3 idiots Re-release: जंतर-मंतरवर उपोषणाला बसलेले सोनम वांगचूक (Sonam Wangchuk) यांच्या उपोषणावरून '3 इडियट्स' फेम अभिनेता ओमी वैद्यचा (चतूर) व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर चर्चा रंगली. काही दिवसांनी आमिर खानने थ्री इडियट्स या सिनेमातील रँचोची भूमिका सोनम वांगचुक यांच्याशी संबंधित नसल्याचं म्हटल्यानंतर सोशल मीडियावर अमीर खानच्या वक्तव्यावरून ट्रोलिंगही झालं. दरम्यान जंतर-मंतरवरील सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला आणि कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. हे सगळं सुरू असताना आमिर खानची '3 इडियट्स' फिल्म आता पुन्हा एकदा चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. जंतर-मंतरचा आंदोलन आणि सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या चित्रपटाचे री-रिलीज चर्चेत आहे. 17 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला हा चित्रपट पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर कधी प्रदर्शित होणार? जाणून घेऊया..
कधी री-रिलीज होणार 3 इडियट्स?
बॉलीवूड हंगामाच्या वृत्तानुसार निर्माते 17 वर्षांनंतर '3 इडियट्स' चित्रपटगृहांमध्ये पुन्हा आणण्याच्या तयारीत आहेत. NH स्टुडिओजने आपल्या कॅटलॉगचा भाग म्हणून या चित्रपटाचे हक्क मिळवले आहेत. हा चित्रपट 4 सप्टेंबर 2026 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल.
25 डिसेंबर 2009 मध्ये प्रदर्शित झालेला 'थ्री इडीयट्स' हा चित्रपट राजकुमार हिरानी यांनी दिग्दर्शित केला होता. विधू विनोद चोप्रा हे या चित्रपटाचे निर्माते होते. तीन मित्रांच्या आयुष्यावर आधारलेल्या या कथेत आमिर खान शर्मन जोशी आणि आर माधवन यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. करीना कपूर खान बोमन इराणी ओमी वैद्य परीक्षेत साहनी आणि मोना सिंग यांसारख्या कलाकारांच्या भूमिका या चित्रपटात आहेत. बॉलीवूड हंगामाच्या एका वृत्तानुसार, या चित्रपटाचे बजेट 55 कोटी रुपये होते. बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी या चित्रपटाने 12.78 कोटी रुपयांची कमाई केली होती.तर ओपनिंग वीकेंडला या चित्रपटाने 40.65 कोटी रुपये कमावले होते. सतरा वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या या चित्रपटाने भारतात तब्बल 202.95 कोटी रुपयांचा कलेक्शन केलं होतं. जगभरातील या चित्रपटाचे कलेक्शन जवळपास 400 कोटी रुपये होतं. हा चित्रपट तुम्हाला घरी बसून पाहायचं असेल तर ॲमेझॉन प्राईमवर तुम्ही हा चित्रपट पाहू शकता.
सोनम वांगचुक आंदोलनादरम्यान '3 इडियट्स' री-रिलीजची चर्चा
सध्या नीट पेपर फुटी प्रकरणात शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टी आंदोलन करत आहे. या आंदोलनाला पर्यावरण आणि शिक्षणतज्ञ सोनम वांगचुक यांनी पाठिंबा देत उपोषण सुरू केलं. 20 दिवस उपोषण केल्यानंतर दिल्ली पोलिसांनी जंतर-मंतर वरून त्यांना जबरदस्ती हटवलं . जमलेल्या उपोषणकर्त्यांना लाठीचार्ज केला. देशभरात सध्या विविध ठिकाणी तरुणांची आंदोलन होत आहेत. सोनम वांगचुक यांना पाठिंबा देण्यासाठी देशभरातून लोक दिल्लीत एकवटले आहेत. दरम्यान काही दिवसांपूर्वी आमिर खानने दिलेल्या मुलाखतीत रँचोचे पात्र सोनम वांगचुक यांच्यावर आधारित नसल्याचे वक्तव्य केलं होतं. त्याच्या वक्तव्यामुळे मोठा गदारोळ झाला. या पार्श्वभूमीवर या चित्रपटाचे री-रिलीज चर्चेत आहे.
