किंग खानच्या लेकाच्या शिरपेचात मानाचा तुरा, मुख्यमंत्र्यांनीही थोपटली आर्यन खानची पाठ; म्हणाले...
दिग्दर्शनाच्या पहिल्याच पदार्पणात त्याने आपला खास ठसा उमटवला. भारतीय मनोरंजनविश्वातील घडामोडींवर उपरोधिक भाष्य करणारी ही वेबसिरिज ग्लोबल टॉप 10 मध्येही गेली.

Aaryan Khan: बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सध्या चर्चेत आहे.गेल्या वर्षी त्यानं अभिनयाऐवजी दिग्दर्शनात पहिलं पाऊल टाकत इंडस्ट्रीत एन्ट्री घेतली. त्याच्या द बॅड्स ऑफ बॉलिवूड या वेबसिरिजची सगळीकडे एकच चर्चा झाली. मनोरंजनक्षेत्रातील अनेक कलाकारांसह राजकीय वर्तुळातील अनेकांनी आर्यन खानच्या या सिरिजचे कौतूक केलेलं. आता याच सिरिजमुळे किंग खानचा लेक पुन्हा चर्चेत आलाय. नुकत्याच पार पडलेल्या एका पुरस्कारसोहळ्यात आर्यन खानच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेलाय. त्याला बेस्ट डेब्यू डायरेक्टर ऑफ द इयर म्हणजेच सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक या पुरस्कारानं गौरवण्यात आलं. या सोहळ्याला अनेक दिग्गज कलाकार उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील आर्यन खानच्या कामाचं कौतूक केलं. यानंतर आर्यनला अनेकजण शुभेच्छा देत आहेत, त्याचे कौतूक करत आहेत. (The bads of Bollywood)
द बॅड्स ऑफ बॉलिवूडमधून इंडस्ट्रीत पदार्पण
अलिकडेच नवभारत टाइम्सच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत एनबीटी उत्सव 2026 या विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्याला अनेक दिग्गज, दर्जेदार कलाकारांची उपस्थिती होती. आर्यन खानने दिग्दर्शित केलेल्या द बॅड्स ऑफ बॉलिवूड या वेबसिरिजसाठी त्याला सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या या वेबसिरिजला प्रेक्षकांसह समीक्षकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळाला होता. अनेकांनी आर्यन खानच्या दिग्दर्शनाचे, त्याच्या टॅलेंटचे कौतूक केले. दिग्दर्शनाच्या पहिल्याच पदार्पणात त्याने आपला खास ठसा उमटवला. भारतीय मनोरंजनविश्वातील घडामोडींवर उपरोधिक भाष्य करणारी ही वेबसिरिज ग्लोबल टॉप 10 मध्येही गेली.
मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं आर्यनचं कौतूक
आर्यन खानला सर्वाेत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक पुरस्कार प्रदान केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आर्यनच्या कामाचे, त्याच्या यशाचे कौतूक केले. ते म्हणाले, एका प्रतिष्ठित घराण्याचा वारसा असूनही आर्यनने स्वत:चा वेगळा मार्ग निवडला आणि त्यात यश मिळवलं. ही अभिमानास्पद गोष्ट आहे.असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यांनी ट्वीट करतही या कार्यक्रमाविषयी माहिती दिली. या पुरस्कार सोहळ्याला चित्रगंदा सिंह, मृणाल ठाकूर, सिद्धांत चतुर्वेदी, पंकज त्रिपाठी यांच्यासह अनेक सिनेविश्वातील कलाकारांनी हजेरी लावली होती.या पुरस्कारामुळे आर्यन खान सध्या आनंदी असून किंग खाननेही आपल्या लेकाच्या यशाबद्दल समाधान व्यक्त केले आहे. आर्यन सध्या त्याच्या आगामी प्रोजेक्समध्ये व्यस्त असून तो लवकरच मोठ्या पडद्यावर दिग्दर्शक म्हणून उतरणार आहे.
























