मुंबई : आज बिग बी अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस. आज पैसा, प्रसिद्धी सर्व गोष्टींनी बिग बी यशाच्या शिखरावर आहेत. मात्र त्यांच्या जीवनात अनेक चढउतार आले. एक वेळ अशी आली होती जेव्हा अमिताभ बच्चन 'मला काम देता का?' असं विचारायला पायी चालत यश चोप्रांकडे गेले होते.  जिथं निवृत्ती घ्यायला हवी तिथं बच्चन साहेबांनी भरारी घेतली. एबीसीएल ही थाटलेली कंपनी जेव्हा गाळात गेली.. जेव्हा डोक्यावर कर्ज झालं तेव्हा त्यांचं वय किती होतं? 59-60. लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेला हा महानायक लोकांचं अमाप प्रेम, प्रसिद्धी, पैसा, मान-मरातब मिळवून कंगाल झाला होता. तेव्हा बिग बीच्या वयाची साठी आली होती.


तर हा काळ होता त्यांच्या साठीचा. म्हणजे 20 वर्षापूर्वीचा. म्हणजे आसपास 2000 साल. एबीसीएल पुरती दिवाळखोरीत निघाली होती. सगळे पैसे कर्जा भागवण्यात संपले होते. एव्हाना अमिताभ बच्चन यांनी सिनेसृष्टीतून काढता पाय घेतला होता. कारण, त्यांचे लाल बादशाह, छोटे मियां बडे मियां आदी सिनेमात काम सुरू केलं होतं..पण सिनेमे पडले होते. बच्चन यांचं मार्केट गेलं होतं. आर्थिक फटका तर बसला होताच. पण सार्वजनिक जीवनात जी व्हॅल्यू अमिताभ बच्चन या नावाला होती तीही पुरती पडली होती. अभिषेकही त्यावेळी नट म्हणून आला नव्हता.


हा काळ असा आहे, जेव्हा गेल्या अनेक वर्षांपासून अमिताभ बच्चन यांच्याकडे काम मागायची वेळ आली नव्हती. मोठेमोठे निर्माते त्यांच्याकडे रांगा लावत होते. त्यांच्यासाठी सिनेमे लिहित होते. सिनेमासाठी थांबत होते. पण आता परिस्थिती बदलली होती. 1998 पासून परिस्थिती आणखी गंभीर होत गेली. हातातलं काम गेलं.आणि मग बच्चन साहेबांनी निर्णय घेतला.. काम मागण्याचा.



सर्वसाधारणपणे जे निवृत्तीचं वय मानलं जांत त्या वयात बच्चन साहेब काम मागायला बाहेर पडले. त्याचाही एक किस्सा आहे. बच्चन यांच्या जुहूच्या बंगल्यापासून थाेड्या अंतरावर यश चोप्रा यांचा बंगला आहे. बच्चन यांनी यश चोप्रा यांच्याकडे जायचं ठरवलं.


हे ही वाचा- BLOG | म्हणून बच्चन.. 'बच्चन' असतो!


दिवस ठरला. सकाळी घरातून अमिताभ बाहेर पडू लागले. अभिषेकच्या लक्षात आलं की अमिताभ गाडी घेत नाहीयेत, ते चालत जायतायत. अभिषेकने तडक बाबांना गाडी घेऊन जाण्याबद्दल सांगितलं. तर बच्चन म्हणाले, मी काम मागायला जातोय. काम मागायला जाताना गाडी घेऊन जाणं हे मला योग्य वाटत नाही. क्षणाचीही वाट न बघता अमिताभ बच्चन घरासमोरच्या फुटपाथवरून चालू लागले. यश चोप्रा यांच्या सुरक्षा रक्षकांना बच्चन चालत येत असल्याचं कळल्यावर तिथे एकच तारांबळ उडाली.



तारांबळ.. उडणारच. या शतकातला हिंदीतला नायक चालत येत होता. ज्याने अनेक मानमरातब मिळवले.. ज्याच्या सिनेमाने अनेकांची पोटं भरली.. अनेकांची मनं मोकळी केली तो महानायक अमिताभ बच्चन चालत येत होता. ही गोष्ट यश चोप्रा यांना कळली. चोप्रा पळत आपल्या वरच्या मजल्यावरून खाली धावत आले. त्यांनी बच्चन साहेबांना आत घेतलं. वर घरी नेलं.



