Sharmishta Raut On Entertainment Industry: मनोरंजन विश्व (Entertainment World) जेवढं झगमगतं, चमचमतं दिसतं, तेवढीच काळ्याकुट्ट अंधारानं माखलेली त्याची दुसरीही बाजू आहे. एकीकडे ग्लॅमरचं जग, दुसरीकडे अतिशय घाणेरड्या अनुभवांचा सामना करत, अनेक कलाकार इथे आलं नशीब आजमवण्याचा प्रयत्न करत असतात. काहींना यश मिळतं, तर काहींच्या वाट्याला फक्त हादरवणारे, घाणेरडे अनुभव येतात. याबाबत अनेक अभिनेत्रींनी, अभिनेत्यांनी खुलासा केला आहे. अशाच एका वाईट अनुभवाचा खुलासा मराठी अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतनं (Actress Sharmishta Raut) केला आहे. पहिल्याच मालिकेच्या वेळी आलेल्या घाणेरड्या अनुभवाबाबत शर्मिष्ठानं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत खुलासा केला आहे.
शर्मिष्ठा राऊत नेमकं काय म्हणाली?
काही दिवसांपूर्वी राजश्री मराठीला दिलेल्या एका मुलाखतीत बोलताना शर्मिष्ठा राऊतनं तिच्यासोबत घडलेल्या एका प्रसंगाबाबत सांगितलें. शर्मिष्ठा म्हणालेली की, "मी ही घटना आधी सांगितली आहे की, नाही ते मला आठवत नाहीये. मी एक शो करायचे. इंडस्ट्रीत पदार्पण केल्या केल्या शो केला. मी त्या कार्यक्रमाचं आणि निर्मात्यांचं नाव घेणार नाही कारण ते खूप चांगले आहेत. तिकडे एक अभिनेते होते, ते ज्या पद्धतीनं मी सेटवर आल्यावर मला ग्रीट करायचे, ते मला समजत होतं की, चुकीचं आहे. त्यावेळी मी खूप प्रसिद्ध अभिनेत्रीही नव्हते... माझी अगदीच सुरुवात होती. ते ज्या पद्धतीनं मला ग्रीट करायचे, मला समोरून मिठी मारायचे. तेव्हा मला त्यांचा स्पर्श कळायचा. मला कळायचं की, हा स्पर्श चुकीचा आहे. पाठीवरून फार विचित् पद्धतीनं हात फिरवायचे..."
पुढे बोलताना शर्मिष्ठा म्हणाली की, "तेव्हा माझं असं झालेलं की, आताच आलोय आणि काहीच माहित नाहीये. हे घरीही जाऊन सांगता येणार नाही. त्यांनाही टेन्शन येणार. मी कसं बोलू? मला कळत नव्हता. हे दोन-तीनदा त्या सेटवर तसंच झालं . मग मी एक दिवशी ठरवलं की, मी बोलणार. जास्तीत जास्त काय होईल आपण इंडस्ट्रीतून बाहेर होऊ. आउट झालो तरी, माझ्याकडे डिग्री आहे. मी पंधरा ते वीस हजाराची नोकरी कमावू शकते.मला काही गोष्टींवर बोललंच पाहिजे.हेच मला माझ्या आई-वडिलांनी शिकवलं आहे.त्यानंतर पुन्हा एकदा ते सेटवर मला मिठी मारायला आले 'अरे हाय म्हणून. तेव्हा मी त्यांना म्हटलं 'सर मी घातलीय तर त्यांना कळलं नाही, मी काय बोलतेय तेव्हा मी त्यांना म्हटलं 'सर चेक करू नका मी माझे अंतर्वस्त्र घातलेले आहेत.' इतकं धडधडीत मी 70 लोकांसमोर मोठ्यांदा बोलले..."
"त्यानंतर त्यांनी पुन्हा असं कधीच केलं नाही. ते मी आले की समोरही यायचे नाहीत. आले तरी साईडला जायचे. ही गोष्ट मी कधी घरीही सांगितली नाही कारण मला कळायचं नाही सांगू की नको. पण मी बाहेर बोलून मोकळी झाले होते. मला असं वाटतं की, ही निर्णय घेण्याची क्षमता, हा स्पष्टवक्तेपणा मला माझ्या आई-वडिलांकडून मिळाला आहे. आणि जर कोणाबरोबर असं काही घडत असेल तर त्याच क्षणी या प्रवृत्तीला ठेचा. त्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही.", असं शर्मिष्ठा राऊत म्हणाली.
दरम्यान, शर्मिष्ठा राऊतनं 'हे मन बावरे' , 'अबोली' , 'जुळून येती रेशीमगाठी' या मालिकांमध्ये काम केलंय. तसेच, तिनं 'चि व चि.सौ.का', 'रंगकर्मी' आणि 'योद्धा' या सिनेमांमध्ये काम केलंय. 'चि व चि.सौ.का', 'रंगकर्मी' आणि 'योद्धा' या चित्रपटांमध्ये शर्मिष्ठानं महत्वाची भूमिका साकारलीय. त्यानंतर शर्मिष्ठाच्या 'सारं काही तिच्यासाठी' मालिकेतही दिसलेली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
