मुंबई : एकीकडे कंगना रनौत मुंबईला येण्यासाठी चंदीगडहून निघाली आहे, त्याचवेळी इथे मुंबईत कंगनाच्या कार्यालयातील अनधिकृत बांधकामावर कारवाईला सुरुवात झाली आहे. महापालिकेने कंगनाच्या कार्यालयाच्या तळमजल्यावर कारवाई सुरु केली आहे. कार्यालयातील 12 अनधिकृत बांधकामावर कारवाई केली जाणार आहे. कंगनाच्या पाली हिलमधील कार्यालयाबाहेर मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला असून, महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी दाखल झाले आहेत. हातोडा, फावडा, कुदळ घेऊन आलेले 50 पेक्षा जास्त कर्मचारी कारवाई करत आहेत. महापालिका दोन कॅमेऱ्यातून या कारवाईचं चित्रीकरण केलं जाणार आहे.


कंगनाच्या कार्यालयाच्या बांधकामाबाबत तक्रारी आल्या होत्या. त्यांना उत्तर देण्यासाठी मुदत दिली होती. महापालिका सगळ्यांना वेळ देते.  अवैध बांधकामावर कारवाई केली नाही तर तुम्हीच बोलणार. ही कारवाई अवैध बांधकामावरच होत आहे. नियमित बांधकामावर होत नाही, अशी प्रतिक्रिया मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी कारवाईबाबत दिली.


दरम्यान कंगना रनौतने या तोडक कारवाईचे फोटो ट्वीट करुन 'पाकिस्तान'असं कॅप्शन दिलं आहे. शिवाय #deathofdemocracy हा हॅशटॅगही वापरला आहे.


बीएमसीने कंगनाला पाठवलेली नोटीस बेकायदेशीर; कंगना रनौतच्या वकिलांचा आरोप


कंगना रनौतचं ट्वीट


'मणिकर्णिका फिल्म्ज'मध्ये 'अयोध्या'ची घोषणा केली होती. ही माझ्यासाठी एक इमारत नाही तर राम मंदिरच आहे, आज तिथे बाबर आला आहे. आज इतिहासाची पुनरावृत्ती होईल, राम मंदिर पुन्हा पडणार. पण लक्षात ठेव बाबर हे मंदिर पुन्हा बनणार, जय श्री राम, जय श्री राम ????





कंगनाच्या कार्यालयावर सूड भावनेने कारवाई
कंगनाच्या कार्यालयावर सूडबुद्धीने कारवाई केली जात आहे. नोटीस दिल्यानंतर बाजू मांडण्याची मुभा द्यायला हवी. कंगनाचं मनोधैर्य खच्चीकरण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. सरकारविरोधात बोलणाऱ्यांच्या मुळावर सरकार उठलं आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते राम कदम यांनी दिली. तसंच कंगनाच्या मुंबईबाबतच्या वक्तव्यांना भाजपचं समर्थन नाही, असंही त्यांनी सांगितलं.