Indian Army Short Film In Amitabh Bachchans Voice:इंडियन आर्मीनं (Indian Army) आपल्या नव्या भैरव बटालियनचा (Bhairav ​​Battalion) एक व्हिडीओ जारी केलाय. या व्हिडीओला महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी आवाज दिलाय. भैरव हे केवळ नाव नाही तर ओळख आहे. भैरव केवळ नाव नाही तर परिणाम आहे, असं या व्हिडीओत म्हटलंय.

भारतीय लष्करानं अमिताभ बच्चन यांच्या आवाजात बनलेली 'भैरव' ही डॉक्युमेंट्री रिलीज केली आहे, ज्यामध्ये भैरव बटालियन आणि राष्ट्रीय सुरक्षेतील त्यांची भूमिका दर्शविली आहे. संरक्षण मंत्रालयाच्या (सेना) अतिरिक्त सार्वजनिक माहिती महासंचालनालयाच्या अधिकृत हँडलवर भारतीय लष्करानं कृतज्ञता व्यक्त केली आहे. "या डॉक्युमेट्रीला  प्रतिष्ठित आवाज दिल्याबद्दल आम्ही श्री अमिताभ बच्चन यांचे मनापासून आभार मानतो...", असं कॅप्शनमध्ये म्हटलंय.  

महाशिवरात्रीच्या निमित्तानं 'भैरव' बटालियन सुरू करण्यात आली, ही एक प्रतीकात्मक निवड आहे, कारण भैरवला भगवान शिवाचं भयंकर रूप मानलं जातं, जे संरक्षण आणि वाईटाच्या नाशाशी संबंधित आहे. भैरव बटालियन पॅरा स्पेशल फोर्सेस आणि नियमित पायदळ तुकड्यांमध्ये स्थित आहे. आधुनिक युद्धाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि राष्ट्राला शत्रूच्या धोक्यांविरुद्ध जलद आणि अचूक आक्रमक उपाय प्रदान करण्यासाठी ही बटालियन तयार करण्यात आलीय.

अमिताभ बच्चन यांचीही 'भैरव'साठी पोस्ट

ऑपरेशन सिंदूरसह जागतिक संघर्षांमधून ऑपरेशनल धडे घेत, लष्कराच्या अलिकडच्या पुनर्रचनेचा भाग म्हणून ही बटालियन तयार करण्यात आली. ट्विटरवर, बिग बी यांनी त्याच्याशी जोडलं जाणं हा एक सन्मान असल्याचं म्हटलंय आणि लिहिलंय की, "सेनेतील शूर योद्ध्यांना - भैरव... त्याच्याशी जोडलं जाणं हा एक सन्मान आणि सौभाग्य आहे..." 

दरम्यान, भारतीय सैन्यानं स्थापन केलेलं नवं विशेष दल, भैरव, आधुनिक युद्धाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी तयार केलं जातं. त्याचे सर्व कर्मचारी ड्रोन उडविण्यास आणि शत्रूच्या प्रदेशात खोलवर असलेल्या तळांना आणि सैन्यांना लक्ष्य करण्यासाठी प्रत्यक्ष ऑपरेशनमध्ये त्यांचा वापर करण्यास सक्षम आहेत.