Rajesh Khanna Slapped Sanjeev Kumar:  हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिले सुपरस्टार असलेले दिवंगत अभिनेते राजेश खन्ना (Rajesh Khanna) यांना खूप स्टारडम लाभले. राजेश खन्ना यांनी काम केलेले चित्रपट आजही पाहिले जातात. 
वर्ष 1969 ते 1974 या काळात  राजेश खन्ना हे केवळ हिंदी चित्रपटसृष्टीचेच नव्हे तर संपूर्ण भारतीय चित्रपटसृष्टीचे सुपरस्टार होते. पण 1970 च्या दशकाच्या मध्यात एंग्री यंग मॅन अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची एन्ट्री झाली आणि राजेश खन्ना यांच्या स्टारडमला धक्के बसू लागले. 


मात्र, राजेश खन्ना यांची लोकप्रियता इतकी वाढली होती की आजही त्यांच्या आयुष्याशी आणि करिअरशी संबंधित अनेक किस्से शेअर केले जातात. अशाच एका घटनेचा उल्लेख केला जातो.राजेश खन्ना यांचे सहकलाकार संजीव कुमारसोबत भांडण झाले होते. राजेश खन्ना यांनी तर संजीव कुमार (Sanjeev Kumar) यांच्या कानशिलात लगावली होती. या दोघांमध्ये नेमकं घडलं काय?


या अभिनेत्रीमुळे झाला दोन्ही कलाकारांमध्ये गैरसमज


राजेश खन्ना आणि त्यांची एक्स गर्लफ्रेंड अंजू महेंद्रू यांच्यातील गैरसमजामुळे अभिनेत्याने संजीव कुमारवर हात उचलला होता. राजेश आणि अंजू 1966 ते 1972 पर्यंत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होते. पण अंजूने राजेश खन्ना यांचा लग्नाचा प्रस्ताव वारंवार नाकारल्याने हे नाते तुटले. राजेश आणि अंजू यांनी वेगळ्या वाटा निवडल्या. या काळात संजीव कुमार आणि अंजू महेंद्रू यांच्यात चांगली मैत्री झाली. पण, त्यामुळे त्यांच्या दोघांमध्ये अफेअर सुरू असल्याच्या चर्चांना उधाण आले.  या अफवांमुळे अंजू महेंद्रू यांना त्रास सहन करावा लागला. 


संजीव कुमार आणि अंजू यांच्या अफेअरच्या अफवा 


अंजू यांनी फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत हा संपूर्ण प्रकार सांगितला होता. त्यांनी सांगितले की, राजेश खन्नासोबतचे नाते तुटल्यानंतर कोणीतरी संजीवसोबत तिच्या अफेअरची अफवा पसरवली होती. हे ऐकून राजेशच्या तळपायाची आग मस्तकात गेली. अंजू यांनी पुढे सांगितले की,'मला हरीबद्दल (संजीव कुमार) कधीच आकर्षण वाटले नाही. माझ्यासाठी तो माझ्या आईचा भाऊ होता. एका अभिनेत्रीने माझे हरीसोबत अफेअर असल्याच्या वावड्या उठवल्या होत्या. राजेशला ही आमचं नातं तुटल्यानंतर आम्ही रिलेशनशिपमध्ये होतो, असे वाटत होते. अखेर आम्ही दोघांनी वाटा वेगळ्या केल्याच्या बराच काळानंतर आपला गैरसमज झाला होता, याची जाणीव राजेश खन्नाला झाली होती असे अंजू यांनी सांगितले. 


राजेश खन्ना यांनी संजीव कुमार यांना कानशिलात लगावली...


अंजू यांनी पुढे म्हटले की, जेव्हा हरी आणि राजेश यांनी एकत्रितपणे एका चित्रपटात काम केले. त्यावेळी एका सीनमध्ये राजेशला हरीच्या कानशिलात लावायची होती.  त्या सीनमध्ये राजेशने खरंच जोरदार कानशिलात लगावली. राजेश खन्ना आणि संजीव कुमार या दोघांमध्ये कधीच पटले नाही, असेही अंजू यांनी सांगितले. 


अंजू महेंद्रू आणि राजेश  खन्ना यांच्यात 1988 नंतर पुन्हा संवाद सुरू झाला होता. त्यानंतर या दोघांमधील मैत्रीचे नाते हे राजेश खन्ना यांच्या निधनापर्यंत कायम होते.