Uddhav Thackeray: आपल्यामध्ये आणि भाजपमध्ये खूप फरक आहे. त्यांना वाटतं की कागदावरची शिवसेना त्यांनी संपवली, पण जमिनीवरची शिवसेना ते कधीच संपवू शकत नाहीत. कारण ते कधी जमिनीवर राहू शकत नसल्याचा खणखणीत टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगावला. मातोश्रीवर बोलताना उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटासह भाजपवर हल्लाबोल केला. मुंबईतील नवनिर्वाचित नगरसेवकांनी आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. उद्धव ठाकरे म्हणाले की यशाचे मानकरी तुम्ही सगळे आहात. आम्ही फक्त निमित्त मात्र आहोत. जो निकाल या सगळ्या परिस्थितीमध्ये लागला तो अभिमानास्पद असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. त्यांनी सांगितले की साम दाम दंड भेद यंत्रणेचा दुरुपयोग करून सगळं काही केलं. गद्दार निघून गेले मात्र ते निष्ठा विकत घेऊ शकले नाहीत. मी सगळ्यांना मानाचा मुजरा करतो आणि जबाबदार आपली वाढली असल्याचं ठाकरे यांनी नमूद केलं.
देवाच्या मनात असेल तर तेही होईल
उद्धव यांनी पुढे सांगितले की आपला महापौर व्हायला पाहिजे हे तर स्वप्न आहे. देवाच्या मनात असेल तर तेही होईल असं सूचक विधान सुद्धा उद्धव ठाकरे यांनी यावेळी केलं. त्यांनी पुढे सांगितले की, गद्दारी करून त्यांनी विजय मिळवला आहे तो मुंबई गहाण ठेवण्यासाठीच असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला. ते म्हणाले की या पापाला मराठी माणूस कधी क्षमा करणार नाही. मात्र, तुम्ही अभिमानाने लढला, तुम्ही निष्ठेसाठी लढला त्यामुळे तुमचा अभिमान असल्याचे त्यांनी नमूद केले. ते म्हणाले की जेव्हा मी फिरत होतो त्यावेळी कोणत्याही सोयी सुविधा आपण देऊ शकलो नाही. आपल्याकडे तन मन त्यांच्याकडे फक्त धन आहे. आपण शक्तीच्या बळावर त्यांना घाम फोडल्याचे त्यांनी सांगितले. ही शक्ती अशीच एकत्र ठेवा पुढच्या पिढ्याला सुद्धा तुमचा अभिमान वाटेल असेही ठाकरे यावेळी म्हणाले. ते म्हणाले की यश मी तुमच्या चरणी नतमस्तक होऊन विजयाच्या श्रेय तुम्हाला देत आहे. ही लढाई संपलेली नाही, जिद्द महत्त्वाची आहे आणि ती कोणीही विकत घेऊ शकत नाही. जिद्दीच्या जोरावर आपण परत जिंकू असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
इतर महत्वाच्या बातम्या