मुंबई : वय हा आपल्यासाठी फक्त आकडा आहे, बॉक्स ऑफिसच्या आकड्यांपेक्षा प्रेक्षकांच्या प्रेमाची किंमत मोठी असते, असं म्हणत अभिनेता आणि मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानने जन्मदिनी चाहत्यांशी संवाद साधला.


मुंबईत जन्मदिनाच्या निमित्ताने आमीरने पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. यामध्ये त्याने अनेक प्रश्नांची दिलखुलास उत्तरं दिली. आमीरने आज वयाच्या 53 व्या वर्षात पदार्पण केलं आहे.

राजकारणात जाण्याची बिलकुल इच्छा नाही, सध्या जिथे आहे, तिथे राहून समाजासाठी काही तरी करण्याचा प्रयत्न राहील, असंही आमीर म्हणाला.

'सत्यमेव जयते'चं नवीन सीझन सुरु होणार नसल्याचंही आमीरने स्पष्ट केलं. सध्या पाणी फाऊंडेशनचं काम सुरु आहे. त्यामुळे पाणी फाऊंडेशनलाच सध्या वेळ दिला जाईल, असं आमीरने सांगितलं.

दरम्यान आमीरने त्याच्या आगामी सिनेमाचीही यानिमित्ताने माहिती दिली. 'ठग्स ऑफ हिंदोस्ता' या सिनेमाची शूटिंग जून महिन्यात सुरु होणार असल्याची माहिती आमीरने दिली.

आमीर आणि शाहरुख एकत्र दिसणार असल्याची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु आहे. मात्र यावरही आमीरने स्पष्टीकरण दिलं. शाहरुख आणि आपण चांगले मित्र आहोत. त्याने पार्टीसाठी दोन वेळा घरी बोलावलं होतं. सोबत काम करण्याबाबत काहीही विचार नाही, असं आमीरने सांगितलं.

यावेळचा जन्मदिनही नेहमीप्रमाणे कुटुंबासोबत साजरा करणार असल्याचं आमीरने सांगितलं. मात्र यावेळी परिवार वाढला असून फोगट कुटुंबातील सदस्यांचाही समावेश झाला आहे, असं आमीर म्हणाला.