Marathi comedy Actor: कुठलातरी स्टॅन्ड अप कॉमिकवर FIR दाखल झाला, कॉमेडी शो बंद पडला, भावना दुखावल्याने एखाद्या कलाकाराचं करियर थांबलं अशा अनेक गोष्टी प्रेक्षकांना वारंवार ऐकायला मिळतात. दर काही दिवसांनी कुठलातरी नटावर काही ना काही येताना दिसतच. अशा काळात स्टॅन्ड अप कॉमेडीला फुटलेलं पेव, एखादा विचार थेट मांडण्यासाठी येणाऱ्या अडचणींवर मराठी विनोदी अभिनेता कमलाकर सातपुते (kamlakar satpute) बोललाय. कॉमेडी कलाकाराला मिळणाऱ्या वागणुकीवरही त्याने स्पष्टपणे प्रतिक्रिया दिली. एका कॉमेडी शोनंतर एका चॅनलच्या ऑफिसवर दगडफेक झाल्याचंही त्याने सांगितलं.
अभिनेता कमलाकर सातपुतेने अनेक मराठी चित्रपटांमधून तसेच कॉमेडी शोमधून गेली 14 वर्ष प्रेक्षकांना खळखळून हसवले आहे. 'गलगले निघाले' 'यांचा काही नेम नाही' 'शहाणपण देगा देवा' 'अजब लग्नाची गजब गोष्ट' तसेच कॉमेडी एक्सप्रेस घडलय बिघडलं यासारख्या कॉमेडी शोजमधूनही अभिनेत्याने प्रेक्षकांच्या मनोरंजन केले. अलीकडेच राजश्री मराठीशी बोलताना त्याने अनेक गोष्टींचा उलगडा केला.
'त्या' शोमुळे चॅनलच्या ऑफिसवर दगडफेक
अभिनेता म्हणाला, " घडलय बिघडलय नावाची सिरीयल होती, झी मराठीवर. श्रीरंग गोडबोले आणि केदार शिंदे या दोघांनी दिग्दर्शक केलेली. त्यात रंगा दादा किंवा केदार सकाळी ज्या वर्तमानपत्रातील बातम्या आहेत त्यावर स्क्रिप्ट लिहायचे. त्यावर आम्ही प्रहसन सादर करायचो. तो अर्धा तासाचा एपिसोड असायचा. त्या प्रसनात थेट भाष्य केलं जायचं. एक एपिसोड आम्ही केला होता त्यानंतर झीच्या ऑफिसवर दगडफेक झाली होती. तेव्हा बोलला जायचं. आपल्याकडे लोकनाट्याचा जो फॉर्म आहे त्यात आपण थेट बोलू शकतो. जे दिसतं ते लोकांना सांगायचं हीच पद्धत लोकनाट्याने आपल्याला शिकवली. पण आता ही गोष्ट राहिलेली नाही. त्यामुळे सहाजिकच आता प्रहसन सादर करताना भीती वाटते. आता कदाचित त्या फॉरमॅटमध्ये एखादा प्रकार सादर केला तर तो चालणारच नाही. तेव्हा मी त्याचे प्रयोग तरी केले. त्यावेळी आनंद दिघे साहेब आमच्या पाठीशी उभे राहिले. त्यामुळे प्रयोग होऊ शकले. आता ते शक्य नाही. आता असे प्रयोग होऊ शकत नाहीत.
आताही कुठे कार्यक्रम करत असताना आम्ही बोलणं टाळतो. आम्हाला वाटतं नकोच ते.. नंतर त्याचे प्रॉब्लेम आम्हाला सहन करावे लागतात. काहीतरी वाईट घडण्यापेक्षा ते टाळलेलच बरं असं वाटतं. पुढे त्याचे पडसाद आपल्याला सहन करावे लागतील, त्यापेक्षा न केलेलं बरं असं वाटतं. असं अभिनेता कमलाकर सातपुते म्हणाला.
स्टॅन्डअप वरही स्पष्ट बोलला...
मी अनेक लोकांचे स्टॅन्ड अप कॉमेडी शो सोशल मीडियावर बघतो. काही लोक खरंच छान करत आहेत. पण काही लोक का करतात असं वाटतं. ते कशासाठी करतात असं वाटत असलं तरी लोक त्यांना प्रतिसाद देताना दिसतात. म्हणजे चूक सादरकर्त्यांची नाही. लोक तिथे जात आहेत त्यांना प्रतिसाद देत आहेत. म्हणून ते करत असतील. जशी मागणी तसा पुरवठा. जर तुम्हाला ते आवडत आहे तर त्या पद्धतीचं काम तो स्टॅन्ड अप कॉमेडियन करतो. सगळेच वाईट आहेत असं आपण म्हणू शकत नाही. ज्या पद्धतीचा विनोद ती लोक करत आहेत तो विनोद आवडणारे ही लोक आहेत. कुणाला एकाला दोष देण्यात काहीही अर्थ नाही. असेही तो म्हणाला.
आताचे जे रियालिटी शो आहेत अगदी बिग बॉस पासून ते महाराष्ट्राचे हास्य जत्रापर्यंत. केशव लोकांना का आवडतात? याचं कारण आहे समाजातले प्रश्न समस्या, त्यातला विनोद हा खूप निखळ आहे. त्यामुळे लोकांना हे बघायला आवडतं. किंवा सादर करताना तो कलाकार फार निरागसने तो विनोद सादर करतो त्यामुळे ते लोकांना भावतं.