बच्चन अत्यंत शांत होते. यश चोप्रा यांनी असं अचानक येण्याचं कारण विचारल. तेव्हा बिग बी उद्गारला.. चोप्रा साब.. मला काम हवंय. चोप्रा म्हणाले, तू आत्ता असा का आलायस.. तुझे किती पैसे देणं आहे.. त्यावर अमिताभ म्हणाले, पैसे मागून द्यायचे तर माझ्याकडेही काही लोक आहेत चोप्रासाब. मला काम हवंय. यापूर्वी मी केलेली कामं तुम्हाला माहीत आहेतच. माझ्या योग्य काही काम असेल तर...



चोप्रा यांनी तातडीने आपल्या माहितीतल्या लोकांना तिथूनच फोनाफोनी सुरू केली. देशाच्या महानायकाला काम हवं होतं.दोन तीन फोन केल्यावर लक्षात आलं.. काही ठिकाणचं चित्रिकरणं सुरू झालं होतं.. काही ठिकाणी बच्चन यांना साजेसा रोल नव्हता. चोप्रा यांचा असाच एक फोन गेला, विधूविनोद चोप्रा यांना. विधूजी त्यावेळी एका सिनेमाची जुळवाजुळव करत होते. त्या सिनेमात एक भूमिका होती. ती विधू यांनी बच्चन यांना द्यायची ठरवलीही. पण सिनेमाचं चित्रिकरण सुरु व्हायला वेळ होता. पण बच्चन यांना तातडीने काम हवं होतं.



यश चोप्रा यांनी आदित्यला बोलावलं. आदित्यने तातडीने हालचाल करून बच्चन यांना समोर ठेवून एक सिनेमा लिहायला घेतला. चोप्रा गटातल्या सगळ्या मोठ्या कलाकारांपैकी कोण यात येतील याची काळजी घेतली गेली आणि मग एक सिनेमा तयार झाला.. मोहोब्बते. शाहरुख खान, ऐश्वर्या राय, अमिताभ बच्चन, जिमी शेरगील आदी लोकांना घेऊन सिनेमा तयार झाला आणि मोहोब्बतेनं नवा इतिहास घडवला. एका महानायकाला संजीवनी मिळाली.

हे सगळं होत असतानाच, विधू विनोद चोप्रा यांच्या सिनेमाची जुळवाजुळवही झाली होती. ठरल्याप्रमाणे त्यांनीही अमिताभ बच्चन यांना सिनेमात एक भूमिका देऊ केली. जी बच्चन यांनी नेहमीप्रमाणे डंके के चोट पर साकारली. त्या सिनेमाचं नाव होतं एकलव्य. सिनेमा हिट झाला. सिनेमाने नफा कमावल्यावर विधूविनोद चोप्राने अत्यंत प्रेमाने आणि आदराने बच्चन यांच्या वकुबाला साजेशी गाडी त्यांना भेट म्हणून दिली.. ती गाडी होती रोल्स रॉईस. त्याच्या बातम्याही आल्या होत्या पेपरात. मग कौन बनेगा करोडपती हा शो आला.. त्यानंतर जे झालं ते भारतीय मनोरंजनसृष्टीत ऐतिहासिकच होतं.

कोणताही महानायक केवळ प्रसिद्धीनं घडत नाही. ती प्रसिद्धी जशी मिरवावी लागते तशी ती पचवावीही लागते. अमिताभ बच्चन यांना त्या वाईट काळामध्ये बसलेले धक्के कमालीचे खंतावणारे होते.  म्हणून त्यानंतर बच्चन यांनी आपल्या कामातून पैसे कमावण्याचं ठरवलं. आपण दिवाळखोर होण्याचा धक्का त्यांच्या इतका जिव्हारी लागला की त्यांनी मिळतील त्यातून पैसे उभे करायला सुरूवात केली. मिळेल ते काम करायला घेतलं. त्यानंतर जे घडलं तो इतिहास आहे.