मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूडची लीडिंग लेडी अनुष्का शर्मा अखेर लग्नाच्या बेडीत अडकले.


क्रिकेटर म्हणून विराट, तर एक अभिनेत्री म्हणून अनुष्का आजच्या तरुणाईचे आयकॉन्स आहेत. त्या दोघांचाही बाणा हा खुल्लमखुल्ला प्यार करेंगे हम दोनो... इस दुनिया से नही डरेंगे हम दोनो...असा बिनधास्त आहे. त्यामुळं त्या लव्हबर्डसना सारा देश आजवर एक हॉट कपल म्हणूनच ओळखत होता. पण आता त्या दोघांनी भारतीय संस्कृतीच्या रितीरिवाजानुसार एकमेकांना आयुष्यभर साथ देण्याचं वचन दिलंय. त्यांच्या विवाहानं क्रिकेट आणि बॉलिवूडच्या नात्याची आणखी एक लग्नगाठ घट्ट झाली.

क्रिकेट आणि बॉलिवूडमधल्या नात्याची परंपरा ही अनेक वर्षांची आहे. अगदी अलीकडचं उदाहरण द्यायचं तर झहीर खान आणि सागरिका घाटगे...  हरभजनसिंग आणि गीता बसरा... युवराजसिंग आणि हेजल कीच... या प्रेमी युगुलांनी विवाहबंधनात अडकून क्रिकेट आणि बॉलिवूडचं युगायुगाचं तेच नातं घट्ट केलं होतं.

क्रिकेट आणि बॉलिवूडमधल्या अनेक जोड्यांनी याआधीही साथ जियेंगेच्या शपथा घेतल्या होत्या. त्यात कुणाचं प्रेम सफल झालं, तर कुणाचं असफल. कुणी कुणी तर स्टेटस सिम्बॉल म्हणूनही एकमेकांची सोबत केली. झहीर खान-ईशा शर्वाणी, मोहम्मद अझरुद्दिन-संगीता बिजलानी, युवराजसिंग-किम शर्मा, वासिम अक्रम-सुश्मिता सेन, रवी शास्त्री-अमृता सिंग, सौरव गांगुली-नगमा, इम्रान खान-झीनत अमान, व्हिव रिचर्डस-नीना गुप्ता, मोहसीन खान-रिना रॉय, अंजू महेंद्रू-गॅरी सोबर्स ही नावं प्रेमी युगुल म्हणून जितकी गाजली तितकंच त्यांच्यामधलं नातं विस्मृतीतही गेलं.

काळाच्या साऱ्या कसोट्यांवर तावून सुलाखून अमरप्रेम म्हणून गाजलं आणि यशस्वीही ठरलं ते टायगर पतौडी आणि शर्मिला टागोर यांच्यामधलं नातं.

भविष्यात विराट आणि अनुष्काची पावलं ही पतौडी आणि शर्मिला टागोर यांच्या नांदा सौख्यभरे मार्गानं जावीत, याच त्यांना त्यांच्या चाहत्यांकडून शुभेच्छा.