघून जाईल, पुसट होईल... ", असं पांढरी पट्टी मारणाऱ्या जैन कुटुंबानं सांगितलं.
प्रसाद वेदपाठक त्यांना म्हणाला की, "याला ट्रेडिशन बनवू नका... जर तुम्ही प्रत्येक वर्षी अशा पद्धतीनं केलं, तर मग ते योग्य ठरणार नाही... "
जैन कुटुंबानं प्रसाद वेदपाठक आणि त्याच्या कुटुंबीयांशी बोलताना सांगितलं की, "हे पहिल्यांदाच आम्ही केलंय, जर तुम्हाला प्रॉब्लेम होत असेल तर, मी पुढच्या वर्षी नाही करणार, आम्हाला कुणालाच कसलाही त्रास द्यायचा नाहीय... तुम्हीच आहात, ज्यांना त्रास होतोय, इतर कुणालाही कसलाही त्रास होत नाहीय. "
"आम्ही एकटेच नाही, इतरही आहेत... तुम्ही बोला सगळ्यांशी, मिटिंग ठेवा... मग तुम्हाला कळेल की, किती लोकांना प्रॉब्लेम आहे...", असं प्रसाद वेदपाठक म्हणाला.
त्यावरही जैन कुटुंबीयांनी उत्तर दिलंय. ते म्हणाले की, "प्रसाद सर, जर असं असेल ना तर, आपण सोसायटीच्या 33 मेंबर्सचं सजेशन घेऊयात, व्होटिंग घेऊयात... जर त्यात सर्वांना वाटलंच की, हे योग्य नाही, तर मग आपण ही पट्टी तात्काळ काढून टाकू..."
प्रसाद वेदपाठक म्हणतो की, "सर जर मला एकट्यालाही त्रास असेल ना, तरी मी ही पट्टी इथे राहू देणार नाही... हे मी तुम्हाला आज हात जोडून सांगतोय, मी इथे धरणं आंदोलनाला बसीन..."
"आम्हाला सोसायटी वाल्यांनी सांगितलं की, या पांढऱ्या पट्टीनं कुणालाच काहीच त्रास होणार नाही... त्यामुळे आम्ही पट्टी काढली, आता सोसायटीनंच आम्हाला परवानगी दिली, म्हटल्यावर आम्ही सर्वच्या सर्व 33 मेंबर्सकडे थोडीच परवानगी मागण्यासाठी जाणार? कमिटी आहे म्हटल्यावर कुणी कशाला घरोघरी जाऊन विचारत बसेल... आम्ही कमिटीला लेटर दिलं, कमिटीनं संमंती दिली, कमिटीनं बघायला हवं होतं, कुणाला विचारायचं, कुणाला नाही...", आपली बाजू मांडताना जैन कुटुंबानं सांगितलं.
प्रसाद वेदपाठकची आईसुद्धा त्यावेळी तिथे उपस्थित होती. त्या म्हणाल्या की, "जर तुमचा हेतू योग्य होता ना, तर मग तुम्ही आमच्याशी प्रेमानं बोलायला हवं होतं की, तुमचा गैरसमज झालाय..."
त्यानंतर प्रसाद वेदपाठकनं पुढे येऊन सोसायटीत पांढरी पट्टी मारणाऱ्या जैन कुटुंबाला प्रश्न विचारला की, "हा निर्णय तुमचा होता की, तुमच्यावर कुणी बळजबरी केलीय?", त्यावर त्यांनी सांगितलं की, "आम्ही आमच्या जैन धर्माच्या हिशोबानं केलंय, पुढच्या वर्षी करणार नाही. आम्हाला कुणालाच त्रास द्यायचा हेतू नव्हता... आमच्या धर्मात कुणाला दुःख द्यावं, अशी शिकवणच नाहीय,आमची चांगली भावना होती आणि सगळे विचार करतील की, आमच्या बिल्डिंगमध्ये साध्वी येतील, याच हेतून केलेलं..."
प्रसाद वेदपाठकच्या पत्नीनं विचारलं की, गेल्या 25 वर्षांपासूनच साध्वी येतायत, मग ही पांढरी पट्टी आजच का? त्यावर जैन कुटुंबानं आपली बाजू मांडताना म्हटलं की, "कित्येक साध्वी इमारतीच्या गेटवरुनच निघून जात होत्या... 100 पैकी 95 साध्वी निघून जायच्या, फक्त पाचच येत होत्या..."
वाद नेमका काय?
प्रसाद वेदपाठक याच्या सोसायटीत काही जैन समाजातील लोकांनी ही पांढऱ्या रंगाची पट्टी मारल्याची माहिती समोर आली आहे. यावर प्रसाद वेदपाठक यानं प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच, आपल्या सोसायटीच्या आवारात अशी पांढरी पट्टी मारण्यात आली, त्यावेळी आपली परवानगी कुणीच घेतलेली नाही, असा दावाही प्रसाद वेदपाठक यानं केला आहे. प्रसाद वेदपाठक यानं दिलेल्या माहितीनुसार, जैन धर्मगुरूंसाठी ही पट्टी आखण्यात आली आहे. धार्मिक मान्यता पाळायच्या असतील तर त्या घरी कराव्यात सार्वजनिक ठिकाणी असं प्रकारच्या कृत्यावर प्रसादनं आक्षेप नोंदवला आहे. तसेच, हा धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, त्यामळे ही पट्टी लवकरात लवकर हटवावी, अशी मागणीही प्रसाद वेदपाठक यानं केलेली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
ABP Majha च्या बातम्या LIVE:






















