मुंबई : सिद्धार्थ पिठानी हा सुशांत मृत्यू प्रकरणातील अत्यंत महत्वाचा साक्षीदार आहे. कारण, तो सुशांतचा मित्र होता. तो त्याच्याच सोबत रहात होता. सुशांतचा मृत्यू ज्या दिवशी झाला त्या दिवशी सिद्धार्थ वांद्र्यातील त्याच फ्लॅटवर होता. पण असं असताना सिद्धार्थ सातत्याने आपले जबाब बदलताना दिसतो आहे. आता मात्र त्याचा अंतिम जबाब घेण्याची वेळ सीबीआयने निश्चित केली आहे. गेल्या काही दिवसांपासून सीबीआय इतरांचे जबाब घेत असताना सिद्धार्थ पिठानी मात्र गायब झाला होता. आधी वेगवेगळ्या माध्यमातून रियाची पाठराखण करणारा सिद्धार्थ अचानक बोलायचा बंद झाला. तो मुंबईत नसल्याच्या बातम्याही आल्या. पण आता आलेल्या माहीतीनुसार, सिद्धार्थ दिल्लीत पोहोचला आहे. सीबीआयची टीम, जी सुशांत मृत्यूप्रकरणाचा तपास करण्यासाठी दिल्लीत आली होती तीही आता दिल्लीत पोचली आहे. आता दिल्लीत सिद्धार्थ पिठानीची साक्ष होणार आहे. सिद्धार्थ वारंवार आपला जबाब बदलतोय हे लक्षात घेऊन आता शेवटची होणारी त्याची साक्ष ही कलम 164 नुसार होणार आहे. म्हणजे, आता दिलेली साक्ष त्याला बदलता येणार नाही. काही साक्षीदारांच्या उपस्थितीत ही साक्ष लिहून घेतली जाणार आहे. सिद्धार्थ पिठानी सुशांत प्रकरणातला महत्वाचा साक्षीदार आहे. कारण, सुशांतचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या बेडरुमचा दरवाजा उघडताना सिद्धार्थ पिठानी होता. सुशांतचा लटवकवलेल्या अवस्थेतला मृतदेह आपणच खाली काढला असं सिद्धार्थ सांगतो. पण सहा फूट उंचीचा आणि 80 किलो वजनाचा धडधाकट शरीर एकटा माणूस खाली कसा काढेल अशाही शंका घेतल्या जातायत. आता त्यात रिया आणि सुशांत भेटल्याचाही मुद्दा आला आहे. मग रिया आणि सुशांत यांच्यादरम्यान समन्वयक म्हणून कुणी काम केलं तेही आता तपासून पाहिलं जाणार आहे. सिद्धार्थने आपल्या जबाबात सुशांत आपल्या रुममध्ये मध्यरात्री 1 वाजता येऊन गेल्याचं तो सांगतो. पण दुसरीकडे रियाला सोडायला सुशांत पहाटे दोन वाजता तिच्या घरासमोर असल्याचंही प्रत्यक्षदर्शी सांगतो. त्यामुळे आता सिद्धार्थ पिठानीच्या साक्षीला कमालीचं महत्वं आलं आहे. दुसरीकडे सुशांतसिंह मृत्यूप्रकरणात तपासले गेलेले पुरावे, साक्षी आणि आलेले अहवाल पाहता सुशांत प्रकरणाला 302 कलम लावण्याचा विचार सीबीआय करते आहे. हे कलम लागलं तर गु्न्हेगारांना 302 नुसार शिक्षा होऊ शकते. आलेले फॉरेन्सिक रिपोर्टही सुशांतचा मृत्यू होमीसाईड असू शकते असं सांगतो. त्यामुळे त्याबाबत काय करावं याचा विचार सध्या सीबीआय करत आहे. या सर्व घडामोडींसाठी 4 तारीख अत्यंत महत्वाची आहे. एकिकडे हा तपास अंतिम टप्प्यात आला आहे. दुसरीकडे सीबीआयची टीम आता दिल्लीत गेली आहे. तिथेही काही साक्षी अत्यंत गोपनीय पद्धतीने चालू आहेत. यानंतर सीबीआय या तपासातून काय निष्पन्न होतं ते पाहाणं कुतूहलाचं ठरणार आहे.
सिद्धार्थ पिठानीची अंतिम साक्ष 4 ऑक्टोबरला; सुशांत सिंह प्रकरणाला 302 कलम लावण्याचा सीबीआयचा विचार
सौमित्र पोटे, एबीपी माझा | 02 Oct 2020 03:12 PM (IST)