मुंबई : काही कलाकार हे त्यांनी साकारलेल्या भूमिकांमुळं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत असतात. मालिका विश्वात अशी अनेक उदाहरणं पाहायला मिळतात. कैक वर्षे जुन्हा मालिकांतील कलाकार हे त्यांनी साकारलेल्या भूमिकांमुळेच प्रेक्षकांच्या आजही स्मरणात आहेत. अगदी आताआताचं उदाहरण घ्यावं तर, ते म्हणजे 'तुझ्यात जीव रंगला' ही मालिका आणि त्यातील प्रत्येक पात्र. 


'राणा दा', 'अंजली', 'गोदाक्का'पासून अगदी 'बरकत'पर्यंत सर्वच पात्रांनी आणि ती साकारणाऱ्या कलाकारांनी प्रेक्षकांच्य मनाचा ठाव घेतला होता. या मालिकेनं काही महिन्यांपूर्वी प्रेक्षांचा निरोप घेतला. असं असलं तरीही प्रेक्षकांच्या मनावर असणारी भुरळ काही कमी झालेली नाही. फक्त प्रेक्षकच नव्हे, तर मालिकेतील कलाकारांची त्यांनी साकारलेल्या पात्रांनी एक वेगळंच नातं जोडलं गेलं आहे, याचा प्रत्यय येत आहे अभिनेत्री अक्षया देवधर हिनं केलेल्या एका सोशल मीडिया पोस्टमुळं. 


'असा बेभान हा वारा...', या गाण्यावरील एक व्हिडीओ तिनं पोस्ट केला आहे. यामध्ये अक्षयाच्या चेहऱ्यावरील भाव नकळतच सर्वांच्या काळजाचा ठाव घेत आहेत. अंजलीची आपल्याला फार आठवण येत असल्याच्या आशयाचं कॅप्शन तिनं या व्हिडीओला जोडलं. 


तिनं हा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर लगेचच चाहत्यांनीही कमेंट करत या व्यक्तीरेखेवर प्रेमाचा वर्षाव केला. शिवाय आपल्यालाही अंजलीबाई, राणा दा आणि मालिकेची फार आठवण येत असल्याच्या प्रतिक्रिया अनेक फॉलोअर्सनी केल्या. 






एखादी कलाकृती साकारत असताना कलाकार मंडळी त्याकडे कामाच्याही पलीकडल्या नजरेतून पाहतात. एक आपलेपणाचं नातं ते या पात्राशी जोडू पाहतात. नकळतच मालिका किंवा एखाद्या कलाकृतीच्या निमित्तानं भूमिका साकारत असताना या भूमिकेतूनही ते खूप काही शिकतात. अक्षयाही या भूमिकेकडून खूप काही शिकली, तर अंजली बाई या पात्रानं तिलाही खूप काही दिलं. त्यामुळं अक्षया आणि अंजली या दोघींचंही एक वेगळं नातं या पोस्टच्या निमित्तानं सर्वांसमोर आलं आहे.