Pankaj Panchariya Post After Actor Tushar Ghadigaonkar Suicide: मराठी अभिनेता तुषार घाडीगांवकरनं (Tushar Ghadigaonkar) आत्महत्या करत आपलं आयुष्य संपवलं. तुषारनं टोकाचं पाऊल उचलल्यानं अख्खी सिनेसृष्टी हादरली. तुषार घाडीगांवकरला काम मिळत नसल्यानं त्यानं टोकाचं पाऊल उचलल्याचं बोललं जाऊ लागलं. पण, आता तुषारच्याच एका जवळच्या मित्रानं एका फेसबुक पोस्टमार्फत एक खुलासा केला आहे. तसेच, तुषारनं एवढं मोठं पाऊल का उचललं याचंही कारण तुषारचा जवळचा मित्र आणि मराठी अभिनेता पंकज पंचारियानं सांगितलं आहे. आपल्या पोस्टमध्ये पंकजनं सर्वात आधी तुषारच्या आत्महत्येबाबत किंवा कोणत्याही कलाकाराबद्दल चुकीची माहिती पसरवू नये, अशी विनंती सर्वांना केली आहे. 

मराठी अभिनेता पंकज पंचारिया नेमकं काय म्हणाला? 

तुषारचा मित्र आणि मराठी अभिनेता पंकज पंचारियाने सोशल मीडियावर पोस्ट लिहून तुषारच्या आत्महत्येमागील कारणाचा शोध घेतला. फेसबुक पोस्टमध्ये पंकज म्हणाला की, "आत्महत्या हा इतका साधा विषय नाही. जो आपण आपल्या सोईनुसार आपल्या लाईक्ससाठी किंवा तुषार कसा आमचा चांगला मित्र होता. आमचे आणि त्याचे कसे चांगले संबंध होते. किंवा तुषारबद्दल असलेली चुकीची माहिती जी आपल्या सामाजिक माध्यमातून व्यक्त करून आपले views वाढवायचे. इतके निर्दय झालो का आपण? एकदा पण भीती नाही वाटली की, आपली पोस्ट तसेच आपण काय बोलत आहोत. ह्याचे त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर (जे आता राहिलेच नाही) कौटुंबिक परिस्थितीवर काय परिणाम होऊ शकेल."

"मेलेल्या माणसाच्या डोक्यावरचे लोणी खाणे म्हणजे काय असते. हे आज दिवसभरात पाहण्यास मिळाले. काही कलाकार पत्रकार मंडळी ह्यांच्याशी बोलून अनेक पोस्ट आज डिलिट पण झाल्या. मुद्दा खूप साधा आहे. इतकी ताकद कुठून आली,की आपण पूर्वमाहिती न घेता सरळ सरळ पोस्ट करून मोकळे होत. का एखाद्याची बदनामी करायची. दुःख पोस्ट टाकून,स्टोरी टाकून, किंवा जड शब्दांमध्ये कविता लिहून. आपण ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक ऑस्कर जिंकणारे कलाकार नाही होणार.(काही वृत्तसंस्था किंवा पत्रकार जबाबदारीनं बातमी देत आहे, ह्याची पण जाणीव आहे) मिळणारं.", असं पंकज म्हणाला. 

पुढे बोलताना अभिनेता पंकज पंचारिया म्हणाला की, "घटना खूप वाईट आहे मित्रांनो. एक मुलगा आज आयुष्य संपवतो. बाप त्याला खांदा देतो. भरल्या डोळ्यांनी अग्नी देतो. काय अवस्था असेल. बापाला ज्या वयात पाणी मुलगा देतो. त्या वयात बापाला आणि बापा पेक्षा मोठ्या माणसाला आज शेवटचे पाणी देताना पाहिले. मन अजून खूप अस्वस्थ आहे. एक वर्षापूर्वी मी सोहम देवधरसोबत असताना तुषार आमच्याकडे येऊन आयुष्यातील अनेक गुंते सांगण्याचा प्रयत्न करत होता. (पण मोकळे पणाने नाही बोलला) खूप रडला रडता आपण चुकत आहोत, म्हणजे मी रडतो तर तुम्हाला चुकीचे नाही ना वाटतं असे तो मधेच विचारतं होता..परत शांत होत होता. पण काय अडचण आहे काय प्रॉब्लेम आहे.ह्यावर किंचित पण मोकळे पणाने बोलला नाही.ह्याची त्यावेळ जास्त भीती वाटली.की माणूस का रडत आहे."

