Prajakta Mali: मराठी चित्रपटसृष्टीतील लाडकी आणि लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) सध्या तिच्या एका वैयक्तिक अनुभवामुळे चर्चेत आली आहे.आपल्या अभिनयानं आणि नृत्यानं चर्चेत राहणारी प्राजक्ता सोशल मीडियावरही तितकीच सक्रिय असते. सोशल मीडियावरील वाढत्या सायबर गुन्ह्यांवर बोलताना प्राजक्ताने घडलेला एक प्रसंग उघड केला आहे. तिने शेअर केलेल्या अनुभवामुळे सोशल मीडियाच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
काय म्हणाली प्राजक्ता?
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून प्रत्येक घराघरात पोहोचलेली प्राजक्ता अलीकडेच ‘MHJ Unplugged’ या कार्यक्रमात सहभागी झाली होती. यावेळी तिला सोशल मीडियाबद्दल विचारले असता तिने कबूल केले, “मला आयुष्यात कधीच भीती वाटली नव्हती, पण आता मात्र मला सोशल मीडियाची खरी भीती वाटते.” तिने यावेळी सायबर क्राईम विभागाशी झालेल्या भेटीचा अनुभव सांगितला. या भेटीत तिला पोलिसांनी काही धक्कादायक गोष्टी समजावून सांगितल्या. पोलिसांच्या हाती लागलेल्या काही आरोपींचं वय फक्त 19 ते 20 वर्षांच्या आसपास होतं. एवढ्या लहान वयात हे तरुण नेमकं काय करत आहेत, याची त्यांनाही जाणीव नव्हती.
प्राजक्ताने सांगितलेला किस्सा मात्र अधिकच धक्कादायक होता. सायबर पोलिसांनी एका आरोपी मुलाला तिच्याशी फोनवर जोडले होते. प्राजक्ताने थेट त्याला विचारलं, “तू माझ्याबद्दल असे व्हिडिओ का टाकलेस?” त्यावर त्या मुलाने उघड केलं की त्याने एक फेक प्रोफाईल बनवून त्यावर फक्त प्राजक्ताचे खराब स्वरूपात एडिट केलेले व्हिडिओ टाकले होते. जेव्हा प्राजक्ताने कारण विचारलं तेव्हा मुलाने दिलेलं उत्तर ऐकून ती अवाक झाली. तो म्हणाला, “तुम्ही ट्रेंडिंगमध्ये होतात म्हणून.” खरं तर तो मुलगा प्राजक्ताचा चाहता होता, पण प्रसिद्धीच्या हव्यासापोटी आणि ट्रेंडमध्ये येण्यासाठी त्याने हा घाणेरडा प्रकार केला होता. यानंतर मुलाने तिला विनंती केली की, “प्लीज माझ्या घरच्यांना सांगू नका, माझे वडील मला चाबकाने मारतील.”
प्राजक्ता माळीने सोशल मीडियाबाबत दिला सल्ला
"तुमच्या वैयक्तिक आयुष्याची माहिती सोशल मीडियावर शेअर करू नका. मीही ती कधी करत नाही. मला ही गोष्ट फार महत्त्वाची वाटते जिथे एक मोठा हत्ती आहे आणि चार माणसं आहेत. एका माणसाच्या हातात शेपूट आहे, दुसऱ्या माणसाच्या हातात सोंड आहे, तर तिसऱ्याच्या हातात पाय आहे; त्यानुसार ते त्यांचे नट तयार करतात. अशा परिस्थितीत, खरं सत्य आपल्यापर्यंत पोहोचतच नाही. आपल्याला संपूर्ण चित्र माहित नसते. आपण फक्त जे आपल्या हाताला लागते त्यावर बोलतो. म्हणून नेहमी सावधगिरी बाळगा."