Bharti Achrekar on fathers parenting: हिंदीसह मराठी सिनेसृष्टीतून ज्येष्ठ अभिनेत्री भारती आचरेकर यांनी प्रेक्षकांचं कायम मनोरंजन केलं. हिंदी चित्रपट असो किंवा मराठी नाटक, त्यांच्या भूमिकेचं कायम प्रेक्षकांकडून कौतुक करण्यात आले आहे. आपल्या सहजसुंदर अभिनयातून त्यांनी असंख्य प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. सध्या अभिनेत्री भारती 'तिघी' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. 'तिघी' या चित्रपटातून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाले आहेत. तिघी या चित्रपटात भारती आचरेकर, सोनाली कुलकर्णी आणि नेहा पेंडसे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 6 मार्च रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातून तिन्ही अभिनेत्रींनी पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन शेअर केली आहे.
या चित्रपटाच्या निमित्ताने भारती आचरेकर आणि सोनाली कुलकर्णी या दोघींनी एकत्र राजश्री मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीत भारती आचरेकर यांनी काही वैयक्तिक गोष्टी शेअर केल्या आहेत. तसेच वडिलांसोबतची बॉण्डिंग शेअर केली आहे. सध्या त्यांनी दिलेली मुलाखत सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
आईबाबत भारती आचरेकर म्हणाले, 'माझी आई जास्त बोलायची नाही. पण तिनं व्यक्त होण्यासाठी मोकळीक दिली. आमच्या घरातील वातावरण मोकळं होतं. आमच्या आयुष्यात नेमकं काय घडतंय हे आम्ही सांगत होतो. आम्ही काहीही लपवत नव्हतो. अगदी एखाद्या मुलाशी लफडं करुन आलो तरी सांगत होतो. यानंतर रडायचं असेल तरी आमचा खांदा आहे, ते लपवू नका असं सांगण्यात आलं होतं. हा मोकळेपणा आम्हाला घरातून दिल्यामुळे आम्ही देखील मोकळेपणाने वागत होतो, वावरत होतो', असं भारती यांनी सांगितलं.
'आम्हाला आमच्या आयुष्यात कधीही कोणतीही गोष्ट लपवावी असं वाटलं नाही. माझ्या आईला मैत्रीण म्हणता येणार नाही, कारण ती त्या पिढीतील नव्हती. पण माझे वडील खुप मोकळे मनाचे होते. माझे वडील उत्तर प्रदेशातील रहिवासी आहेत. तर माझी आई पुण्याची होती. वडील खूप मोकळे मनाचे होते', असं अभिनेत्री भारती यांनी सांगितलं.
वडिलांसोबतचा एक किस्सा यावेळी भारती यांनी मुलाखतीत शेअर केला. 'जेव्हा मी पहिलं नाटक केलं, तेव्हा मी साधारण 17 वर्षांची असेल. तेव्हा दौरे करुन माझी तब्येत बिघडत चालली होती. जागरण, उशीरा जेवण यामुळे प्रचंड त्रास झाला होता. पहिली बिअर माझ्या वडिलांनी पाजली. आम्हाला घरात मोकळीक दिली, कारण त्यांना ठाऊक होतं की आम्ही त्याचा गैरफायदा कधीही घेणार नाही. बऱ्याचदा अशी मोकळीक दिली की, मुलं बिघडतात. पण मी कधीही त्याचा गैरफायदा घेतला नाही', असं भारती आचरेकर यांनी स्पष्ट केलं.
