Adhokshaj Karhade : अभिनेता, कवी संकर्षण कऱ्हाडेचा भाऊ आणि अभिनेता अधोक्षज कऱ्हाडे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होता तो त्याच्या बाळाच्या नावामुळे. काही महिन्यांपूर्वीच तो बाबा झाला. अलीकडेच त्याने त्याच्या बाळाचं बारसं केलं. 'अक्षोभ्य अधोक्षज कऱ्हाडे' असं नाव त्याने ठेवलंय. हे नाव उच्चारताना अनेकांची बोबडी वळल्याचं सांगत काहींनी त्याला ट्रोल केलं.  बाळाचे  एवढे अवघड नाव का ठेवलं असं सवाल त्याला सगळेजण विचारत आहेत. काहींना हे नाव खूप आवडलंय.  अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत त्याने त्यांच्या घरातील सगळ्यांचीच नावे एवढी अवघड का आहेत? याचं कारण उलगडून सांगितलं.  

Continues below advertisement

संकर्षण कऱ्हाडेच्या घरातील सगळ्यांचीच नाव खरंतर अवघड आहेत.  संकर्षण हे नावही हटके आहे. त्याच्या भावाचं नाव अधोक्षज आहे. तर संकर्षणच्या दोन्ही जुळ्या मुलींची नावे सर्वज्ञ आणि स्राग्वी आहेत. आता अधोक्षजने त्याच्या मुलाचं नाव अक्षोभ्य ठेवलंय. सोशल मीडियावर याची चर्चा रंगली आहे. दरम्यान अधोक्षजने या नावांमागचं कारण सांगितलंय.

काय म्हणाला अधोक्षज कऱ्हाडे ?

पुढारीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना अधोक्षजने सांगितलं ' मी ट्रेंड म्हणून माझ्या मुलाचं नाव अक्षोभ्य ठेवलं नाही. हे नाव आजकालच्या ट्रेंडिंग नावांमधील नाही तर आजकालच्या ट्रेंडमध्ये हरवलेल्या, आपल्या भारतीय आणि हिंदू संस्कृतीतील पौराणिक नाव आहे. ही नावं  आज-काल कोणालाही माहित नाहीत. आमचं कुलदैवत तिरुपती बालाजी आहे. बालाजीचं प्रमुख स्तोत्र म्हणजे विष्णुसहस्त्रनाम. आमच्या घराण्यातील जी नाव आहेत, म्हणजे वडिलांचे नाव गोविंद, आजोबांचं अनंत, भाऊ संकर्षण, माझं नाव अधोक्षज, संकर्षणच्या मुलांची नाव सर्वज्ञ, स्राग्वी आणि माझ्या मुलाचं नाव अक्षोभ्य  ही सगळी विष्णुसहस्त्रनामातील प्रामुख्याने विष्णूची नावं आहे. " असं त्याने सांगितलं.

Continues below advertisement

तो पुढे म्हणाला " जगाला शांतीचे प्रतीक देणारे जे पाच प्रमुख बुद्ध भगवान आहेत, त्यांच्यापैकी एकाच नाव अक्षोभ्य आहे . माझी आई नेहमी म्हणते की आपल्या मुलाचं नाव घेताना धकाधकीच्या जीवनात नामस्मरण कमी पडतं. त्यामुळे आपल्या मुलांची नावं देवाच्या नावावरून ठेवली. जेणेकरून त्यांची नाव घेताना आपल्या मुखातून नामस्मरण होईल. भगवंताचं नाव आपल्या तोंडात येईल. असं अधोक्षजने सांगितलं.

'कुठलंही नाव अवघड नसतं.आपल्याला ते नाव नीट उच्चारण्याची सवय नसते. आपल्याला स्तोत्र म्हणण्याची सवय नसते. स्तोत्र रोज म्हटलं तरी आपले उच्चार सोपे होतात. ही स्तोत्र रोज म्हंटली तर आपल्याला कोणतच नाव घेणं अवघड वाटणार नाही. ' असं अधोक्षजने सांगितलं.