Prasad Vedpathak White Line Controversy: मुंबईतील सोसायटीत जैन धर्मगुरूंच्या स्वागतासाठी परवानगीशिवाय पांढरी पट्टी; इन्फ्लुएन्सर प्रसाद वेदपाठकचा 'तो' VIDEO व्हायरल
Prasad Vedpathak White Line Controversy: मुंबईतील विद्याविहार येथील 'कैलास अवेन्यू' सोसायटीमध्ये रहिवाशांच्या परवानगीशिवाय जैन धर्मगुरूंसाठी ऑईल पेंटनं मारण्यात आलेल्या पांढऱ्या पट्टीवर प्रसाद वेदपाठकनं आक्षेप घेतलाय.

Prasad Vedpathak White Line Controversy: प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर (Social Media Influencer), कंटेंट क्रिएटर (Content Creator) आणि युट्यूबर प्रसाद वेदपाठक (YouTuber Prasad Vedpathak) पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. त्यानं नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. प्रसाद वेदपाठकचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आपल्या राहत्या सोसायटीत घडलेल्या एका घटनेवर प्रसादनं संताप व्यक्त करत संबंधित प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्याच्या या भूमिकेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
मुंबईतील (Mumbai News) विद्याविहार (Vidyavihar) येथील 'कैलास अवेन्यू' सोसायटीमध्ये रहिवाशांच्या परवानगीशिवाय जैन धर्मगुरूंसाठी ऑईल पेंटनं मारण्यात आलेल्या पांढऱ्या पट्टीवर (White Strip To Welcome Jain Religious Leaders) प्रसाद वेदपाठकनं आक्षेप घेतलाय. यासंदर्भात त्यानं केलेला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रसाद वेदपाठक यानं पांढऱ्या पट्टीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच, सोसायटीतील रहिवाशांची किंवा लँडलॉर्ड म्हणून त्यांची कोणतीही पूर्वसंमती घेतली नसल्याचा आरोप केला आहे.
प्रसाद वेदपाठक शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये नेमकं काय म्हणाला?
सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रसाद वेदपाठक यानं त्याच्या सोशल मीडिया हँडलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये प्रसाद वेदपाठक यानं म्हटलंय की, सोसायटी कमिटीमधील काही जैन सदस्यांनी एकतर्फी निर्णय घेऊन परमनंट पांढरी पट्टी इमारतीच्या आवारात मारली आहे. जी सामायिक जागेचा (Common Space) गैरवापर करणारी आहे. त्यानं यामागील लॉजिकवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटलंय की, जर आज अशी पांढरी पट्टी मारली, तर उद्या कोणीही इतर रंगांच्या पट्ट्या मारेल, धार्मिक मान्यता पाळायच्या असल्यास साधुसंतांना खांद्यावर घेऊन घरी न्यावं, पण असे प्रकार करू नयेत. या प्रकारामुळे मानसिक मनस्ताप झाला असून, सर्व रहिवाशांची माफी मागावी आणि ही पांढरी पट्टी तातडीनं काढावी, अशी मागणी त्यानं केली आहे.
माध्यमांना प्रतिक्रिया देताना प्रसाद वेदपाठक यानं म्हटलंय की, "आतापर्यंत ऐकलेलं हिंदू खतरे में हैं... कुणापासून खतरा हैं हे माहीत नव्हतं... आज कळलंय हा खतरा आम्हाला कुणापासून आहे. आम्ही इथले मूळ रहिवाशी, माझ्या आज्जीनं ही बिल्डिंग डेव्हलप केलीय. माझ्या पणजोबांनी ही जागा विकत घेतलेली आणि आज ही पांढरी पट्टी इथे मारली, तेव्हा आम्हाला विचारलंसुद्धा नाही... फार वाईट वाटतंय, आता रोज ही पट्टी आम्हाला पाहावी लागणार आहे, डोळ्यांत खुपणार आहे, आपली औकात नक्की काय आहे इथे? मुंबईत, या मातीवर... भूमीपुत्र आहोत आपण... इथे आपली औकात काय? फार लागतंय... म्हणजे, जर मी इथे गोंधळ घातला, बोकड कापला... इकडे मी कोंबड्या कापल्या तर चालेल का? किंवा एखाद्या मुस्लिम बांधवानं 'अल्ला हू अकबर' लिहिलं असतं, तर चाललं असतं का? हा प्रश्न आहे..."
"गेल्या 25 वर्षांपासून ही बिल्डिंग इथे उभी आहे. जैन धर्मगुरू नेहमी येतात, आम्ही त्यांचा खूप आदर करतो, पण ही पट्टी पहिल्यांदाच आलीय. या पट्ट्या घाटकोपरमधल्या फुटपाथवर तुम्हाला पाहायला मिळतील. तोसुद्धा एक विषयच आहे की, ते सगळं कोणत्या फंडातून केलं जातंय. पण आज ती पट्टी धावत धावत आमच्या बिल्डिंगमध्ये, प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये आलीय. ही फार धोक्याची गोष्ट आहे, प्रत्येक मराठी रहिवाशांनी, मूळ स्थानिकांनी, भूमीपुत्रांनी या गोष्टीची नोंद केली पाहिजे, यामागचं राजकारण समजून घेतलं पाहिजे...", असं प्रसाद वेदपाठक म्हणालाय.
"बरेच आमच्यासारखे रहिवाशी असतील, प्रत्येकात हिंमत होत नाही की, आपण बहुमताच्या विरोधात जाऊन बोलावं, मी ती हिंमत दाखवलीय, मला असं वाटतं की, भारतात तुम्ही फोर्सफुली एकरुपता नाही आणू शकत, एकतेची गरज आहे. त्यासाठी सर्वांची समंती लागले, सर्वांना मानसन्मान द्यावा लागतो. कुणालाही गृहीत धरून, जबरदस्तीनं असं नाही करू शकत. माझं एवढंच म्हणणं आहे की, प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये जर आम्ही राहतो, तर एकदा तरी विचारा...", असं मत प्रसाद वेदपाठक यांनी व्यक्त केलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
ABP माझाच्या बातम्या LIVE:






















