Abhishek Bachchan on Raja Shivaji VFX: रितेश देशमुख दिग्दर्शित 'राजा शिवाजी' (Raja Shivaji) चित्रपटाची सध्या एकच चर्चा आहे. 100 कोटी रुपयांचा सर्वात मोठा मराठी चित्रपट, बॉलीवूड आणि मराठी मनोरंजन सृष्टीतील कलाकारांची तगडी फौज, संगीत, व्हीएफएक्स अशा अनेक कारणांनी या चित्रपटाविषयी बोललं जातंय. बॉक्स ऑफिस वरही हा चित्रपट दमदार कमाई करताना दिसतोय. बॉलीवूडच्या दिग्गज कलाकारांना घेऊन केलेले आहे या चित्रपटाच्या VFX वरून सध्या सोशल मीडियावर वाद सुरूय. अनेक जण या चित्रपटाच्या व्हीएफएक्सची तुलना हॉलिवूडची करत आहेत. अनेकांनी चित्रपटावर ट्रॉलिंग सुरू केल्यानंतर या सगळ्या प्रकारावर अभिनेता अभिषेक बच्चनने प्रतिक्रिया देत भारतीय सिनेमांची तुलना हॉलीवुड सिनेमांशी करणे योग्य नसल्याचे म्हटले. 'राजा शिवाजी ' चित्रपटात संभाजी शहाजी भोसले यांची भूमिका साकारणाऱ्या अभिषेकने या ट्रोलिंगला फटकारत दिदर्शक रितेश देशमुखची बाजू घेतलीय. त्याची ही प्रतिक्रिया सध्या चर्चेत आहे.
राजा शिवाजी VFX वरून ट्रोल
राजा शिवाजी हा बहुचर्चित ऐतिहासिक चित्रपट सध्या सोशल मीडियावर जोरदार ट्रोलिंगचा सामना करत आहे. विशेषतः चित्रपटातील व्हीएफएक्स, कलर ग्रेडिंग आणि काही कलाकारांच्या कास्टिंगवरून नेटकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ट्रेलर आणि काही दृश्ये पाहिल्यानंतर अनेकांनी एक्स आणि इन्स्टाग्रामवर प्रतिक्रिया देत चित्रपटावर टीका केली.
एका युजरने पोस्ट करत लिहिले, “मराठी चित्रपटांना बजेटची समस्या असते हे माहिती आहे, पण ‘राजा शिवाजी’मधील व्हीएफएक्स अक्षरशः बनावट वाटतात. काही दृश्ये चांगली आहेत, पण खूपच कमी. फक्त अजय-अतुल यांचं संगीतच चित्रपटाला उभं करतं.” दुसऱ्या एका नेटकऱ्याने, “ट्रेलरमध्ये भव्यतेची कमतरता जाणवते. कमजोर व्हीएफएक्समुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा तो प्रभाव जाणवत नाही,” अशी प्रतिक्रिया दिली.
काय म्हणाला अभिषेक बच्चन ?
अलीकडेच न्यूज 18 ला दिलेल्या मुलाखतीत अभिषेक म्हणाला ' सामान्य प्रेक्षकांना कदाचित माहीत नसेल, पण व्हीएस एक्स ही अतिशय बारकाईने केलेली कला आहे. तुम्ही जितका अधिक वेळ द्याल तितकं काम उत्तम होतं. त्यात जितका पैसा गुंतवाल तितकी गुणवत्ता वाढते. पण लोकांनी हे समजून घेतलं पाहिजे की रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांनी हा मराठी चित्रपट अत्यंत मर्यादित बजेटमध्ये तयार केलाय. ' त्याने पुढे सांगितलं ' हॉलीवुड स्टुडिओ केवळ व्हीएफएक्ससाठीच हजारो कोटी रुपये खर्च करतात. भारतीय सिनेसृष्टी तेवढी मोठी नाही. त्यामुळे अशा पातळीवर स्पर्धा करणे शक्य नाही ' असं तो म्हणाला.
'एका टप्प्यानंतर तुम्हाला निर्णय घ्यावाच लागतो ... '
अभिषेकने भारतीय आणि हॉलीवुड चित्रपटांच्या बजेट मधला मोठा फरक अधोरेखित करत सांगितलं ' भारतीय चित्रपट हे हॉलिवूडच्या व्हीएफएक्स बजेटच्या कदाचित एक टक्क्यांएवढ्या बजेटमध्ये काम करतात. गुणवत्ता ही वेळ आणि पैशांशी जोडलेली असते. ' रितेश देशमुखच्या निर्माता आणि दिग्दर्शक या दुहेरी जबाबदारीचाही त्याने उल्लेख केला . तो म्हणाला ' एका टप्प्यानंतर तुम्हाला निर्णय घ्यावाच लागतो की अजून किती वेळ काम सुरू ठेवायचं. जर दहा वर्षांचा वेळ द्यायचा ठरवला तर परिणामही तेवढाच अप्रतिम येईल. पण भारतात इतका वेळ आणि पैसा खर्च करणे शक्य नसतं '
राजा शिवाजी चित्रपटाच्या VFX वर सोशल मीडियावर टीका होत असतानाही या चित्रपटाच्या कथानकावर पूर्णपणे विश्वास असल्याचे अभिषेकने सांगितलं. तो म्हणाला ' हा चित्रपट मुळात भावनांचा प्रवास आहे आणि त्यात तो यशस्वी ठरतो. VFXवरील टीका काळानुसार विसरली जाईल. पण या चित्रपटाने त्याचा उद्देश पूर्ण केला का ?कथा प्रभावीपणे मांडली का ? याचे उत्तर नक्कीच हो असं आहे. ' असं अभिषेक बच्चन म्हणाला.
'राजा शिवाजी'मध्ये बॉलीवूडकरांची तगडी फौज
राजा शिवाजी हा चित्रपट जिओ स्टुडिओ आणि मुंबई फिल्म कंपनी यांच्या निर्मितीतून तयार झाला आहे. चित्रपटात रितेश देशमुख, संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, भाग्यश्री पटवर्धन, फरदीन खान, जितेंद्र जोशी, बोमन इराणी, अमोल गुप्ते, जेनेलिया देशमुख यांसारख्या दिग्दज कलाकारांची तगडी फौज आहे. विशेष म्हणजे सलमान खानही या चित्रपटात खास भूमिकेत दिसलाय.