"आज त्याला अग्नीवर ठेवल्यावर सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळत होती. की त्याला आयुष्य जड वाटू लागले. काय गुंता होता तो जळताना आज भरल्या डोळ्यांनी बघत होता. ज्यावेळी तुषार माझी घरी आला होता. त्याच काळात मला माझ्या काही वैयक्तिक अडचणी किंवा माझ्या आयुष्यातील न सुटणारा  गुंता ह्यामुळे मलाच आत्महत्या करायची होती.", असं पंकज म्हणाला. 

पंकज पंचारिया म्हणाला की, "मी माझ्या बहिणीची मानसिकता रोज तयार करायचो की, आपले आई वडील गेले. जर तुझा भाऊ अचानक गेला तर तू छान आयुष्य जग. आणि ताई चिडली की, म्हणायचो किती घाबरते गं. पण त्यावेळी माझ्या मनात खरंच आयुष्य संपवण्याचा विचार होता. मी माझ्या डॉक्टरांकडे ज्यावेळी हे सगळे बोलून दाखवलं. डॉक्टरांनी काही मित्रांना सांगितलं त्यात शार्दुल, सोहम हे दोन मित्र होते. सोहमनं त्याकाळात खूप जास्त सांभाळून घेतलं. मी मला काय वाटतं हे तुषारला बोलून पण दाखवलं...पण तो रडतच होता. तुषारला मी माझ्या अस्थिर मानसिक परिस्थिती सांगत होतो. त्यातून मी कसा बाहेर आलो, हे त्याला सांगण्याचा प्रयत्न केला."

"तुषारला मानसिक आरोग्यची अडचण आहे. हे मी बोलून दाखवल्यावर त्याला नाही आवडले. पुढील अनेक दिवस किंवा एक वर्ष माझ्याशी त्याने संपर्क नाही केला. मृत्यच्या काही दिवसांआधी तो संपर्क करण्याचा प्रयत्न करत होता. पण ते माझ्यापर्यंत पोहोचले नाही. जे पोहचले ते आज सगळ्यांनी पाहिले. माझ्या हाताचे पिठलं भात त्याला खूप आवडले. आज त्याच माणसाला शेवटचे पाणी देऊन घरी आलो. आणि एकता शांतपणे फक्त आणि फक्त डोळ्यांचे पाणी पुसत आहे. भारतातल्या अनेक अडचणींवर आपण चर्चा करतो. काळजी करतो. पण जवळील माणसे कधी कळतील का?लोकांशी आपण अबोला ठेवतो. कोणत्या अहंकारात आपण जगतो. का समजू नाही घेत जवळच्या लोकांना.", असं पंकजनं सांगितलं. 

"आत्महत्या  करण्याचे  विचार फक्त कलाकारांच्या मनात येत नाही. (त्यामुळे कोणत्याच कलाकाराला बदनाम करू नका) आयुष्य संपवणे हा अनेक नोकरदार वर्ग,क्लासवन ऑफिसर,व्यापारी, सामाजिक क्षेत्रात काम करणारे मान्यवर. घरात काम करणारी बाई, पोलीस. असे अनेक लोकांना ह्याचा त्रास होतो, की त्यांना त्यांच्या आयुष्यातील  अडचणी मुळे असे विचार येतात आणि अनेक लोक पाऊल पण उचलतात. पण ती वेळ खूप भयंकर असते. त्यामुळे आपण आपल्या जवळील लोकांशी बोलू आपल्या मित्रांची परिवाराची फक्त आणि फक्त काळजी घेऊ.मुक्त संवाद करू. परत कधीच आत्महत्याची पोस्ट माझ्यावर लिहिण्याची  वेळ आता नको.मित्रांना शुभेच्छा देण्याच्या काळात श्रद्धांजली द्यावी लागते. किती त्रास असेल ह्याचा ... मित्रा असेल तिथे आता तरी खुश राहा...", असं म्हणत पंकजनं भरल्या डोळ्यांनी मित्राला श्रद्धांजली वाहिली.