मुंबई : नेहमीच विविध कारणांनी वादाच्या भोवऱ्यात अडकणारी अभिनेत्री Kangana Ranaut कंगना राणौत सध्या पुन्हा एकदा सोशल मीडियावर तिच्या एका पोस्टमुळं सर्वांचं लक्ष वेधून जात आहे. यावेळी बी- टाऊनची ही क्वीन काहीशी भावूक असल्याचं पाहायला मिळालं. कारणंही तसंच होतं. आजोबांच्या निधनामुळं कंगनाच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.


सोमवारी सकाळच्या सुमारास हिमाचल प्रदेशातील मनाली येथे असणाऱ्या कुटुंबाच्या मूळ घरी तिच्या आजोबांचं निधन झालं. ट्विटरच्या माध्यमातून कंगनानं याबाबतची माहिती दिली. आपले आजोबा ब्रह्म चंद राणौत यांचं निधन झाल्याचं सांगत तिनं या ट्विटमध्ये सोबत त्यांचा एक फोटोही जोडला. शिवाय एका संदेशाद्वारे भावनांना वाट मोकळी करुन दिली.


आजोबांचा एक जुना फोटो शेअर करत आपण आजोबांना प्रेमानं ‘डॅडी’ म्हणूनही हाक मारायचो, अशी एक आठवण जागवली. आजोबांच्या विनोदबुद्धीचा उल्लेख करत तिनं या ट्विटमध्ये लिहिलं, ‘आज संध्याकाळी मी आईवडिलांच्या घरी गेले. मागील दोन महिन्यांपासून माझ्या आजोबांची प्रकृती ठीक नव्हती. मी घरी पोहोचले, पण त्यापूर्वीच त्यांनी जगाचा निरोप घेतलेला होता.’


आजोबांच्या आठवणी जागवत कंगनानं ही पोस्ट शेअर केल्यानंतर फॉलोअर्सनी तिच्या कुटुंबाला आधार देत आजोबांना श्रद्धांजली वाहिली.





दरम्यान, कंगनाचं नाव सध्या अभिनेता हृतिक रोशन याच्याशी असणाऱ्या वादामुळंही अनेकांच्या भुवया उंचावत आहे. तर, दुसरीकडे ती सध्या करिअरमधील महत्त्वाकांक्षी चित्रपटाच्या तयारीत व्यग्र आहे. ‘थलैवी’ Thalaivi असं तिच्या आगामी चित्रपटाचं नाव आहे. ज्यामध्ये ती जयललिता यांच्या व्यक्तिरेखेत झळकणार आहे. मागील काही दिवसांपासून तिच्या या आगामी चित्रपटातील अनेक लूक प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. या चित्रपटाव्यतिरितक्त कंगना ‘तेजस’ या चित्रपटातूनही झळकणार आहे. ज्यामध्ये ती एका वायुदल वैमानिकाच्या भूमिकेत दिसेल. या चित्रपटाच्या निमित्तानं कंगनानं नुकतीच देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली होती. यावेळी तिनं सिंह यांना चित्रपटाची स्क्रीप्ट देत काही बाबतीतील परवानगीही मिळवल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळं तिच्या या आगामी चित्रपटांबाबतही चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे.