Nargis dutt mother was tawaif : नर्गिस दत्त यांना भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सर्वश्रेष्ठ अभिनेत्रींपैकी एक मानले जाते. जवळपास 20 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी रूपेरी पडद्यावर अनेक भूमिका साकारल्या. मात्र या कालावधीतही त्यांनी स्वतःची वेगळी अशी छाप निर्माण केली की, आजही त्या भारतीय सिनेमा क्षेत्रातील एक महान अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. हे सर्व त्यांनी अशा काळात साध्य केलं, जेव्हा अनेक गोष्टींमध्ये महिला कलाकारांना प्रिव्हिलेज मिळालं नव्हतं.
नर्गिस यांचे बालपण आणि सुरुवातीचं करिअर
नर्गिस यांचा जन्म फातिमा रशीद या नावाने झाला. त्या जद्दनबाईंची कन्या होत्या. जद्दनबाई या भारतीय चित्रपटसंगीताच्या अग्रदूत मानल्या जातात. त्या आपल्या काळातील प्रसिद्ध संगीतकार होत्या, तसेच एक नामांकित तवायफही होत्या. खरंतर जद्दनबाईंच्या आई, म्हणजेच नरगिस यांची आजी दलीपाबाई 20व्या शतकाच्या सुरुवातीस एक प्रसिद्ध वेश्या होत्या.
नर्गिस यांचे वडील मोहनचंद उत्तमचंद त्यागी हे हिंदू व्यापारी होते, ज्यांनी जद्दनबाईंशी विवाह करण्यासाठी इस्लाम धर्म स्वीकारून ‘अब्दुल रशीद’ हे नाव घेतले. ही जद्दनबाईंचं तिसरं लग्न होतं. 1929 साली जन्मलेल्या नरगिस यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केवळ 6 व्या वर्षी "तलाश-ए-हक़" या आईच्या चित्रपटातून केली. 12 वर्षांपर्यंत त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून काम केले.
14 व्या वर्षी बनल्या प्रमुख अभिनेत्री
14 व्या वर्षीच नर्गिस यांनी महबूब खान यांच्या तकदीर या चित्रपटातून प्रमुख अभिनेत्री म्हणून झेप घेतली. हा चित्रपट यशस्वी ठरला. 1940 च्या दशकाच्या मध्यावर त्यांच्या काही चित्रपटांनी मध्यम प्रतिसाद मिळवला, तर काही अपयशीही ठरले. 1949 ते 1951 या काळात त्यांनी अंदाज, बरसात आणि आवारा या तीन गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केले. हे सर्व चित्रपट बॉक्स ऑफिसवर विक्रमी यशस्वी ठरले आणि त्या काळातील सर्वाधिक कमाई करणारे भारतीय चित्रपट ठरले. या सर्व चित्रपटांत नरगिस यांच्यासोबत राज कपूर प्रमुख भूमिकेत होते.
या यशानंतर नर्गिस देशातील सर्वोत्कृष्ट आणि नंबर वन अभिनेत्री ठरल्या. 1957 मध्ये आलेल्या मदर इंडिया या चित्रपटाने त्यांच्या अभिनयाच्या कारकिर्दीला नवा उच्चांक दिला. हा त्या काळातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. विशेष म्हणजे, हा भारतीय चित्रपट इतिहासातील पहिला असा चित्रपट होता — जो एका स्त्रीच्या प्रमुख भूमिकेमुळे इतका यशस्वी झाला.
29 व्या वर्षी अभिनयातून निवृत्ती का घेतली?
1958 मध्ये, नर्गिस यांनी मदर इंडिया मधील सह-अभिनेता सुनील दत्त यांच्याशी विवाह केला आणि कुटुंबाला प्राधान्य देण्यासाठी अभिनय क्षेत्रातून निवृत्ती घेतली. पुढे 1967 मध्ये, दिग्दर्शक सत्येन बोस यांनी त्यांना एक प्रयोगशील आणि धाडसी चित्रपट "रात और दिन" साठी पुन्हा अभिनयात उतरवले. या चित्रपटासाठी त्यांना त्यांचा एकमेव राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
1980 मध्ये नर्गिस यांना राज्यसभेचे सदस्य म्हणून नामांकित करण्यात आले. मात्र, त्यांच्या कार्यकाळाच्या पहिल्याच वर्षी त्यांना कॅन्सर असल्याचे निदान झाले. 1981 साली, केवळ 51 वर्षांचे वय असताना त्यांनी शेवटचा श्वास घेतला. काही रिपोर्टनुसार, त्या पुन्हा अभिनय क्षेत्रात परतण्याच्या तयारीत होत्या. नर्गिस यांचे आयुष्य म्हणजे संघर्ष, प्रतिभा आणि समर्पण यांचा उत्तम संगम. केवळ एक अभिनेत्री म्हणून नव्हे, तर महिला म्हणूनही त्यांना सिनेक्षेत्रात आदर्श मानले जाते.
इतर महत्त्वाच्या बातम्या